नवापुरातील शोली पोल्ट्रीचे सर्वाधिक नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:43 IST2021-02-27T04:43:18+5:302021-02-27T04:43:18+5:30

गुरुवारी शहरातील शोली पोल्ट्रीचे पक्षी भोपाळ येथे प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. बर्ड फ्लू अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पशुसंवर्धन विभागामार्फत ...

Most damage to Sholi poultry in Navapur | नवापुरातील शोली पोल्ट्रीचे सर्वाधिक नुकसान

नवापुरातील शोली पोल्ट्रीचे सर्वाधिक नुकसान

गुरुवारी शहरातील शोली पोल्ट्रीचे पक्षी भोपाळ येथे प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. बर्ड फ्लू अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पशुसंवर्धन विभागामार्फत शुक्रवारी शोली पोल्ट्रीतील सर्व कुकुट पक्षी टप्प्याटप्प्याने नष्ट करण्याचे काम सुरू केले आहे. चार दिवसात शोली पोल्ट्रीतील कुकुट पक्षी नष्ट करण्यात येणार आहेत. पहिल्या दिवशी २० पशुसंवर्धन विभागातील पथकामार्फत ४४ हजार ९०२ कुकुट पक्षी कलिंग ऑपरेशन दरम्यान नष्ट करण्यात आले. उर्वरित एक लाख ९१ हजार ३०० कुकुट पक्षी तीन दिवसात नष्ट करणार येणार आहे. यात पशुसंवर्धन विभागातील २५० कर्मचारी व १७० खाजगी मजुरांचा समावेश आहे, अशी माहिती तहसीलदार मंदार कुलकुर्णी यांनी दिली.

गेल्या एक महिन्यापासून नवापूर तालुक्यात बर्ड फ्लू संसर्गाने थैमान घातल्याने राज्यातील सर्वात मोठे कुकुट पक्षांचे कलिंग ऑपरेशन नवापूर तालुक्यात सुरू आहे. एकूण ३० पोल्ट्रीत बर्ड फ्लूग्रस्त पोल्ट्रीतील सात लाख कुकुट पक्षी नष्ट करण्यात आले आहे. नवापूर शहरात शुक्रवारी चार पोल्ट्रीतील अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पेरानीयार पोल्ट्रीत २८ हजार पक्षी, पॅराडाईज चार हजार ६०० पक्षी, रीची पोल्ट्रीत सहा हजार ५०० पक्षी, अशरफ पोल्ट्री १२ हजार पक्षी या चार पोल्ट्रीमधील एकूण ५१ हजार १०० कुकुट पक्षी व अंडी व नष्ट करण्याची प्रक्रिया राबवण्यात आली आहे.

नवापूर तालुक्यात आतापर्यंत एकूण ३० कुक्कुटपालन केंद्रातून सात लाख कुक्कुट पक्षी व २७ लाख अंडी बर्ड फ्लू आजारामुळे नष्ट करण्यात आले आहे. नवापूर तालुका बर्ड फ्लूचा महाराष्ट्र राज्यातील मोठा हॉटस्पाट ठरला आहे. नवापूर तालुक्यातील बर्ड फ्लूचे लोन थेट गुजरात राज्यासह नंदुरबार जिल्ह्यातील इतर तालुक्यातही पसरले आहे. नवापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पोल्ट्री व्यवसाय सुरू होता. परंतु बर्ड फ्लूच्या शिरकावाने पूर्ण कुक्कुटपालन व्यवसाय ठप्प झाला आहे. ३० पोल्ट्री व्यावसायिकांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे.

नवापूर शहरातील साधारणतः दररोज साडेसात लाख अंडी महाराष्ट्र-गुजरात राज्यात पाठवली जात होती. परंतु महिनाभरामध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याने नवापूर शहरातून अंडी पाठवण्यास बंदी घातल्याने गुजरात राज्यासह नाशिक विभागात अंड्याची टंचाई निर्माण झाली आहे.

Web Title: Most damage to Sholi poultry in Navapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.