मोबाइलमुळे मुलं विसरली मैदानी खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:29 IST2021-03-08T04:29:29+5:302021-03-08T04:29:29+5:30

नंदुरबार : स्मार्टफोन आता घराघरात आला आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या हातात स्मार्टफोन दिसू लागला आहे. त्यात सहा वर्षाच्या मुलापासून ...

Mobiles make kids forget outdoor games | मोबाइलमुळे मुलं विसरली मैदानी खेळ

मोबाइलमुळे मुलं विसरली मैदानी खेळ

नंदुरबार : स्मार्टफोन आता घराघरात आला आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या हातात स्मार्टफोन दिसू लागला आहे. त्यात सहा वर्षाच्या मुलापासून ७० वर्षांच्या वृृद्धांचा समावेश आहे. यामुळेच लहान मुले पारंपरिक खेळ विसरली असून मोबाइलमधील ॲानलाइन गेमसह इतर खेळाच्या आहारी गेली.

पूर्वी फावल्या वेळात अर्थात शाळेच्या व्यतिरिक्त वेळात सकाळी किंवा सायंकाळी गावाच्या मोकळ्या मैदानात, शहरी भागात वसाहतींच्या मोकळ्या जागेत मुलं एकत्र येऊन विविध खेळ खेळत असत. त्यात विटीदांडू, सुरपारंब्या, लंगडी, लगोरी, भोवरा, सागरगोटे, कब्बडी, कुस्ती, गोट्या, लपंडाव, आंधळी कोशिंबीर, संगीत खुर्ची यासह इतर विविध खेळांचा त्यात समावेश होता. या खेळांच्या माध्यमातून मुलांची शारीरिक व बौद्धिक वाढदेखील होत होती. शिवाय एकत्र खेळल्याने सांघिक भावना निर्माण होऊन मैत्री देखील घट्ट होत होती. परंतु आता सर्वच बदलले आहे. सद्या मोबाइल गेममुळे मुलं विदेशी खेळांकडे आणि ॲानलाइन खेळाच्या आहारी गेली आहेत. त्यामुळे त्यांची बौद्धिक, शारीरिक वाढ खुंटत चालली आहे.

मुलांचा मोबाइलवरील स्क्रीन टाईम किती असावा याबाबत तज्ज्ञांनी विविध मते-मतांतरे व्यक्त केली आहेत. परंतु अनेक मुलं ही सुट्टीच्या दिवशी किंवा शाळेव्यतिरिक्त कायमच मोबाइल हाताळतांना दिसतात. काही मुलांना तर मोबाइल फोबियादेखील झाल्याचे उदाहरणे दिसून आली आहेत. गेल्या वर्षभरापासून ॲानलाइन शिक्षणामुळे तर गरीब बापालादेखील आपल्या मुलासाठी महागडा स्मार्टफोन घेऊन द्यावा लागला आहे. अभ्यासाव्यतिरक्त गेम खेळणे, इंटरनेटवर विविध बाबी सर्चिंग करणे असे प्रकार वाढले आहेत.

विटीदांडू, सुरपारंब्या विसरले...

n सद्याच्या पिढीची मुलं तर विटीदांडू आणि सुरपारंब्या विसरल्याचे चित्र आहे. वास्तविक हे दोन्ही खेळ हे मुलांमधील एकाग्रता वाढविणे, अचूक निशाना साधणे यासह शारीरिक कसरत देखील या खेळांच्या माध्यमातून होत होते. परंतु हे दोन्ही खेळ सद्या ग्रामीण भागातदेखील अभावानेच मुलं खेळतांना आढळून येतात.

n पूर्वी सायंकाळच्या वेळी गावाच्या पाराजवळ किंवा मोकळ्या मैदानात मुलांचा घोळका विविध खेळ खेळतांना दिसून येत असत. सर्व गावातील, वसाहतींमधील मुलं एकत्र खेळ खेळण्यासाठी येत असल्याने त्यांच्यातील संघभावाना, एकोपा वाढीस लागत होता. आता नेमके त्याचीच कमतरता दिसून येते.

कोरोनाने तर अनेक बाबतीत बदल घडविले. लॅाकडाऊन काळात आणि त्यानंतरच्या काळात देखील पालक आपल्या मुलांना खेळण्यासाठी बाहेर जाऊ देत नव्हते. त्यामुळे सहाजिकच मुलं टीव्ही पहाणे किंवा मोबाइलवर गेम खेळणे याला प्राधान्य देऊ लागली. पालकांनाही नाईलाजाने मुलांच्या हातात मोबाइल द्यावा लागला. यामुळे मात्र मुलांवर विपरीत परिणाम दिसून येऊ लागला. सतत मोबाइल पहाण्यामुळे डोळ्यांचे आजार तर वाढलेच. शिवाय चिडचिडेपणा होणे, एकलकोंडे होणे, डोकेदुखी असे प्रकार वाढले. शिवाय पालक व मुलांमधील संवाददेखील खुंटला. त्यामुळे मुलांसाठी मोबाइल किंवा संगणक यांचा स्क्रीन टाईम किती असावा यासाठी पालकांनीच नियोजन करणे आवश्यक ठरले आहे.

Web Title: Mobiles make kids forget outdoor games

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.