स्थलांतरीत मजूरांना परत आणणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 12:42 IST2020-04-30T12:42:28+5:302020-04-30T12:42:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पोट भरण्यासाठी शहरांमध्ये स्थलांतरित झालेल्या असंघटित मजुरांच्या समस्येवर सुरू असलेले राजकारण चुकीचे असून या ...

स्थलांतरीत मजूरांना परत आणणे गरजेचे
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पोट भरण्यासाठी शहरांमध्ये स्थलांतरित झालेल्या असंघटित मजुरांच्या समस्येवर सुरू असलेले राजकारण चुकीचे असून या मजुरांना त्यांच्या मूळ गावात परत आणणे गरजेचे असल्याचे मत लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांनी व्यक्त केले आहे़ परराज्यात अडकलेल्या मजूरांना परत आणण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशी मागणी त्यांनी केली आहे़
प्रतिभा शिंदे यांनी प्रशासनाकडे केलेल्या पाठपुराव्यानुसार स्थलांतरीत मजूर ज्या शहरांमध्ये काम करत आहेत़ त्याठिकाणी त्यांच्या राहण्याच्या जागा अत्यंत अस्वच्छ आणि अनारोग्यदायी आहेत़ लॉकडाऊन काळात अशा जागांमध्ये राहणे त्यांच्यासाठी नरकयातना समान आहे़ राज्यातील तसेच परराज्यातील शेती व ऊस कारखान्यातील मजूर शेत किंवा कारखान्यांच्या आवारात राहत आहेत़ त्याठिकाणी कोरोनाने अद्याप हातपाय पसलेले नाहीत़ अनेक मजूरांना मालकाने पूर्ण मजूरी न देताच काम बंद केले आहे़ शेतात मजूरी करणाऱ्या मजूरांना रोख मजूरी मिळणे बंद झाले आहे़ यातून त्यांची परवड वाढली आहे़ यामुळे शासनाने त्यांच्याकडे लक्ष देवून त्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे त्यांनी म्हटले आहे़
दरम्यान जे मजूर हिंमत करून पायी रस्त्यावर निघून पडलेत त्यांना रस्त्यात अडवून सरकारने निवारा गृहात ठेवले आहे़ ही माहिती मिळाल्यानंतर वाटेवर असलेल्या इतर मजूरांनी मिळेल त्या ठिकाणी राहणे पसंत केले आहे़ काही जण रस्त्यावर तर काही जण झाडांखाली राहून वेळ काढत आहेत़ यामुळे लहान बालके, गर्भवती माता यांचे प्रचंड हाल सुरु असल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली आहे़
लगतच्या गुजरात राज्यासह मध्यप्रदेश राज्यात अडकलेल्या मजूरांना राज्य शासनाने वाहनांद्वारे आणण्यास काहीच हरकत नसल्याचे प्रतिभा शिंदे यांनी म्हटले आहे़ दरम्यान लोकसंघर्ष मोर्चाकडून जिल्ह्यातून परजिल्ह्यात तसेच परराज्यात गेलेल्या मजूरांचा आढावा घेण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे़