दोन सभापती अन् उपाध्यक्षांविनाच जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:31 IST2021-03-10T04:31:28+5:302021-03-10T04:31:28+5:30
प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना बाहेर काढा मगच कामकाज करू सभा सुरू झाल्यानंतर सभापती रतन पाडवी यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी डाॅ. राहुल चाैधरी ...

दोन सभापती अन् उपाध्यक्षांविनाच जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा
प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना बाहेर काढा मगच कामकाज करू
सभा सुरू झाल्यानंतर सभापती रतन पाडवी यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी डाॅ. राहुल चाैधरी यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष यांचा शाब्दिक अपमान केल्याची माहिती देत डाॅ. चाैधरी यांचा पदभार काढा तरच सभा सुरू करा, अशी मागणी केली. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी गावडे यांनी शिक्षणाधिकारी चाैधरी यांना त्यांची भूमिका मांडण्याचे सूचित केले. यावर माहिती देताना डाॅ. चाैधरी यांनी काहीही चुकीचे बोललो नसल्याचे सांगितले. यावर सभेत वातावरण तापले होते. यातून शाब्दिक वादावादीही झाली. दरम्यान, सर्वच सदस्यांनी डाॅ. चाैधरी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत सभा सुरू होऊ देणार नसल्याचे सांगितल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी गावडे यांनी येत्या काही दिवसांत पदभार काढणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर सभा सुरू करण्यात आली.
सभेत एकूण नऊ विषयांवर चर्चा करण्यात आली. शासनाच्या परिपत्रकांच्या वाचनानंतर मागील सभेतील केलेल्या ठरावावरील पूर्ततेचा आढावा घेण्यात आला. दरम्यान, अक्कलकुवा तालुक्यातील उमरागव्हाण ग्रुप ग्रामपंचायतीतील चिवलउतार व नेंदवाण खुर्द या दोन ग्रामपंचायतींचे विभाजन करण्याचा प्रस्ताव सभेत मंजूर करण्यात आला.
दरम्यान, सदस्य भरत गावित यांनी वडसत्रा ग्रामपंचायतीत गैरव्यवहार झाल्याची माहिती देत कारवाईची मागणी केली. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी द्विसदस्यीय समिती नियुक्ती केल्याची माहिती दिली. प्रसंगी माहिती देताना हळदाणी ग्रुप ग्रामपंचायतअंतर्गत घरकुल योजनेत मोठा गैरव्यवहार झाला असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. एकाच्या नावावर दहा घरकुले असल्याचे सांगत तालुक्यात ११ वर्षांच्या मुलालाही लाभार्थी म्हणून तयार करत त्याच्या नावाने घरकुलाची रक्कम काढली जात असल्याचा खळबळजनक दावाही भरत गावित यांनी सभेत केला.
दरम्यान, भरत गावित यांनी जिल्हा परिषदेच्या सभेत नाकारलेले ठराव पुन्हा मंजूर होत असल्याचे सांगून ठरावांवर योग्य कारवाई व्हावी, अशी मगणी केली.
सभेत विविध विभागांचा आढावा घेण्यात आला. यात पशुसंवर्धन विभागाकडून बर्ड फ्लूअंतर्गत देशातील सर्वात मोठे कलिंग राबविण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन अधिकारी डाॅ. उमेश पाटील यांनी दिली. नवापूर येथील २२, तर विसरवाडी येथील दोन अशा एकूण २४ पोल्ट्रीमधून ८ लाख ९८ हजार कोंबड्यांचे कलिंग, तर ६९ लाख ७८ हजार अंड्यांची विल्हेवाट लावण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील ३२ पोल्ट्री फार्मचे सॅनिटायझेशन सध्या सुरू असल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली.
दरम्यान, विजय पराडके यांनी धडगाव पंचायत समितीच्या कार्यालयाची दुरुस्तीची मागणी केली. सभेत देवमन पवार यांनी कुशल व अशकुल मजुरांना रोहयोची दोन महिन्यांपासून मजुरी मिळालेली नसल्याची माहिती दिली. येत्या काळातही मजुरी न मिळाल्यास स्थलांतर होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.
सभेच्या शेवटी निवडप्रक्रिया रद्द झाल्याने रिक्त असलेल्या उपाध्यक्ष व सभापतींच्या विषय समित्यांचा पदभार नेमका कोणाकडे देता येईल यावर चर्चा झाली. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी माहिती देताना जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्याकडे या सर्व समित्यांचा पदभार देण्यात येणार असल्याचे सांगितले.