वैद्यकीय महाविद्यालय यंदापासून सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 12:58 IST2020-03-07T12:58:02+5:302020-03-07T12:58:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बहुप्रतिक्षीत वैद्यकीय महाविद्यालय येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आल्याने जिल्हावासीयांमध्ये ...

वैद्यकीय महाविद्यालय यंदापासून सुरू होणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : बहुप्रतिक्षीत वैद्यकीय महाविद्यालय येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आल्याने जिल्हावासीयांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. पालकमंत्री अॅड.के.सी.पाडवी यांनी त्यासाठी विशेष पाठपुरावा केला होता. याशिवाय अपुर्ण सिंचन प्रकल्पांसाठी देखील निधीची तरतूद करण्यात आल्याने जिल्ह्यातील अपुर्ण सिंचन प्रकल्पांना त्याचा फायदा होणार आहे.
राज्याचा अर्थसंकल्प शुक्रवारी सादर करण्यात आला. अर्थसंकल्पात जिल्ह्याला काय मिळाले याविषयी नागरिकांमध्ये उत्सूकता होती. वैद्यकीय महाविद्यालयाबाबत शासनाने सकारात्मक भुमिका घेत निर्णय घेतला आहे.
नंदुरबारचे वैद्यकीय महाविद्यालय आठ वर्षात दोन वेळा मंजुर झाले आहे. पहिल्या वेळी केवळ मंजुर करण्यात आले. महाविद्यलाय सुरू करण्यासंदर्भात काहीही हालचाली झाल्या नाहीत त्यामुळे ते केंद्रीय समितीने नामंजूर केले. त्यानंतर चार वर्षांपूर्वी पुन्हा एकदा भाजप सरकारने त्याला मंजुरी दिली. मंजुरीनंतर महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात आवश्यक त्या कार्यवाही गेल्या तीन वर्षात पुर्ण करण्यात आल्या. जिल्हा रुग्णालयात ५०० बेडची व्यवस्था करून ते वैद्यकीय महाविद्यालयाकडे वर्ग करण्याची प्रक्रिया करण्यात आली. त्याच ठिकाणी महाविद्यालयासाठी असलेल्या आवश्यक इमारती, होस्टेलची सुविधा करण्यात येत आहे. केंद्रीय समितीने देखील दोन वेळा भेटी देवून हिरवी झेंडी दाखविली आहे. जिल्हा नियोजन समितीने तातडीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षात महाविद्यालय सुरू करण्यासाठी सज्जता ठेवण्यात येत आहे.
आता राज्याच्या अर्थसंकल्पात देखील नंदुरबारसह राज्यातील इतर दोन वैद्यकीय महाविद्यालये येत्या शैक्षणिक अर्थात २०२०-२१ या वर्षात सुरू करण्याची तरतूद करण्यात आली आहे. किती रक्कमेची तरतूद आहे हे स्पष्ट झाले नसले तरी असे असले तरी शासन स्तरावर त्यासाठी तरतूद करण्यात आल्याने आता महाविद्यालय सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाल्याने जिल्हावासीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
अर्थ संकल्पात अपुर्ण सिंचन प्रकल्पांना १० हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील दहा पेक्षा अधीक प्रकल्पांना त्याचा फायदा होणार आहे.
प्रत्येक जिल्ह्यात एक महिला पोलीस ठाणे निर्माण करण्यात येणार आहे. त्याचा फायदा नंदुरबारलाही होणार आहे. जिल्ह्यात एकुण १३ पोलीस ठाणे आहेत. त्यात आणखी एका पोलीस ठाण्याची भर पडणार आहे. विशेष म्हणजे या पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी या महिलाच राहणार आहेत.