सीएए व एनआरसी समर्थनार्थ भव्य मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 12:47 IST2019-12-27T12:47:02+5:302019-12-27T12:47:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरिक नोंदवही (एनआरसी) कायद्याच्या समर्थनार्थ गुरुवारी शहरात राष्ट्रीय ...

सीएए व एनआरसी समर्थनार्थ भव्य मोर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरिक नोंदवही (एनआरसी) कायद्याच्या समर्थनार्थ गुरुवारी शहरात राष्ट्रीय सुरक्षा मंचाच्या वतीने विशाल जनमोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. विविध राजकीय पक्षाचे नेते, हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले होते. केंद्र शासनाने पारित केलेल्या दोन्ही कायद्यांच्या समर्थनार्थ मोर्चेकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
सुधारित नागरिकत्व कायदा व राष्ट्रीय नागरिक नोंदवही हे दोन कायदे भारतीय संसदेने लोकसभा व राज्यसभेत बहुमताने मंजूर झाले. या दोन्ही कायद्यांना समर्थनासाठी गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास शहरातील प्रेस मारुती मंदिर मैदान परिसरातून मोर्चाला सुरुवात झाली. दुपारी बारा वाजेपासून या परिसरात विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. राष्ट्रीय सुरक्षा मंचचे अध्यक्ष डॉ.वसंत पाटील, आमदार राजेश पाडवी, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, राजेंद्र गावीत, डॉ.शशिकांत वाणी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अजय शर्मा, डॉ.कांतीलाल टाटीया, माजी नगरसेविका रेशमबाई दुरंगी,महिला आघाडीच्या कल्पना पंड्या, वकील संघटनेचे अॅड.भरत मराठे यांच्यासह हजारोंच्या संख्येने नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते.
प्रेस मारुती मैदानातून मोर्चा बसस्थानक मार्गे नगरपालिकेला वळसा घालून डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात आल्यानंतर तेथे मोर्चाचे रूपांतर विशाल सभेत झाले. यावेळी हिंदू एकता मंचचे हिरामण गवळी म्हणाले की, हा कायदा खºया भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेकरता महत्त्वाचा असून यामुळे देशात असलेल्या घुसखोरांना देशाबाहेर काढणे शक्य होणार आहे. त्याचप्रमाणे अफगाणिस्तान, पाकिस्तान व बांगलादेश या तिन्ही देशातील अल्पसंख्याक नागरिकांना आपल्या देशात नागरिकत्व देता येणे शक्य होणार असल्याने आम्ही हजारोंच्या संख्येने केंद्र शासनाच्या या दोन्ही कायद्यांचे जाहीर समर्थन करतो, असे मनोगत यावेळी विविध मान्यवरांनी व्यक्त केले.
मोर्चेकऱ्यांच्या वतीने नायब तहसीलदार आर.एस. कुरेकर, मंडळ अधिकारी प्रमोद अमृतकर यांना देण्यात आलेल्या निवेदनाचा आशय असा : लोकसभा व राज्यसभेत हे दोन्ही कायदे मंजूर झाले असून राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर त्याचे कायद्यात रूपांतर झाले आहे. हा कायदा कोणत्याही जाती-धर्माला विरोध करणारा नाही. या कायद्यामुळे सर्व भारतीयांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असल्याने केंद्र शासनाने या दोन्ही कायद्यांची संपूर्ण देशात लवकरात लवकर अंमलबजावणी करावी यासाठी आम्ही या कायद्याला पाठिंबा दर्शवित आहोत, असे म्हटले आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरात ठिकठिकाणी मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला होता.
प्रकाशा येथेही रॅली
सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरिक नोंदवही (एनआरसी) कायद्याच्या समर्थनार्थ प्रकाशा ग्रामस्थांतर्फे रॅली काढण्यात आली. या रॅलीत विविध पक्ष, संघटना, संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धकृती पुतळ्यास अभिवादन करून रॅलीला सुरुवात झाली. या कायद्यांना समर्थन दर्शविणारे फलक हाता घेऊन विविध घोषणा देण्यात आल्या. रॅलीचे रूपांतर सभेत झाले. वि.का. संस्थेचे अध्यक्ष हरी पाटील म्हणाले की, राष्ट्रहितासाठी नागरिक संशोधन कायद्याला पाठींबा देणे गरजेचे आहे. मात्र याला ठिकठिकाणी विरोध दर्शविण्यात येऊन सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यात आले. पोलीस व संरक्षक दलाच्या जवानांना नाहक अपमानास्पद वागणूक देण्यात आली. या कृत्याच्या जाहीर निषेध करीत आहोत, असे सांगितले. भटू वसंत शिंपी यांनीही मनोगत व्यक्त केले.
शहादा येथे गुरुवारी सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरिक नोंदवही (एनआरसी) या कायद्यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात येणार असल्याने दुपारी बारा वाजेपासून शहरातील सर्व व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने आपले व्यवसाय बंद ठेवले होते. व्यवसाय बंद ठेवून व्यापारी संघटनांचे पदाधिकारी वकील संघटनांचे पदाधिकारी, डॉक्टर असोसिएशनचे पदाधिकारी, नागरी हक्क संरक्षण समिती, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्यासह विविध स्वयंसेवी संघटनांचे पदाधिकारी मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चेकºयांच्या हातात या कायद्याचे समर्थन करणारे बॅनर व पोस्टर तर १०० मीटर लांबीचा तिरंगा हे प्रमुख आकर्षण ठरले.