यंदा भरपूर आमरस; केशर १०० रुपये किलो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:31 IST2021-05-13T04:31:25+5:302021-05-13T04:31:25+5:30

नंदुरबार : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेसाठी नागरिक तयारी करत आहेत. यात प्रामुख्याने लागणारा आंबा आणि आमरस यांच्या ...

A lot of Amaras this year; Saffron 100 rupees per kg! | यंदा भरपूर आमरस; केशर १०० रुपये किलो!

यंदा भरपूर आमरस; केशर १०० रुपये किलो!

नंदुरबार : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेसाठी नागरिक तयारी करत आहेत. यात प्रामुख्याने लागणारा आंबा आणि आमरस यांच्या टंचाईचे अनुभव जिल्हावासीयांच्या गाठीशी आहेत. परंतु यंदा आंबा बागांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादन आल्याने जिल्ह्यातही आंब्याची आवक झाली असून गुरुवारी सायंकाळपर्यंत आणखीन आवक होण्याची शक्यता आहे.

फळांचा राजा असलेला आंबा हा खवय्यांची पहिली पसंती असतो. खास करुन सणावाराला आमरस तयार करण्याची पद्धत आहे. खान्देशात अक्षय तृतीयेला आमरस पुरणपोळीचा बेत केला जातो. पूर्वजांना नैवेद्य देऊन या आमरस पुरणपोळीचा आस्वाद घेतला जातो. यंदा लाॅकडाऊनमुळे आंबा आवक कमी होणार अशी शक्यता होती. परंतु गुढीपाडव्यापासून जिल्ह्यात आंबा आवक कायम आहे. यामुळे आंबा दर हे सर्वांच्या आवाक्यात असल्याने सकाळी ११ पर्यंतच्या बाजारात खरेदीसाठी झुंबड उडत आहे. गुरुवारी आणि शुक्रवारीही आंबा खरेदीसाठी गर्दी होणार असल्याचे गृहित धरुन आंबा विक्री करणारे होलसेल व्यापारी आणि किरकोळ व्यापारी यांनी तयारी करुन ठेवली असल्याचे सांगण्यात आले आहे. यातून उलाढालही वाढणार असल्याचे विक्रेते सांगत आहेेत.

आवक वाढली ग्राहकांचा प्रतिसाद

पारंपरिक पद्धतीने साजऱ्या होणाऱ्या अक्षय तृतीयेसाठी आंबा व आमरस गरजेचा असल्याने त्याची मुबलक प्रमाणात विक्री होते. कोरोनामुळे जिल्ह्यातील अनेकांना दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांचे अनेक धार्मिक विधीही त्यांच्या आप्तांना पार पाडता आले नव्हते. यातून अक्षय तृतीयेला या मयतांना श्रद्धांजली वाहून आमरसाचा नैवेद्य दाखवण्याचा कार्यक्रम होणार आहे. घागर भरण्याच्या या विधीमुळे आंब्याला मागणी राहणार आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील कोरोनाबाधित नागरिकांची संख्या दिवसेंदिवस घटत असल्याने यंदाची अक्षय तृतीया भयमुक्त वातावरणात पार पडणार असल्याने नागरिक गोडवा म्हणूनही आमरसाची खरेदी वाढवतील असा अंदाज आहे. जिल्ह्यातील स्थानिक बागांमध्ये पिकवला जाणारा आंबाही बऱ्यापैकी बुक करण्यात आला आहे.

जिल्ह्यात आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि गुजरात राज्यातून आंब्यांची आवक होते. यात गुजरातमधून केसर तर कर्नाटकमधून बदाम, केशर व लंगडा याची आवक होते. आंध्र प्रदेशातून विविध प्रजातीच्या आंब्यांची आवक होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. सोबत रत्नागिरी जिल्ह्यातून हापूस आंब्यांची आवक होत असल्याचे सांगण्यात आले आहे. नंदुरबार शहरात अनेक ठिकाणी हापूस आंबा आवक झाली असून खरेदीसाठी नागरिक गर्दी करत आहेत. हापूसची आवकही वाढली असल्याने दर कमी असल्याचे सांगण्यात आले.

यंदा भरपूर आंबे नागरिकांना मिळणार आहेत. भरपूर आवक आहे. गेल्या वर्षासारखी टंचाई निर्माण होण्याची शक्यताच नाही. सर्व व्यापाऱ्यांकडे आंबा आवक झाली आहे. दरही मध्यम असल्याने नागरिकांचा खरेदीला मोठा प्रतिसाद आहे.

- मोहितसिंग राजपूत, होलसेल व्यापारी

सर्वच प्रकारच्या आंब्यांचे दर हे कमी आहेत. यातून गेल्या काही दिवसात खरेदी वाढली होती. अक्षय तृतीयेसाठीही आंबा आवक झाली आहे. नागरिकांना आमरस तयार करण्यासाठी भरपूर आंबे मिळणार आहेत. कमी दरांमुळे सामान्यांना हापूसही खरेदी करता येईल.

- रमेश सिंधी, किरकोळ व्यापारी

Web Title: A lot of Amaras this year; Saffron 100 rupees per kg!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.