‘लोकमत’ने एका दिवसात केला रक्तदानाचा उच्चांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:20 IST2021-07-03T04:20:13+5:302021-07-03T04:20:13+5:30
नंदुरबारातील शुभारंभाच्या शिबिरात १४२ जणांनी, तर बामखेडा येथील शिबिरात ९२ जणांनी रक्तदान केले. दरम्यान, ३० जुलैपर्यंत २० ठिकाणी शिबिरे ...

‘लोकमत’ने एका दिवसात केला रक्तदानाचा उच्चांक
नंदुरबारातील शुभारंभाच्या शिबिरात १४२ जणांनी, तर बामखेडा येथील शिबिरात ९२ जणांनी रक्तदान केले. दरम्यान, ३० जुलैपर्यंत २० ठिकाणी शिबिरे घेण्यात येणार आहेत. कोरोनामुळे गेल्या सव्वा वर्षांपासून रक्तदान शिबिरे व सार्वजनिक कार्यक्रमांना मर्यादा आल्याने राज्यात सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. नंदुरबार जिल्ह्यातही त्याचा मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने रक्तदान शिबिरांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन केले आहे. त्याची सुरुवात शुक्रवार, २ जुलै रोजी नंदुरबारातील टिळक जिल्हा वाचनालयाच्या सभागृहात करण्यात आली. माजी मंत्री आमदार डॉ. विजयकुमार गावीत यांच्या हस्ते व खासदार डॅा. हिना गावीत, ज्येष्ठ साहित्यिक डॅा. पीतांबर सरोदे, आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन राजेंद्र गावीत आदी उपस्थित होते. सुरुवातीला जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करण्यात आले. यावेळी बोलताना डॉ. विजयकुमार गावीत यांनी सांगितले, कोरोनाकाळात रक्तदानाविषयी भीती आणि गैरसमज होते. त्यामुळे रक्ताची चणचण भासू लागली. अनेक गंभीर रुग्णांना ऐनवेळी रक्तासाठी मोठ्या प्रमाणावर फिरफिर करावी लागली. ही बाब हेरून ‘लोकमत’ने केलेल्या रक्तसंकलन महायज्ञाचा संकल्प नक्कीची कौतुकास्पद आहे. जिल्हा रुग्णालयात अनेक गरीब, गरजू रुग्ण असतात. त्यांना ऐनवेळी रक्ताची गरज भासल्यास अशा शिबिरांच्या माध्यमातून त्यांना मोठा दिलासा मिळू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘लोकमत’ने विविध सेवाभावी संघटनांनादेखील यात सहभागी करून घेतल्याने रक्तदानाचा हा महायज्ञ यशस्वी होईल, असेही त्यांनी सांगितले.
खासदार डॉ. हिना गावीत यांनी सांगितले, रक्तदान हे पवित्र कार्य आहे. या कार्यात ‘लोकमत’चे योगदान मोलाचे ठरणार आहे. एखाद्या शिबिरात एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्तदात्यांनी सहभागी होणे ही बाब प्रथमच दिसून येत आहे. धावपळीच्या या युगात प्रत्येक जण विविध ताणतणावात असतो. त्यामुळे प्रत्येकाला विविध आजारांची लागण होऊ शकते. त्यामुळे योगा, प्राणायाम, व्यायाम यांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीत आणखी आधुनिक उपकरणे बसविण्यात येणार आहेत. या रक्तपेढीची क्षमता वाढविण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी नवनिर्माण संस्थेचे रवी गोसावी, प्राथमिक शिक्षक परिषदेचे राज्य कार्यवाह पुरुषोत्तम काळे, जिल्हाध्यक्ष आबा बच्छाव, नंदनगरी रोटरी क्लब ऑफ नंदुरबारचे अध्यक्ष मनोज गायकवाड, लायन्स क्लब ऑफ नंदुरबारचे अध्यक्ष शेखर कोतवाल, नंदुरबार जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मुकेश पाटील, पुष्पेंद्र रघुवंशी, व्हीएसजीजीएमचे शीतल पटेल, नर्मदा बचाव आंदोलनाच्या लतिका राजपूत, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरुण रामराजे, भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक पाटील आदी उपस्थित होते.
शिबिरात पती-पत्नी यांनी जोडीने रक्तदान केले, ती बाबदेखील चर्चेची ठरली. त्यात पुरुषोत्तम काळे व सरिता काळे, रामकृष्ण बागल व दीपमाला बागल, राकेश आव्हाड व भारती आव्हाड, रवींद्र पाटील व राजश्री पाटील, रवी गोसावी व मनीषा गोसावी आणि बुद्धम शाक्य व शीतल शाक्य यांचा समावेश होता. प्रा. पी. आर. पाटील व सरला पाटील या जोडप्याने मुलाच्या वाढदिवसानिमित्त जोडीने रक्तदान केले. या सर्व जोडींचा उत्साह वाढविण्यासाठी उपस्थितांनी त्यांना प्रोत्साहनही दिले. याशिवाय सुभाष मोटवाणी व खुशी मोटवाणी या बापलेकीनेदेखील सोबत रक्तदान केले.
प्राथमिक शिक्षक बापू काशीनाथ ठाकरे यांनी सलग ६५ वेळा रक्तदान केले. तर सर्वात कमी अर्थात साडेअठरा वर्षे वयाचा हृषीकेश आनंदा पाटील या युवकानेदेखील रक्तदानात सहभाग घेतला.