मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतरही जिल्ह्यात लॉकडाऊनची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:31 IST2021-03-31T04:31:22+5:302021-03-31T04:31:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात कोरोना लसीकरणाच्या पाहणीनिमित्ताने मुख्यमंत्री, मु्ख्य सचिव व आरोग्य सचिव यांचा दौरा होऊनही जिल्ह्यात ...

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतरही जिल्ह्यात लॉकडाऊनची वेळ
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात कोरोना लसीकरणाच्या पाहणीनिमित्ताने मुख्यमंत्री, मु्ख्य सचिव व आरोग्य सचिव यांचा दौरा होऊनही जिल्ह्यात ना कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली, ना लसीकरणाचा वेग वाढला, ना आरोग्यासंदर्भातील प्रभावी उपाययोजना झाल्या. त्यामुळे हा दौरा नेमक्या कुठल्या कारणासाठी झाला याबाबत मात्र सामान्य जनतेला प्रश्न पडला आहे. एवढेच नव्हे तर रुग्णसंख्या इतकी वाढली की, राज्यात सर्वप्रथम जिल्ह्यात १५ दिवसांचे लॉकडाऊन करावे लागल्याने जनमानसात उपाययोजनांबाबत नाराजीचा सूर आहे.
कोरोनाची लागण झाली त्या वेळी सुरुवातीच्या काळात अर्थात गेल्या वर्षी जिल्ह्यातील नागरिकांनी, प्रशासनाने गांभीर्याने नियमाचे पालन केल्याने गेल्या वर्षी राज्याच्या तुलनेत जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात होता. मात्र या वर्षी मार्चच्या सुरुवातीपासून रुग्णांची संख्या वाढू लागली. त्यातच १९ मार्चला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अचानक धडगाव व मोलगी येथे दौरा ठरला. या संदर्भात राजकीय गोटात वेगवेगळे तर्क असले तरी सामान्य जनतेला मात्र मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याने विकासाच्या योजना आणि कोरोना नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजनांची आस लागून होती. मात्र जनतेचा भ्रमनिरास झाल्यागत स्थिती आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोलगी आणि धडगावला केवळ लसीकरणाची पाहणी व रुग्णांची विचारपूस केली नाही तर धडगावला कोरोना संदर्भातील उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य सचिव प्रदीप व्यास, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या उपस्थितीत प्रमुख अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या बंदद्वार बैठकीत काय चर्चा झाली ती बाहेर आली नसली तरी लोकांमध्ये उच्चस्तरीय बैठकीत निश्चितच प्रभावी उपाययोजनांचे निर्णय झाले असावे, असा तर्क होता. पण मुख्यमंत्री रवाना झाल्यानंतर नवीन आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्या नाही किंवा रुग्ण वाढत असल्याने उपचारासाठी नवीन कोविड सेंटरही सुरू झाले नाही. लसीकरणाबाबतही खूप काही वेग मिळाला अशी स्थिती नाही. याउलट रुग्णांची संख्या प्रचंड वाढू लागली आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यातदेखील नियमांचे पालन झाले नसल्याने दुर्गम भागात या दौऱ्यामुळेच रुग्ण वाढू लागल्याचे आरोप सुरू झाले आहेत. रुग्ण वाढत असल्याने उपाययोजनांना गती देण्याऐवजी प्रशासनाने दोन दिवस जनता कर्फ्यू व त्यानंतर १ एप्रिल ते १५ एप्रिल असे १५ दिवस लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्यामुळे व्यापारी, मजूर, व्यावसायिक, उद्याेजक यांच्यात तीव्र नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
दुसरीकडे रुग्णालये रुग्णांनी हाउसफुल्ल आहेत. गंभीर रुग्णांना स्थानिक स्तरावर उपचाराची सोय नसल्याने बहुतांश रुग्ण सुरत, अहमदाबाद, नाशिक, मुंबई, पुणे येथे जात असून त्यांच्यासाठी रुग्णवाहिका मिळणे दुरापास्त झाले आहे. रुग्णवाहिका आहे तर ऑक्सिजन नाही, रुग्णालयात बेड आहे तर ऑक्सिजन नाही, व्हेंटिलेटर मोजकेच आहेत. अशा स्थितीत ऑक्सिजनअभावी गुदमरणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. एकूणच या परिस्थितीमुळे जिल्ह्यात चिंतेचे वातावरण असून, आता परिस्थितीशी संघर्ष करण्यासाठी जिल्हा प्रशासन, वैद्यकीय सेवेकरी, सामाजिक कार्यकर्ते, सेवाभावी संस्था आणि नागरिकांनीही पुन्हा एकदा कंबर कसून मानवतावादी भूमिकेतून कामाला लागण्याची गरज आहे.