हातधुई येथील शासकीय आश्रमशाळेचे पत्रे वादळी वाऱ्याने उडाले; पोळा सणानिमित्त शाळेला सुट्टी असल्याने पुढील अनर्थ टळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:37 IST2021-09-09T04:37:16+5:302021-09-09T04:37:16+5:30
तळोदा : तळोदा प्रकल्पामार्फत चालविण्यात येणाऱ्या धडगाव तालुक्यातील हातधुई येथील शासकीय आश्रमशाळेचे पत्रे मंगळवारी रात्री आलेल्या वादळी पावसाने ...

हातधुई येथील शासकीय आश्रमशाळेचे पत्रे वादळी वाऱ्याने उडाले; पोळा सणानिमित्त शाळेला सुट्टी असल्याने पुढील अनर्थ टळला
तळोदा : तळोदा प्रकल्पामार्फत चालविण्यात येणाऱ्या धडगाव तालुक्यातील हातधुई येथील शासकीय आश्रमशाळेचे पत्रे मंगळवारी रात्री आलेल्या वादळी पावसाने उडाले आहेत. सुदैवाने पोळा सणानिमित्त शाळेला सुट्टी असल्यामुळे मुले गावाला गेली होती. यामुळे साहजिकच पुढील अनर्थ टळला. परंतु प्रशासनाने आता दुरुस्तीसाठी तातडीने कार्यवाही हाती घ्यावी, अशी पालकांची मागणी आहे.
तळोदा येथील आदिवासी विकास प्रकल्पामार्फत धडगाव तालुक्यातील हातधुई येथे आदिवासी मुला-मुलींसाठी निवासी शासकीय आश्रमशाळा चालवली जात असते. या शाळेची इमारत पारंपरिक पद्धतीची बनविली असल्यामुळे पत्रे बसविण्यात आले आहेत. शाळेत पहिली ते बारावीपर्यंत वर्ग आहे. त्यामुळे तेथे साडेतीनशेपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मंगळवारी रात्री झालेल्या प्रचंड वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसाने विद्यार्थ्यांच्या निवासाचे व सभागृहाचे पत्रे उडाले होते. वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे पत्रे लांबपर्यंत उडाले होते. भिंतीच्या विटांचाही अक्षरश: भुगा झाला होता. परंतु सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. कारण आश्रम शाळेतील विद्यार्थी पोळा सणामुळे आपापल्या गावी गेले होते. याशिवाय आजूबाजूचे विद्यार्थी नव्हते. परिणामी पुढील अनर्थ टळला होता. या प्रकरणी मुख्याध्यापक सायसिंग वसावे यांनी प्रकल्प प्रशासनाला वादळामुळे झालेल्या शाळेच्या नुकसानीच्या घटनेचा अहवाल दिला आहे. असे प्रकल्पाच्या सूत्राने सांगितले असून, तेथील चौकशीसाठी शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना शाळेत पाठविल्याची माहितीही सूत्रांनी दिली.
इमारतीचीही दुरवस्था
ज्या इमारतीचे पत्रे उडाले आहेत तिचीही अत्यंत दुरवस्था झालेली आहे. कारण त्या इमारतीच्या भिंतीला मोठमोठे तडे गेले आहेत. त्याशिवाय ठिकठिकाणी प्लास्टरदेखील उखडलेले आहे. शिवाय खिडक्या व त्यांची तावदाने तुटलेली आहेत. त्यामुळे या इमारतीची दुरुस्ती हाती घेण्याची गरज आहे. मात्र, तसे होताना दिसून येत नाही. वास्तविक प्रकल्पाकडे मोठा निधी आहे. साहजिकच शासकीय आश्रमशाळेच्या जीर्ण इमारतींची दुरुस्ती होणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रशासनाने दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेण्याची पालकांची मागणी आहे.
वादळी पावसामुळे धडगाव तालुक्यातील हातधुई शाळेच्या नुकसानीचा अहवाल मुख्याध्यापकांचाकडून प्राप्त झाला आहे. चौकशीसाठी विस्तार अधिकाऱ्यांना पाठवून लगेच पुढील दुरुस्ती हाती घेण्यात येईल.
-सुवर्णा सोलंकी, सहायक पकल्प अधिकारी, आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा.