त्रिसुत्रीचा वापर करून कोरोनाला हरवूया - पालकमंत्र्यांचे जिल्हवासीयांना आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:27 IST2021-04-26T04:27:06+5:302021-04-26T04:27:06+5:30

नंदुरबार : जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोनाबाधितांची संख्या शून्यावर आणण्यासाठी मास्क घालणे, हात स्वच्छ धुणे आणि शारीरिक अंतर या त्रिसुत्रीचा वापर ...

Let's defeat Corona using Trisutri - Guardian Minister's appeal to the people of the district | त्रिसुत्रीचा वापर करून कोरोनाला हरवूया - पालकमंत्र्यांचे जिल्हवासीयांना आवाहन

त्रिसुत्रीचा वापर करून कोरोनाला हरवूया - पालकमंत्र्यांचे जिल्हवासीयांना आवाहन

नंदुरबार : जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोनाबाधितांची संख्या शून्यावर आणण्यासाठी मास्क घालणे, हात स्वच्छ धुणे आणि शारीरिक अंतर या त्रिसुत्रीचा वापर करावा आणि लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि नागरिकांना उद्देशून लिहिलेल्या पत्राद्वारे केले आहे. पालकमंत्री यांनी पत्रात म्हटले आहे की, कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरणावर भर देणे आवश्यक आहे. लसीकरणामुळे आतापर्यंत जिल्ह्यात कुणालाही गंभीर स्वरूपाचा त्रास झालेला नाही. लसीकरणानंतर कोणत्याही प्रकारचा गंभीर त्रास होत नसून, काहींना होणारा सौम्य स्वरूपातील त्रास हा स्वाभाविक आणि उपचारांनी बरा होणारा आहे.

लस संपूर्ण सुरक्षित असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता कोरोना लसीकरण करुन घ्यावे. लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक असून, लसीकरणानंतर दोन आठवड्यांनी शरिरातील रोगप्रतिकारशक्तीमध्ये आवश्यक बदल होतीत. लस घेतल्यानंतर कोरोनाचा संसर्ग झाल्यास अशी व्यक्ती मृत्यूच्या दारापर्यंत जात नाही व औषधोपचाराने बरी होते, असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी स्वतः प्रथम लसीकरण करून आपल्या भागातील नागरिकांना आदर्श घालून द्यावा, त्यांच्या मनातील संभ्रम दूर करावा व त्यानंतर लसीकरणाबाबत ग्रामीण भागात प्रचार- प्रसार करून शासकीय यंत्रणेच्या समन्वयाने शिबिरांचे आयोजन करावे. जिल्ह्यातील अक्कलकुवा, धडगावसारख्या दुर्गम व अतिदुर्गम भागातही लसीकरण होणे महत्त्वाचे आहे. यासाठी जिल्हा परिषदेने आवश्यक कार्यवाही करावी.

कोरोनाचा संसर्ग झाल्यास रुग्णांनी घाबरून न जाता, डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य औषधोपचार करावा. आरटीपीसीआर किंवा अँटिजेन चाचणी केल्यानंतर कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदर्शनाला आल्यास जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी तयार केलेल्या विलगीकरण कक्षांमध्ये औषधोपचारासाठी दाखल व्हावे. सर्वच रुग्णांना रेमडेसिविर औषधाची आवश्यकता नसते, हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

डॉक्टरांनी रुग्णालयात रुग्ण दाखल झाल्यानंतर केंद्र सरकारच्या प्रोटोकॉलनुसार पूर्ण तपासणी किंवा आवश्यक चाचण्या करूनच रुग्णाची स्थिती पाहूनच रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर करणे आवश्यक आहे. रेमडेसिविर इंजेक्शनमध्ये स्टेरॉईडचा वापर असल्याने आवश्यकता नसल्यास त्याचा वापर करू नये. रेमडेसिविर इंजेक्शन आता बाहेर मिळत नाही. ते फक्त जिल्हा रुग्णालयात उपलब्ध होईल. आपण कोविड उपचार केंद्रात दाखल असल्यास व आपल्याला आवश्यकता असल्यास आपल्याला ते उपलब्ध करून देण्यात येईल. रेमडेसिविर इंजेक्शनच्या उत्पादनात वाढ करणे व त्यावरील कर कमी करणे यासारख्या उपाययोजना केंद्र व राज्य शासन करत आहे. रेमडेसिविरचा जास्तीत जास्त साठा महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे मागणी केलेली आहे. रुग्णाला लक्षणे कधी आढळली, त्याला ऑक्सिजनची गरज आहे का, त्याचे वय अधिक आहे का, त्याला अन्य आजार असून, तो लवकर बरा होऊ शकतो का, याचा सारासार विचार केला तर रेमडेसिविरचा योग्य वापर करता येऊ शकतो. यातून इंजेक्शनचा दुरुपयोग टाळता येईल.

कोरोना झाल्याचे निदर्शनाला आल्यास नंदुरबार येथील एकलव्य कोविड केअर सेंटर, नवापूर, शहादा येथील कोरोना उपचार केंद्र व जिल्ह्यातील विविध विलगीकरण कक्षांमध्ये तसेच प्रकाशा येथील विलगीकरण कक्षात दाखल व्हावे. याठिकाणी आपल्याला प्राथमिक उपचार देण्यात येतील व आपल्याला आवश्यकता असल्यास कोविड उपचार केंद्रात स्थलांतरित करण्यात येईल. औषध उपचारांदरम्यान आपल्याला अत्यावश्यक असल्यास त्याठिकाणी रेमडेसिविर इंजेक्शन देण्याची सुविधा शासनातर्फे मोफत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आपण स्वतः पीपीई किट घालून जिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णांच्या कक्षात जाऊन परिस्थिती पाहिली असता, त्याठिकाणी कोरोना रुग्णांसोबत नातेवाईकांची गर्दी होती. कोरोना झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आल्यास इतरांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असल्याने रुग्णासोबत नातेवाईकांना आणू नका. या महिन्याच्या सुरुवातीला कोरोनाबाधितांची संख्या वाढत गेली, परंतु आता ती कमी होत आहे. आपण सर्वांनी काळजी घेऊन जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या शून्यावर आणण्याचा निर्धार करूया, असे आवाहन पालकमंत्री पाडवी यांनी केले आहे.

Web Title: Let's defeat Corona using Trisutri - Guardian Minister's appeal to the people of the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.