मागणी नसल्याने लिंबू उत्पादक शेतकरी अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:29 IST2021-05-16T04:29:56+5:302021-05-16T04:29:56+5:30
लाॅकडाऊनमुळे सर्वच बाजारपेठा बंद आहेत. त्यात उन्हाळ्यात शीतपेयांची विक्री वाढते, त्यामुळे लिंबूला मागणी असते. परिणामी, दरही चांगला मिळतो, म्हणून ...

मागणी नसल्याने लिंबू उत्पादक शेतकरी अडचणीत
लाॅकडाऊनमुळे सर्वच बाजारपेठा बंद आहेत. त्यात उन्हाळ्यात शीतपेयांची विक्री वाढते, त्यामुळे लिंबूला मागणी असते. परिणामी, दरही चांगला मिळतो, म्हणून अनेक शेतकरी लिंबूची लागवड करून उत्पादन घेतात. मात्र, मागील वर्षाप्रमाणे यंदाही लॉकडाऊनमुळे लिंबूला मागणी नसल्याने, अनेक शेतकऱ्यांनी तोडच केली नाही. हे लिंबू एप्रिल महिन्यातही झाडावरच राहिल्याने ते पिवळे होऊन जमिनीवर गळून खाली पडत आहेत. मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यात लिंबू विक्रीचा हंगाम असतो व चांगला भावही मिळतो, पण सलग दुसऱ्या वर्षीही लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद असल्याने हा माल कसा व कोठे विकावा, ही समस्या शेतकऱ्यांसमोर उभी ठाकली आहे.
तोरखेडा परिसरात मोठ्या संख्येने लिंबूच्या बागा आहेत. उन्हाळ्याच्या हंगामात लिंबूला किलोला ८० ते १०० रुपये प्रती किलो भाव मिळतो, पण कोरोनाच्या वाढत्या उद्रेकामुळे शासनाने लाॅकडाऊन घोषित केल्याने आठवडे बाजारसह रेस्टॉरंट, हॉटेल, रसवंत्या बंद आहेत. त्यामुळे लिंबूची मागणी घटली, तसेच बाजारपेठेत ग्राहकही कमी झाले आहेत. आता फक्त मे महिनाचे काही दिवस माल विक्रीसाठी उरले आहेत. उन्हाळ्याच्या हंगामातही लिंबूला मागणी नसल्याने लिंबू उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.
‘सी’ जीवनसत्त्व असणाऱ्या लिंबाचा खाद्यपदार्थासह औषधांसाठी वापर होतो. कोरोनासह इतर अनेक आजार रोखण्यासाठी लिंबू आरोग्यवर्धक आहे. लिंबाला चांगला भाव मिळत असल्याने, तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात लिंबू लागवडीसह व्यवसायाकडे वळल्याचे दिसत आहे. सध्या सर्वत्र बंदची अवस्था असल्याने लिंबाची मागणी घटली असून, लिंबाच्या घटत्या किमतीने उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळविले आहे.
सद्यस्थितीत लिंबाच्या एका गोणीला ७०-८० रुपये असा दर मिळतो. हे लिंबू तोडण्यासाठी ४०-५० रुपयांचा खर्च येतो. त्यानंतर, वाहतूक व बाजारपेठेतील इतर खर्च पाहता शेतकऱ्यांच्या हाती काहीही येत नाही.
- महेश बिजलाल पाटील, लिंबू उत्पादक, फेस, ता.शहादा
मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यांत लिंबूला चांगली मागणी असते व भावही मिळतो, पण लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद असल्याने मालाला उठावच नसल्याने तो कसा व कोठे विकावा, ही खरी समस्या शेतकऱ्यांसमोर उभी ठाकली आहे.
- पतंगराव बाजीराव पाटील, लिंबू उत्पादक, तोरखेडा, ता.शहादा