गेल्या वर्षभरात जिल्ह्यात २०१ जणांनी संपविला जीवनाचा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:21 IST2021-06-22T04:21:20+5:302021-06-22T04:21:20+5:30
नंदुरबार : जिल्ह्यात १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ या काळात तब्बल २०१ जणांनी आत्महत्या करत जीवनाचा प्रवास ...

गेल्या वर्षभरात जिल्ह्यात २०१ जणांनी संपविला जीवनाचा प्रवास
नंदुरबार : जिल्ह्यात १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ या काळात तब्बल २०१ जणांनी आत्महत्या करत जीवनाचा प्रवास संपवला आहे. बेरोजगारी, व्यसनाधिनता, काैटुंबिक वाद, लाॅकडाऊनमुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणी यातून या आत्महत्या झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
नंदुरबार जिल्ह्यात एप्रिल २०२० मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण समोर आला होता. नंतरच्या काळात सुरू झालेले लाॅकडाऊन हे बेरोजगारीचे कारण ठरले. दरम्यान, सातत्याने कोरोना रुग्णांची वाढती संख्या उद्योगधंदे बंद ठेवण्यास परिणामकारक अशीच ठरली होती. यातून मार्ग काढून काहींनी नव्याने सुरुवात केली असली तरी, निवडक जणांनी आत्महत्येचा मार्ग पत्करला. जिल्ह्यात दर महिन्याला आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत. मध्यमवयीन वयोगटातील आत्महत्येचे प्रमाण अधिक आहे. हाताचे काम गेल्याने बेरोजगार होऊन नैराश्यातील व्यसनाधिनतेने अनेकांचा बळी घेतला आहे. लाॅकडाऊन काळात घरीच राहून एकाकी पडल्याने काहींनी आत्महत्येचा पर्याय स्वीकारला असल्याचेही समोर आले आहे.
कुटुंबाने काळजी घेण्याची गरज
कोरोनामुळे मानसिक आजारांमध्ये वाढ झाली आहे. सौम्य ते अगदी मनोरुग्ण होण्यापर्यंतच्या प्रकारांमध्ये वाढ झाल्याचे आढळले आहे. नोकरी नाही, पैसे नाहीत, कर्ज होणे यातून स्वभावात बदल होतात. झोप उडते, चिंता, भीती वाटणे अशी लक्षणे आढळल्यास कुटुंबीयांनीही आधी संबंधिताला धीर देणे आवश्यक आहे.
ध्येयप्राप्तीतील अपयश येणे, असाहाय्यतेची भावना, डिप्रेशन, आर्थिक समस्या, ताण-तणाव हे आत्महत्येसारख्या निर्णयाकडे व्यक्तीला घेऊन जातात. अशा प्रकारचे विचार येत असतील, तर घरातील व्यक्तींनी हे जाणून घेतले पाहिजे. त्यांच्यासोबत संवाद साधला पाहिजे, त्यांना समजून घेणे गरजेचे आहे.
- डॉ. राजेश मेश्राम, मानसोपचार तज्ज्ञ
अशा झाल्या नोंदी...
आरोग्य विभागाकडून प्राप्त नोंदीनुसार जिल्ह्यात एप्रिल २०२० मध्ये १०, मेमध्ये २०, जून १८, जुलै २२, ऑगस्ट १०, सप्टेंबर १८, ऑक्टोबर १७, नोव्हेंबर २०, डिसेंबर १५, जानेवारी २०२१ मध्ये २०, फेब्रुवारीत १७, तर मार्च महिन्यात १४ अशा २०१ जणांनी गेल्या वर्षात आयुष्य संपविल्याची माहिती देण्यात आली आहे.
हे दिवसही जातील
प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणींचा काळ येत असतो. नंतर आनंदाचे क्षणही येत असतात. हा विचार प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. कोरोना काळात पती-पत्नीमधील भांडणे वाढली. लॉकडाऊनमुळे प्रत्येकाचा स्पेस कमी झाला. परंतु, प्रत्येकाने एकमेकांच्या गरजांचा, भावनांचा आणि मनाचाही आदर केला पाहिजे.