दोन दिवसांच्या संचारबंदीनंतर मार्केटमध्ये मोठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:29 IST2021-04-06T04:29:16+5:302021-04-06T04:29:16+5:30

शहरासह तालुक्यात कोरोना संक्रमणामुळे बाधित रुग्णांची संख्या सहा हजारांपेक्षा अधिक झाली आहे. १५ मार्चपासून विक्रमी संख्येने बाधित आढळून येत ...

Large crowd in the market after a two-day curfew | दोन दिवसांच्या संचारबंदीनंतर मार्केटमध्ये मोठी गर्दी

दोन दिवसांच्या संचारबंदीनंतर मार्केटमध्ये मोठी गर्दी

शहरासह तालुक्यात कोरोना संक्रमणामुळे बाधित रुग्णांची संख्या सहा हजारांपेक्षा अधिक झाली आहे. १५ मार्चपासून विक्रमी संख्येने बाधित आढळून येत असल्याने तसेच अनेक मोठ्या गावांमध्ये रुग्णांची संख्या वाढत असल्याने दररोज सकाळी ७ ते दुपारी १ हा कालावधी वगळता प्रशासनाने संचारबंदी जारी केली आहे. याच कालावधीत शनिवार व रविवार जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. दोन दिवसांच्या या जनता कर्फ्यूला नागरिकांनी मोठ्या उत्साहात साथ दिली दोन दिवसांत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प झाले होते. तसेच समूह संपर्कातून कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे.

सोमवारी शहरातील बाजारपेठ व सर्व मुख्य रस्ते गजबजून गेले होते. स्टेट बँकेसमोर चौकात वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती या ट्रॅफिक जाममध्ये एक रुग्णवाहिका अडकली होते. अखेर नागरिकांच्या मदतीने तिला रस्ता मोकळा करून देण्यात आला. गेल्या आठवड्यात बँका बंद असल्याने सोमवारी सर्व बँकांच्या बाहेर सकाळी १० वाजेपासून मोठ्या रांगा लागल्या होत्या.

शासकीय रुग्णालयाबरोबरच खासगी रुग्णालयेही फुल्ल आहेत. गंभीर बाधित रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन बेड उपलब्ध होणे दुरापास्त झाले आहे. रुग्णवाहिकांची संख्याही तोकडी पडत आहे. त्यातच रेमडेसिवीर इंजेक्शनचाही मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. बाधित रुग्णांचे नातेवाईक औषधोपयोगी साहित्याची जुळवाजुळव करण्यासाठी सैरावैरा धावताना दिसून येत आहेत. मात्र दुसरीकडे वेगळेच चित्र दिसत आहे. काही नागरिक व विक्रेते शासनाचे नियम पायदळी तुडवताना दिसून येत आहेत.

वाढत्या रुग्णसंख्याला आळा बसावा, साखळी तुटावी म्हणून जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी शनिवार व रविवारी दोन दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते. त्यात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्वत्र प्रतिष्ठाने बंद ठेवली होती. नागरिकांनी दोन दिवस स्वयंस्फूर्तीने प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत घरातच थांबणे पसंत केले होते. परंतु सोमवारी पुन्हा सकाळपासूनच बाजारात विशेष करून गांधी पुतळा व भाजी मंडईमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती.

कठोर कार्यवाहीची गरज

कोरोना संक्रमणाची साखळी तुटावी व रुग्णसंख्या कमी व्हावी यासाठी तालुका प्रशासन रात्रंदिवस मेहनत घेऊन उपाययोजना करताना दिसून येत आहे. त्यासाठी दोन दिवस कडक जनता कर्फ्यू पाळण्यात आला. मात्र सोमवारी शहरात खरेदीसाठी मोठी गर्दी झाली. यावेळी गांधी पुतळा परिसरातील फळ व भाजीविक्रेते मास्क व सामाजिक अंतराचे पालन न करत सर्रास शासनाच्या नियमांना पायदळी तुडवत कोरोना संक्रमण वाढवण्यासाठी हातभार लावताना दिसून आले.

बेफिकिरी येईल अंगलट

सध्या तालुक्यात समूह संक्रमण वाढत असून, ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर रुग्ण बाधित होत आहेत. जिल्ह्यात तालुका हॉटस्पॉट ठरू पाहत आहे. प्रशासन आपल्या पद्धतीने उपाययोजना करत असले तरी नागरिकांनी गांभीर्याने घेत प्रशासनास सहकार्य करणे गरजेचे आहे. लाॅकडाऊन काळात काही वेळेसाठी नागरिकांनी नियमांचे पालन करून खरेदीचे आवाहन केले आहे. तरीही सोमवारी प्रचंड गर्दी बाजारात उसळली होती. त्यातच काही विक्रेते व नागरिकांनी मास्कदेखील घातले नाही याचाच अर्थ नागरिकांमध्ये अजूनही गांभीर्य नाही.

Web Title: Large crowd in the market after a two-day curfew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.