लालपरीत फक्त बसण्याची सुविधा, सुरक्षेबाबत मात्र प्रवाशांची दुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:31 IST2021-02-20T05:31:38+5:302021-02-20T05:31:38+5:30
नंदुरबार बसस्थानकावर करण्यात आलेल्या या पडताळणीत समस्या समोर आल्यानंतर त्याची पूर्तता होणार का, असा प्रश्न आहे. बसेस केवळ प्रवासापुरत्याच ...

लालपरीत फक्त बसण्याची सुविधा, सुरक्षेबाबत मात्र प्रवाशांची दुविधा
नंदुरबार बसस्थानकावर करण्यात आलेल्या या पडताळणीत समस्या समोर आल्यानंतर त्याची पूर्तता होणार का, असा प्रश्न आहे. बसेस केवळ प्रवासापुरत्याच मर्यादित असल्याचे दिसून आले आहे. बसेसची संख्या वाढवताना त्यातील स्वच्छतेची मात्र काळजी घेतली जात असल्याचे यावेळी दिसून आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आगारातून दररोज बसेस स्वच्छ करून पाठवल्या जात असल्याचे सांगण्यात आले. परंतु आग लागल्यास उपाययोजनांचे काय? याबाबत मात्र माहिती देण्यात आली नाही. बसेसमधून बाहेर पडण्यासाठी आपत्कालीन दरवाजांचे हँडल तुटल्याने ते अर्धे उघडेच असल्याचे एक-दोन बसेसमध्ये दिसले.
प्रथमोपचार पेट्या गायब
नंदुरबार बसस्थानकात तपासणी करण्यात आलेल्या बसेसमध्ये प्रथमोपचार पेट्या दिसून येत असल्या, तरी त्यात प्रथमोपचाराचे साहित्यच गायब होते. एका बसमध्ये पेटी सताड उघडी पडली होती, तर एकेठिकाणी बसमध्ये केवळ प्रथमोपचाराच्या सहित्याऐवजी कचरा पडलेला असल्याचे समोर आले. उर्वरित बसेसमध्ये पेट्याच नव्हत्या.
आगारात सर्रास ये-जा
शहराच्या मध्यभागी असलेले नंदुरबार बस आगार ही एक प्रशस्त जागा आहे. याठिकााणी बसचालक-वाहक, यांत्रिकी कर्मचारी, एसटीचे अधिकारी, कर्मचारी यांच्याव्यतिरिक्त इतर कोणीही ये-जा करू शकत असल्याचे दिसून आले. आगारात बाहेरुन येणारे काही प्रवासी दुचाकी लावून जात होते.
वायफाय नावालाच
बसेसमधून प्रवास करणा-या प्रवाशांना मोफत वायफाय देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यासाठी बसेसमध्ये बाॅक्स बसविण्यात आले आहेत. परंतु हे बाॅक्सही नावालाच असल्याचे दिसून आले. एसटीच्या एकाही प्रवाशाला वायफाय वापर करता येत नसल्याचे दिसून आले. यामुळे एसटीची ही सुविधाही नावालाच आहे.
राज्यात शिवशाही बसेसमध्ये आग लावल्याच्या घटनेनंतर एसटी अलर्ट झाल्याचे सांगण्यात येते. परंतु नंदुरबार आगारात अनेक ठिकाणी मोकळ्या व निवांत जागा बघून बिडी-सिगारेट ओढणारे सहज नजरेस पडले. दुपारच्यावेळी या आगाराच्या समोरील झाडांखाली एकदोघे विसावा घेत असल्याचे दिसून आले.
एसटी महामंडळाकडून गेल्या काही वर्षांत चांगल्या दर्जाच्या बसेसमधून प्रवासी वाहतूक करण्याचा प्रयत्न सुरु करण्यात आला आहे. परंतु शहरी आणि ग्रामीण भागातील खराब रस्ते या बसेसच्या बाह्य आणि अंतर्गत सुविधांवर ताण निर्माण करून तुटफूट करवत आहेत. यातून बसेसच्या काचा तुटणे, मागील सीटचे स्क्रू निधून ते तुटणे असे प्रकार सहज दिसून आले. काही ठिकाणी सीट फाटल्याने प्रवासी नाईलाजाने अवघडून बसले असल्याचे दिसून आले. ग्रामीण भागात धावणा-या बसेसमध्ये खिडक्या जाम झाल्याने त्या उघडत नसल्याची माहिती प्रवाशांकडून देण्यात आली.