लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ग्रामपंचायत स्थापनेला ४० वर्षे होवूनही गावातील एखाद्याचा मृत्यू झाल्यास अंत्यविधी नदीपात्रात करण्याची वेळ तालुक्यातील खामगाव येथील ग्रामस्थांवर येत आहे़ पावसाळ्यात नदीला पाणी असल्यास अंत्यविधी करणे मुश्किल होत असल्याने शासनाने किमान शेडतरी बांधून द्यावे अशी मागणी होत आहे़शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या खामगाव रोड परिसरातच जिल्ह्यात विकास घडवून आणणारी शासकीय कार्यालये आहेत़ शिवण नदी काठावरील खामगावाला अनेक विकासकामांची प्रतिक्षा आहे़ यात स्मशानभूमीचा समावेश आहे़ खामगाव येथे स्मशानभूमी नसल्याने ग्रामस्थ आजही अंत्यविधीसाठी शिवण नदी पात्राचा आधार घेतात़ पावसाळ्यात दुथडी भरून वाहणाऱ्या नदीच्या काठावर जाणेही अनेकवेळा मुश्किल होते़ अशात अंत्यविधी करण्यासाठी ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागते़ पावसाळ्यात लाकडे ओली होवून पेट घेत नाहीत यातून अडचणी येतात़ उघड्यावर अंत्यविधी झाल्यानंतर अस्थीं गोळा करतानाही अडचणींचा सामना ग्रामस्थांना करावा लागत असल्याने ग्रामपंचायतीने स्वतंत्र स्मशानभूमी बांधण्याची मागणी आहे़
शेडअभावी शिवण नदीत अंत्यविधीचा नाईलाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2020 12:48 IST