तळोदा तालुक्यातील दुर्गम भागात रस्त्याअभावी डोंगरातून हाेतेय पायपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:21 IST2021-06-22T04:21:04+5:302021-06-22T04:21:04+5:30
तळोदा तालुक्यातील अक्राणीमहल ते केलीपानी, बेडवाई, विहीरीमाळ ते अलवान असा रस्ता नसल्याने या पाड्यांवरील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंसह इतर साहित्य ...

तळोदा तालुक्यातील दुर्गम भागात रस्त्याअभावी डोंगरातून हाेतेय पायपीट
तळोदा तालुक्यातील अक्राणीमहल ते केलीपानी, बेडवाई, विहीरीमाळ ते अलवान असा रस्ता नसल्याने या पाड्यांवरील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंसह इतर साहित्य डोक्यावर घेऊन डोंगर माथ्याच्या पायवाटेने न्यावे लागते. अक्रानीमहल ते केलीपाणी दोन किलोमीटर, केलीपाणी ते बेडवाई अडीच किलोमीटर, बेडवाई ते विहीरीमाळ तीन किलोमीटर व विहिरीमाळ ते अलवान चार किलोमीटर असा पूर्ण रस्ताच नसल्याचे चित्र आहे. यामुळे अक्रानीमहलसह सिंधवाईपाडा, मोतीपाडा, पाटीलपाडा, खाकरबारीपाडा, पुंजारापाडा, बामणदेवपाडा, उमरदेवपाडा, दरवाजापाडा, केलीपाणी थेवापाणी, केलापाणी, पातीलपाडा व विहिरीमाळ बेडवाई, देव आवलीपाडा, सिंधवाई पाडा, बारीपाडा, राहिपाडा, मालपाडा व अलवान मोठीबारी, बोरिपाडा या गाव पाड्यांवरील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंसह, शेतीचे साहित्य, खते व बियाणे, घर बांधकामासाठी लागणारे साहित्य डोक्यावरच चढवून खडतर पायवाटेने डोंगर माथ्यावरून न्यावे लागत आहे. दरम्यान या भागात कोणाचा विवाह सोहळा असल्यास लग्नमंडप व इतर साहित्य हे डोक्यावर वाहून नेण्याची वेळ येते. अक्राणीमहल ते अलवान असा रस्ता व्हावा यासाठी येथील राकेश पटले, सायसिंग ठाकरे, रमेश ठाकरे, दारासिंग ठाकरे पाठपुरावा करूनही कारवाई न झाल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. विशेष बाब म्हणजे या परिसरातील गावा पाड्यातून कोणी आजारी पडल्यास त्याला खांद्यावर बसवून अथवा झोळी करून तळोद्याच्या दिशेने न्यावे लागत आहे.