प्रकाशा गावाजवळील गुजरात राज्याच्या सीमेवर कडक पहारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 13:45 IST2020-04-12T13:45:13+5:302020-04-12T13:45:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : गुजरात राज्याकडून येणारी वाहने लक्षात घेता व जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार प्रकाशा गावापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ...

प्रकाशा गावाजवळील गुजरात राज्याच्या सीमेवर कडक पहारा
लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : गुजरात राज्याकडून येणारी वाहने लक्षात घेता व जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार प्रकाशा गावापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गुजरात सीमेलगत पोलीस, महसूल विभाग व प्रकाशा ग्रामपंचायतीने बॅरिकेटींग लावून सील केले आहे. त्यामुळे याठिकाणी शुकशुकाट पसरला आहे.
सविस्तर वृत्त असे की, कोरोना जिल्ह्याच्या सीमेपर्यंत आला आहे. योग्यवेळी दक्षता घेतली नाही किंवा सतर्कता ठेवली नाही तर केव्हाही आपल्या जिल्ह्यात संसर्ग वाढू शकतो, असे जिल्हाधिकाऱ्यांनी शहादा येथील बैठकीत सांगितले होते. या बैठकीनंतर गुजरात व मध्य प्रदेश राज्याच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. त्यातच प्रकाशा येथील तळोदा चौकीपासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर गुजरात राज्य सुरू होते. गुजरात राज्यातून प्रवासी किंवा इतर वाहने येऊ नये यासाठी शुक्रवारपासूनच प्रकाशा ग्रामपंचायत, महसूल व पोलीस विभागानेही सीमा सील केली आहे. यामुळे दुचाकीधारक, मोठी वाहने यांचा प्रवेश बंद झाला असून प्रकाशा पोलीस दूरक्षेत्राचे हवालदार गौतम बोराळे, सुनील पाडवी, पंकज जिरेमाळी, प्रकाशाचे सरपंच सुदाम ठाकरे, ग्रामविकास अधिकारी बी.जी. पाटील, मंडळ अधिकारी मुकेश चव्हाण, तलाठी डी.एम. चौधरी हे याठिकाणी लक्ष ठेवून आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या वाहनाव्यतिरिक्त इतर कोणतेही वाहन महाराष्ट्र हद्दीत आले नाही. प्रकाशाकडून नंदुरबारकडे येताना तापी नदीचा पूल पार केल्यावर उजव्या हातालाच गुजरातकडे एक रस्ता जातो. याठिकाणीही येणाºया-जाणाºया वाहनांवर लक्ष ठेवण्यात येत आहे.
प्रकाशा गावात इतर वाहने परस्पर वस्तू विक्रीसाठी येत होते. त्यामध्ये कांदा, बटाटे, टरबूज आदींचा समावेश होता. मात्र त्यांनाही आता प्रकाशा ग्रामपंचायतीने नकार दिला आहे.
प्रकाशा हे गाव तालुक्यात मोठे असून येथे मोठ्या प्रमाणावर मजूरवर्ग वास्तव्यास आहेत. सध्या लॉकडाऊनमुळे हाताला काम नाही, सर्वत्र बंद असल्याने गरीब व गरजूंचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी पाच रुपयात पोटभर जेवण देणारे शासनाचे शिवभोजन थाळी केंद्र प्रकाशा येथे सुरू करावे, अशी मागणी होत आहे.