करण चाैफुलीवरील निवारा निरुपयोगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:20 IST2021-07-09T04:20:26+5:302021-07-09T04:20:26+5:30
मुरूम टाकून रस्ते दुरुस्तीचा प्रकार नंदुरबार : शहरालगतच्या ग्रामीण हद्दीत रस्ते तयार करण्याची मागणी होती. यासाठी नागरिकांचा पाठपुरावा सुरू ...

करण चाैफुलीवरील निवारा निरुपयोगी
मुरूम टाकून रस्ते दुरुस्तीचा प्रकार
नंदुरबार : शहरालगतच्या ग्रामीण हद्दीत रस्ते तयार करण्याची मागणी होती. यासाठी नागरिकांचा पाठपुरावा सुरू आहे. दरम्यान, ग्रामपंचायतींनी मुरूम टाकून रस्ते दुरुस्तीचा प्रयत्न केल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. याकडे जिल्हा परिषदेने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.
पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची फिरफिर
नंदुरबार : जिल्ह्यातील सहकारी, खासगी व राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये शेतकरी पीक कर्ज मागणीसाठी हजेरी लावत आहेत. खरीप हंगाम सुरू झाला असून, शेतकरी पेरणीच्या तयारीत आहेत. यासाठी बँकांकडून कर्ज मागणी होत आहे. जिल्हा बँक वगळता इतर कोणत्याही बँकेकडून पूर्ण क्षमतेने यंदा कर्ज देण्यात आलेले नसल्याची माहिती आहे. शेतकऱ्यांचीही फिरफिर होत आहे. जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
रस्ता सुरू करावा
नंदुरबार : अक्कलकुवा ते मोलगी दरम्यान सातपुड्यातील देवगोई घाटातील रस्ता रुंदीकरणाचे काम पूर्णत्वास आले आहे. या कामामुळे मोलगी ते अक्कलकुवा दरम्यानची वाहतूक इतर मार्गाने सुरू आहे. हे काम पूर्णत्वास आल्याने वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
घंटागाड्या सुरू करा
नंदुरबार : शहरालगतच्या होळ तर्फे हवेली, वाघोदा, पातोंडा, तसेच दुधाळे शिवारात रहिवासी वसाहती आहेत. येथील नागरिकांना गेल्या काही वर्षांपासून कचऱ्याची समस्या भेडसावत असून, त्या-त्या ग्रामपंचायतींनी घंटागाड्या सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
गुजरात राज्यातून बसेस सुरू झाल्याने दिलासा
नंदुरबार : काेरोनामुळे परराज्यातून होणाऱ्या वाहतुकीवर प्रतिबंध लावण्यात आला होता. अनलाॅकनंतरही महाराष्ट्र व गुजरात दरम्यान परिवहन महामंडळाची बसवाहतूक बंद होती. परंतु, शासनाच्या आदेशानंतर ही वाहतूक सुरू करण्यात आली आहे. गुजरात राज्यातून बसेस सुरू झाल्याने समाधान व्यक्त होत असून, गुजरात व अहमदाबादपर्यंतच्या फेऱ्या सुरू झाल्या असल्याने समाधान व्यक्त होत आहे.
खड्डा ठरतोय जीवघेणा
नंदुरबार : शहरातील करण चाैफुलीवर वळण रस्त्याच्या कडेला मोठा खड्डा पडला आहे. यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या वाहनांचा अपघात होण्याची शक्यता आहे. याकडे लक्ष देत बांधकाम विभागाने खड्डा बुजवून साईडपट्टी तयार करून द्यावी, अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.
दुरुस्त्या रखडल्या
अक्कलकुवा : तालुक्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांच्या इमारतींची दुरुस्ती करण्याची मागणी करूनही संबंधित विभागाने दुरुस्तीची कामे पूर्ण केली नसल्याची माहिती देण्यात आली आहे. तालुक्यात काही ठिकाणी शाळांना इमारतीच नाहीत.
किरकोळ विक्रेत्यांना समज देणे गरजेचे
नंदुरबार : कोरोनामुळे प्रशासनाच्या सूचनेनुसार भाजीपाला, फळ व खाद्यपदार्थ विक्रेत्यांना इतरत्र जागा देण्यात आली आहे. परंतु यातील काहीजण रस्त्यांवर गाड्या लावत असल्याने वाहतूकीला अडथळा निर्माण होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
बाजारातील गर्दीमुळे चिंता कायम
तळोदा : शहरातील बाजारपेठेत आठवडे बाजाराच्या दिवशी गर्दी होण्याचे प्रमाण अधिक आहे. यातून संसर्ग वाढीचा धोका असून, नागरिकांना समज देण्याची गरज आहे. मास्कचा वापर करण्यासाठीची जनजागृती व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.