केवळ चिवड्यावरच मैलोची पायपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 12:52 PM2020-03-28T12:52:05+5:302020-03-28T12:52:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनामुळे देशभर संचारबंदी लागू करण्यात आली. जनतेला बाहेर न पडण्याचे निर्देश देण्यात आले. त्यामुळे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनामुळे देशभर संचारबंदी लागू करण्यात आली. जनतेला बाहेर न पडण्याचे निर्देश देण्यात आले. त्यामुळे रोजगार देणाऱ्या कंपन्या बंद पडल्या, पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला. कोरोनाचा व्याप वाढत पुन्हा संचारबंदी वाढेल, अशा भितीपोटी जिल्ह्यातून स्थलांतरीत झालेले मजूर वाहतुक बंद असल्याने मैलो न् मैल पायपीट करीत मूळगावी परतू लागले आहे.
जिल्ह्यातील नागरिकांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या असल्या तरी खत्रीशिर रोजगार मिळत नाहीच. त्यामुळे जिल्ह्यातील बहुसंख्य मूजर गुजरात व महाराष्टÑाच्याच अनेक जिल्ह्यांमध्ये स्थलांतरीत झाले आहे. होळी साजरी झाल्यानंतर पुन्हा आपापल्या कामाच्या ठिंकाणी परतले होते. त्यात केवळ आदिवासी बांधवच असल्याचे आढळून येत आहे. होळी या एकमेव सणात कमलेली पुंजी काही अंशी खर्च झाली. तर याच कालावधीत प्रत्येक आदिवासी बांधव पुढील वर्षासाठी कुटुंबाचे आर्थिक नियोजन करीत असतो. अशा या नियोजनामुळे वर्षभर कमलेली रक्कम खर्च झाल्याने हे बांधव कंपन्या सुरुच राहतील या आशेवर जातांना केवळ प्रवासातील खर्चापुरतीच रक्कम सोबत घेऊन गेले होते.
या बांधवांना कोरोनामुळे कंपन्या बंद पडतील, रोजगार हिरावला जाईल याचा कुठलाही अंदाज आला नाही. नेहमीप्रमाणेच रोजगार मिळेल या आशेवर दोन-चार दिवस थांबले, त्यांच्याकडे असलेल्या किरकोळ रक्कमही संसारीक बाबींसाठी खर्ची घातला. असे असतांनाच २१ दविसांसाठीच देशभर संचारबंदी लागू करण्यात आली, कंपन्या लॉकडाऊन झाल्या. पर्यायाने जिल्ह्यातून स्थलांतरीत झालेल्यांचा रोजगार हिरावला गेला.
रोजगाराची समस्या असतांनाच कोरोनाची लागण होण्याची भिती देखील या बांधवांमध्ये निर्माण झाली. त्यामुळे वाहतुकीची सुविधा नसली तरी प्रत्येक ठिकाणी स्थलांतरीत झालेल्या बांधवांनी अंतराचा कुठलाही विचार न करता आपापल्या गावी पोहोचण्यासाठी दोन दिवसांपासून पायपीट सुरु केली आहे.
पायपीट करणारे नाशिक, औरंगाबाद तर गुकजरातमधील मांडवी, नवसारी, सुरत, सचिन, अहमदाबाद, बडोदा आदी ठिकाणाहून निघाले आहेत. त्यापैकी काही जण पोहोचले तर बहुतांश अजुनही रस्त्यावरच आहेत.
नाशिकहून ३६ तासात युवकांनी गाठले नंदुरबार
रोजगारानिमित्त नाशिक येथे धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील ५०० पेक्षा अधिक बांधव स्थलांतरीत झाल आहे. रोजगार बंद पडल्यामुळे पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला. त्यापैकी सुनिल पाडवी रा. कुंडल ता.धडगाव, गिरीष तडवी रा. जामली व संदीप वळवी रा.सल्लीबार ता. अक्कलकुवा हे तीन युवक नाशिक येथून २५ मार्च रोजी दुपारीच पायी निघाले होते. दिवस - रात्र चालत त्यांनी ३६ तासात त्यांनी नंदुरबार गाठले. वाहतुकच बंद असल्यामुळे रस्त्यात कुठलेही वाहन मिळाले नाही. झोप अन् भूकेमुळे ताहराबादजवळ त्यांनी एका किराणा दुकानातून घेतलेला चिवडा रस्त्याच्या कडेला बसुन सेवन करतांनाच एका पोलीसाने मानवता दाखवत त्यांच्याकडील डबा तिघांना दिल्याने पाटाचा आधार मिळाल्याचे त्यांनी सांगितले. तिघा युवकांच्या गावापर्यंत पोहोचण्यासाठी पुन्हा एक दिवस लागण्याची शक्यता आहे.