विसरवाडी येथील चौपदरीकरणाच्या कामामुळे अनेकांवर बेघर होण्याची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:29 IST2021-03-19T04:29:26+5:302021-03-19T04:29:26+5:30
निवेदनात म्हटले आहे की, विसरवाडी येथे आम्ही सर्व अर्जदार सन १९७० ते ७५ पासून वास्तव्यास असून, सद्यस्थितीत महामार्गाच्या चौपदरीकरणाचे ...

विसरवाडी येथील चौपदरीकरणाच्या कामामुळे अनेकांवर बेघर होण्याची वेळ
निवेदनात म्हटले आहे की, विसरवाडी येथे आम्ही सर्व अर्जदार सन १९७० ते ७५ पासून वास्तव्यास असून, सद्यस्थितीत महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून, या मार्गावर आमची घरे व व्यावसायिक प्रतिष्ठाने होती. निवासी घरापासून राज्य महामार्ग हा ३० ते ४० मीटर दक्षिण दिशेस होता. मात्र सन १९८४ मध्ये राज्य महामार्ग दुरुस्तीच्या नावाने तीस ते चाळीस मीटर गावाच्या उत्तर दिशेने वळवून आमची रहिवास असलेली घरे उठवण्यात आल्यामुळे आम्ही बेघर झालो होतो. त्यानंतर ग्रामपंचायतने अतिक्रमित रहिवासी असलेल्या सर्वांना सन १९८८ मध्ये रस्त्याच्या दुतर्फा म्हणजे दक्षिण व उत्तर दिशेस राहणे कामी व घर बांधण्यासाठी पत्र दिले होते. त्याअनुषंगाने संबंधित रहिवाशांनी पक्के व पत्र्याचे तसेच आरसीसीचे पक्के घर बांधून रहिवास म्हणून वापर करत आहे. परंतु राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात झाल्याने येथील रहिवाशांना मात्र कुठल्याही प्रकारची शासकीय नोटीस व आदेश न देता रस्त्याचे काम करणारे ठेकेदारांचे कर्मचारी येऊन संबंधित रहिवाशांना व व्यवसायिकांना ते राहत असलेली जागा मोकळी करून देण्यासाठी तोंडी सूचना देत आहेत. कोणतीही लेखी सूचना न देता जागा रिकामी करून देण्यास सांगून एक प्रकारे आमच्यावर अन्याय केला जात असल्याचे बोलले जात आहे.
राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण गावाबाहेरून होणेसाठी ग्रामपंचायत विसरवाडी यांनी सन २०१२ ते १५ पर्यंत वेळोवेळी तालुका, जिल्हा, राज्यस्तरावर तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे. तरीदेखील आमचा कोणताही विचार करण्यात आलेला नाही. महामार्गाच्या कामामुळे सर्व बाधित रहिवाशांवर बेघर होण्याची वेळ आली असून, दुकानेही जात असल्याने अनेकांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. अशा बिकट स्थितीत आमचे मनोधर्य खचत असून, संबंधित वरिष्ठांनी भरपाई देऊन व पुनर्वसन करून आम्हाला न्याय द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. न्याय न मिळाल्यास आम्हाला इच्छामरणाची परवानगी द्यावी अशी मागणी बाधितांनी निवेदनाद्वारे केले आहे.
निवेदनावर सरपंच बकाराम गावित, संतोष चौधरी, भटू पाटील, मोहन गोसावी, विजय रमणलाल अग्रवाल, शंकर गावीत, कर्तारसिंग राजपूत, तापाबाई सावळे, शहीदा खाटिक, जीवन तांबोळी, किसन हिरे, मायाबाई दाभाडे, दिनेश जयस्वाल, नीलेश जयस्वाल, सचिन लोहार यांच्यासह ६० नुकसानग्रस्त रहिवाशांच्या सह्या व अंगठे आहेत.