लघु सिंचन प्रकल्पांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्षच तळोदा तालुक्यातील सिंचन प्रकल्पानी गाठला तळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:31 IST2021-03-27T04:31:13+5:302021-03-27T04:31:13+5:30
तळोदा तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता व्हावी, यासाठी सातपुड्याच्या पायथ्याशी रोझवा, पाडळपूर, गढावली, सिंगसपूर या लघुसिंचन ...

लघु सिंचन प्रकल्पांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्षच तळोदा तालुक्यातील सिंचन प्रकल्पानी गाठला तळ
तळोदा तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता व्हावी, यासाठी सातपुड्याच्या पायथ्याशी रोझवा, पाडळपूर, गढावली, सिंगसपूर या लघुसिंचन प्रकल्पांची निर्मिती करण्यात आली आहे. परिसरातील भूजल पातळी वाढण्यास महत्वपूर्ण भूमिका असते. रोझवा जलसिंचन प्रकल्पाची एकूण जलसाठवणूक क्षमता १.७४ दशलक्ष घनमीटर आहे तर पाडळपूर प्रकल्पाची क्षमता १.१७ दशलक्ष घनमीटर, गढावली प्रकल्पाची ०.९४ दशलक्ष घनमीटर व सिंगसपूर प्रकल्पाची २.१७ दशलक्ष घनमीटर एवढी जलसाठा क्षमता आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी दरवर्षी होणाऱ्या दमदार पावसामुळे चारही प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरतात. मात्र या प्रकल्पांच्या देखभाल दुरुस्तीकडे प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले असून, या प्रकल्पांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून साठवण भिंतीना लागलेल्या गळतीमुळे या प्रकल्पातील मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे.
या प्रकल्पात असणाऱ्या जलसाठ्यावर सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या परिसरातील शेतकऱ्यांचा रब्बी व खरीप अनुदान अवलंबून असते. परंतु या प्रकल्पांच्या गळतीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाहत जाऊन प्रकल्पांचा मूळ हेतूच साध्य होत नसल्याचे दिसून येते. प्रकल्पातील पाण्याचा पूर्णक्षमतेने शेतकऱ्यांना वापर करता येत नाही.
दरवर्षी या प्रकल्पांची आवश्यक दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत असते, परंतु या प्रकल्पांच्या दुरुस्तीबाबत संबंधित विभागाकडून अद्याप अद्याप कोणत्याही प्रकारच्या ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या लघु सिंचन प्रकल्पात होणारा पाणीसाठा वर्षभर टिकावा यासाठी पावसाळा सुरू होण्यापूर्वी या प्रकल्पांची गळती रोखण्यासाठी दुरुस्ती करणे गरजेचे आहे. संबधितानी लक्ष देण्याची गरज आहे.
सिंचन प्रकल्पांना गळती
दरवर्षी हे चारही प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरूनही सिंचन प्रकल्पांना असलेल्या गळतीमुळे प्रकल्पातील जलसाठा अल्पजीवी ठरत आहे. पाणी वाहून जात असल्याने उन्हाळ्याच्या सुरुवातीला यातील जवळपास सर्वच जलसिंचन प्रकल्प तळ गाठतात . प्रकल्पांना असणाऱ्या गळतीमुळे दरवर्षी हजारो लिटर पाणी वाहून जात असल्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो.