स्टेट बँकेतील कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांचे समाधान ऐवजी दुरुत्तर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:24 IST2021-05-30T04:24:19+5:302021-05-30T04:24:19+5:30
शासकीय विश्रामगृह चौकात कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत नोकरदार, शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, व्यावसायिक आदींचे खाते ...

स्टेट बँकेतील कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांचे समाधान ऐवजी दुरुत्तर
शासकीय विश्रामगृह चौकात कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत नोकरदार, शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, व्यावसायिक आदींचे खाते उघडले आहे. बँक ग्राहकांचे अनेक आर्थिक व्यवहार हे बँकेतून होत असल्याने ग्राहक राष्ट्रीयकृत बँक म्हणून स्टेट बँकेला प्राधान्य देतात. येथील स्टेट बँकेच्या शाखेत दैनंदिन बँकिंग व्यवहारासाठी दहा ते बारा काऊंटर आहेत. मात्र फक्त तीन ते चार काउंटरवर कर्मचारी उपस्थित राहत असल्याचे चित्र नेहमीच दिसून येते. बँक ग्राहकांना पैसे देव-घेवसह अन्य व्यवहारासाठी बँकेत जाणे अपरिहार्य ठरते. मात्र, येथील कर्मचारी समाधानकारक उत्तर देत नसल्याने ग्राहक संभ्रमित होतात. याठिकाणी ‘तीन’ क्रमांकाचे काऊंटरवर जा. असे सांगून ग्राहकांची फिरवाफिरव केली जाते. ‘तीन’ क्रमांकाच्या काउंटरवर सतत गर्दी राहत असून अन्य काउंटरवर कर्मचारीच नसल्याने एकाच ठिकाणी रोज गर्दी दिसून येते. याबाबत शाखा अधिकारी यांच्याकडे ग्राहक तक्रार करण्यास गेले असता जुजबी माहिती देऊन ग्राहकांना रवाना केले जाते. स्टेट बँकेच्या येथील शाखेत पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध असताना फक्त तीन ते चार काउंटर सुरू ठेवल्याने गर्दी होत असते. येथील ‘तीन’ नंबरच्या काउंटरवरील कर्मचारी वगळता इतर कर्मचारी ग्राहकांना समाधानकारक उत्तरे देत नसल्याने हमरीतुमरीचे प्रसंग येतात. कर्मचारी, अधिकारी तक्रारींकडे दुर्लक्ष करीत असल्याने गरजवंत ग्राहकांना निमूटपणे गर्दीत उभे राहणे क्रमप्राप्त ठरते.
याशिवाय सध्या कोरोना संक्रमणाची भीती असतांना बँकेत नियोजन केले नसल्याने आत तसेच बाहेर ग्राहकांची गर्दी उसळते. यातून संपर्कामुळे कोरोनाचा प्रसार झाल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
एटीएम मशीन सुरू करण्याची मागणी
बँकेच्या शाखेबाहेर एटीएम मशीन लावण्यात आले आहे. याठिकाणी तीन ते चार मशीन असून हे मशीन सातत्याने नादुरुस्त असतात. चारपैकी एखाद्याच मशीनमधून पैसे निघत असल्याने एटीएम मशीनवर गर्दी होते. ग्राहकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी एटीएम मशीन दुरुस्त करण्यात यावे व त्यात पुरेशी रक्कम ठेवण्यात यावी, अशी मागणी ग्राहकांकडून करण्यात येत आहे.