लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : गुजरात राज्यातून येणारी वाळू रॉयल्टीची आहे की नाही तसेच वाहनात भरण्यात आलेली वाळू ओव्हरलोड आहे का? याची तपासणी करण्यासाठी गुजरात-महाराष्ट्राच्या सीमेवर नंदुरबार जिल्हा महसूल विभागाने पथक नेमले असून वाळूने भरलेल्या वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.सविस्तर वृत्त असे की, गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणावर महाराष्टÑात वाळू वाहतूक सुरू आहे. शिरपूर, नाशिक, मुंबई, ठाणे, मध्य प्रदेशातील पानसेमल, खेतिया, इंदूर आदी मोठ्या शहरांमध्ये दिवसभरात गुजरात राज्यातील तापी नदीतील सुमारे ३०० ट्रक भरुन वाळूची वाहतूक होत आहे. या वाळूची रॉयल्टी भरली आहे की नाही, रॉयल्टी ची पावती, त्याचा दिनांक व वेळ तसेच वाहनात भरलेली वाळू योग्य प्रमाणात भरली आहे की नाही हे सर्व तपासणीसाठी नंदुरबार जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शहाद्याचे प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे यांनी दिलेल्या आदेशान्वये शहादा तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांनी १२ पथके नेमली आहेत. प्रत्येक पथकाची वेगवेगळ्या दिवशी नेमणूक करण्यात येत आहे. त्यात महसूल, पोलीस व परिवहन विभागाचे अधिकारी आहेत. तळोदा चौफुलीवर हे पथक थांबून वाळूने भरलेल्या वाहनांची तपासणी करतात. अनाधिकृत वाळू वाहतूक व ओव्हरलोड वाहनांवर दंडात्मक कारवाई या पथकांकडून करण्यात येत आहे. पथकात मंडळ अधिकारी मुकेश चव्हाण, तलाठी डी.एम. चौधरी, पोलीस गौतम बोराळे आदींचा समावेश आहे.गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणावर वाळू वाहतूक होते. दिवसाला सुमारे २०० वाहने शहादा तर २०० वाहने नंदुरबारकडे जातात. बेफाम वेगाने जाणाऱ्या वाळू वाहतूक करणाºया वाहनांवर कोणाचाच वचक नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. पाणीमिश्रीत वाळू वाहून नेताना त्यातून निघणारे पाणी हे मागून येणाºया वाहनांवर उडत असते. दुचाकीस्वारांच्या अंगावर हवेने पाण्याचे शिंतोडे उडाल्याने अपघातही होतात. रात्री-अपरात्री ही वाहने वेगाने चालतात. बेशिस्तपणे वाळूची वाहतूक करणाºया वाहन चालकांवर परिवहन विभाग व पोलिसांनी जागोजागी थांबून दंडात्मक कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
गुजरातकडून येणाऱ्या वाळू वाहनांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 13:30 IST