आमदारांकडून धरणांची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:28 IST2021-03-21T04:28:41+5:302021-03-21T04:28:41+5:30
शहादा तालुक्यातील काकर्दा, तोरखेडा, काटघर, आभनपूर, कोंढावळ, तिखी धरणासह जयनगर, धांद्रे प्लॉट हद्दीतील लोकसहभागातून बांधण्यात आलेले पाझर तलाव, ...

आमदारांकडून धरणांची पाहणी
शहादा तालुक्यातील काकर्दा, तोरखेडा, काटघर, आभनपूर, कोंढावळ, तिखी धरणासह जयनगर, धांद्रे प्लॉट हद्दीतील लोकसहभागातून बांधण्यात आलेले पाझर तलाव, नदी-नाल्यावरील पाझर तलाव, केटीवेअर बंधारे, सिमेंट बंधाऱ्यांची पाहणी आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी करून अधिकाऱ्यांना सूचना देत शेतकऱ्यांशी संवाद साधला.
अभानपूर धरण कोणत्या विभागाकडे आहे हे अधिकाऱ्यांनाच सांगता येईना
अभानपूर धरणाची पाहणी करताना सर्वच विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या धरणात मोठ्या प्रमाणावर गाळ साचत असल्याने पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे खोलीकरण व्हावे यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करावा. शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत अल्प प्रमाणात पाणी निचरा होत असल्याने कूपनलिका, विहिरींना पाहिजे तशी पाण्यात वाढ होत नसल्याने तसेच धरण परिसरातील झाडेझुडपे तोडून साफसफाई करीत किरकोळ दुरुस्ती करून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. संपूर्ण धरणाची माहिती जाणून घेत आमदार डॉ.गावीत यांनी संबंधित धरणाचे बांधकाम केव्हा व कसे झाले. धुळे व नंदुरबार जिल्ह्याची हद्द कशी व कुठपर्यंत आहे अशी विचारणा केली. हा प्रकल्प कोणत्या विभागाकडे आहे, असा प्रश्न आमदारांनी अधिकाऱ्यांना विचारला असता संबंधित उपस्थित वेगवेगळ्या विभागाच्या अधिकाऱ्यांना काहीच सांगता येईना. थोड्या वेळानंतर मध्यम प्रकल्प प्रकाशा विभागाच्या अनुभवी असलेल्या अधिकाऱ्याने हा प्रकल्प मृदजलसंधारण विभागाकडे असल्याचे सांगितले. अधिकाऱ्यांना अभानपूर धरण कोणत्या विभागाच्या देखभालीखाली आहे हे सांगता येत नसेल तर शेतकरी व सर्वसामान्य जनतेचे काय? असा प्रश्न उपस्थित करून आश्चर्य व्यक्त केले.
काटघर धरणाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. गेल्या दोन वर्षापासून मोठ्या प्रमाणावर पावसाळा झाला तरी धरणामध्ये पाणी न थांबता सँडवलद्वारे पाणी निघून जात असल्याने त्वरित दुरुस्तीसाठी प्रस्ताव सादर करावा. इस्टिमेट तयार करा व शेतकऱ्यांचा हित जोपासणारा मोठा प्रकल्प असून तोरखेडा, काकरदा, फेस येथील शेतकऱ्यांची हजारो हेक्टर शेती ओलिताखाली येऊ शकते. मात्र सँडवलद्वारे पाणी निघून जात असल्याने धरण कोरडेठाक पडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची बहुतांश जमीन कोरडवाहू झाली आहे.