महागाईने थंडावली उज्ज्वलाची शेगडी अन् घरातील सिलिंडर ठरतेय बेगडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:39 IST2021-02-25T04:39:50+5:302021-02-25T04:39:50+5:30
तालुक्यातील काकर्दे, शिंदगव्हाण यासह पूर्व भागातील अनेक गावांमध्ये उज्ज्वला योजनेंतर्गत सिलिंडर आणि शेगडी यांचे वाटप करण्यात आले आहे. यातून ...

महागाईने थंडावली उज्ज्वलाची शेगडी अन् घरातील सिलिंडर ठरतेय बेगडी
तालुक्यातील काकर्दे, शिंदगव्हाण यासह पूर्व भागातील अनेक गावांमध्ये उज्ज्वला योजनेंतर्गत सिलिंडर आणि शेगडी यांचे वाटप करण्यात आले आहे. यातून धूरमुक्त स्वयंपाकघर अशी शासनाची योजना होती. परंतु गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यात ठिकठिकाणी सिलिंडर आणि शेगड्या देण्यात आल्या. परंतु यानंतरही स्वयंपाक घरे धूरमुक्त नाहीत. यात दरवाढीमुळे हे सिलिंडर थेट बेगडी ठरत आहेत. या भेटीदरम्यान महिलांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत प्रतिसाद दिला.
कमाई आकडे कमी झाल्याने अडचणी
नंदुरबार तालुक्याच्या पूर्व भागातील बहुतांश कुटुंबाचा उदरनिर्वाह हा शेतमजुरीवर चालतो. यात काही जण शहरात कामाला येतात. यातून तुटपुंजे उत्पन्न मिळते.
शेतात मजुरीचे दिवसाला १५० रुपये मिळतात. यातून किराणा मालाची खरेदी व इतर खर्च वजा जाता काहीच उरत नाही. अशा ८०० रुपयांचे सिलिंडर खरेदी करणे जमत नसल्याची माहिती गृहिणींकडून देण्यात आली.
दिवसभर शेतात कामाला जाते. परंतु रोज शेतात काम मिळेल असे नाही. यातून शेगडी आणि सिलिंडर मिळाले असले तरी ते भरण्यासाठी पैसे नाहीत. यातून मार्ग काढण्यासाठी सरपण गोळा करून आणतो. जुनाट लाकडे पडून आहेत. त्यांचाही वापर करण्यात येतो. यातून चुलीवर स्वयंपाक करते.
-महिला लाभार्थी,
काकर्दे ता.नंदुरबार.
सरपण गोळा करून चुलीवर स्वयंपाक करत आहे. उज्ज्वलाचे सिलिंडर मिळाल्याचा आनंद होता. परंतु नंतर ते भरण्यासाठी पैसे जमवणे अडचणीचे ठरत आहे. आता ८०० रुपयांपर्यंत सिलिंडर मिळत असल्याचे सांगण्यात आले आहे. यातून चुलीवरच स्वयंपाक करण्यावर भर देत आहे.
-महिला लाभार्थी
काकर्दे ता. नंदुरबार. सिलिंडरच्या दरांमध्ये झालेली वाढ ही सर्वांनाच अडचणीची ठरली आहे. यातून घरातील खर्चात कपात करावी लागली आहे. ग्रामीण भागात सिलिंडरचा वापर हा फार कमी प्रमाणात करण्यात येतो. यातून गृहिणी ह्या बचतीवर भर देतात. आता सिलिंडरचे दर वाढल्याने सर्वच ठिकाणी गॅसऐवजी सरपण घेऊन चूल पेटवली जात आहे.
- महिला लाभार्थी, वावद, ता. नंदुरबार. ,
ग्रामीण भागात पूर्वी सिलिंडरच्या गाड्या वेळेवर येत नव्हत्या. उज्ज्वलातून सिलिंडर दिल्यानंतर काहीवेळा गाड्या येत होत्या. तर कधी येतच नव्हत्या. आता महागाई झाल्याने अनेकांनी बुकिंग बंद केली आहे. परिणामी एक-दोन सिलिंडरसाठीही गाडी येत नाही. यामुळे बहुतांश महिला ह्या सरपणचा वापर करून स्वयंपाक करत आहेत.
-महिला लाभार्थी, शनिमांडळ, ता. नंदुरबार.
उज्ज्वला गॅस योजनेत शेगडी मिळाल्यानंतर बऱ्याच उशिराने सिलिंडर मिळाले, परंतु ते भरण्यासाठी पैसे जमत नसल्याने बऱ्याचवेळा ते रिकामे पडून राहते. दिवसातून १५० ते २०० रुपये मजुरीचे येतात. नवरा-बायको मिळून ४०० रुपये येत असले तरी घरातील खाणारी तोंडे आणि खर्च यातून पैसे उरणार तरी किती असा प्रश्न आहे.
-महिला लाभार्थी,
शनिमांडळ, ता. नंदुरबार