ग्रामरक्षक दल स्थापन करण्यासंदर्भात गावपातळीवर उदासीनता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:31 IST2021-04-01T04:31:03+5:302021-04-01T04:31:03+5:30
तळोदा : जिल्हा प्रशासनाने वाढत्या कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्याबरोबरच ग्रामीण भागात ग्रामरक्षक दल स्थापन करण्याच्या सूचना ...

ग्रामरक्षक दल स्थापन करण्यासंदर्भात गावपातळीवर उदासीनता
तळोदा : जिल्हा प्रशासनाने वाढत्या कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्याबरोबरच ग्रामीण भागात ग्रामरक्षक दल स्थापन करण्याच्या सूचना संबंधिताना दिल्या असल्या तरी प्रत्यक्ष गावपातळीवर हे दल स्थापन करण्याबाबत उदासीनता असल्याचे चित्र आहे. कारण काही गावेवगळता अजूनही तेथील प्रशासनाने कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कसा थांबेल, असा प्रश्न उपस्थित केला जात असून, या प्रकरणी पंचायत समिती प्रशासनाने कडक तंबी द्यावी, अशी मागणी ग्रामीण जनतेने केली आहे.
कोरोना महामारीने दिवसेंदिवस उग्र स्वरूप धारण केले आहे. कारण रोजच अशा रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शासकीय व खासगी रुग्णालये अशा रुग्णांनी अक्षरशः हाउसफुल्ल झाली आहेत. एवढेच नव्हे तर जिल्हा रुग्णालयाला हाउसफुल्लचा बोर्ड लावावा लागला आहे. एवढी चिंताजनक परिस्थिती नंदुरबार जिल्ह्यात झाली आहे. शहरापुरता मर्यादित असलेल्या कोरोनाने ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात धडक दिली आहे. तालुक्यातील रांझणीसारखे गाव हॉटस्पॉट बनले आहे. कोरोनच्या या प्रचंड प्रमाणामुळे जिल्हा प्रशासनाने गुरुवारपासून लॉकडाऊन केले आहे. या शिवाय उपाययोजनादेखील सुरू केल्या आहेत. ग्रामीण भागात गावपातळीवर गावाचे पदाधिकारी, ग्रामसेवक, तलाठी व युवक यांचे ग्रामरक्षक दल स्थापन करण्याचे निर्देश प्रशासनास दिले आहेत. तथापि बहुसंख्य गावात असे ग्रामरक्षक दल स्थापन करण्याबाबत उदासीन धोरण घेतल्याचं चित्र आहे. काही गावेवगळता अजूनही कार्यवाही करण्यात आलेली नाही. लेखी आदेश आले नसल्याचे काहींचे म्हणणे आहे, तर पंचायत समितीकडून ग्रामसेवकांना तोंडी आदेश देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. ३ मार्च रोजी ग्रामरक्षक दल स्थापन करण्याचे आदेश देण्यात आल्याचे पंचायत समितीने सांगितले. वास्तविक जिल्हा प्रशासनाने आदेश काढून पाच, सहा दिवस झाले आहेत. तरीही त्याची अंमलबजावणी ग्रामीण भागात अजून करण्यात आलेली नाही.
कोरोनाची लागण झालेल्या रुग्णावर वाॅच ठेवणे, शेजारील राज्यात, जिल्ह्यात ये-जा टाळणे, ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण, प्रवेशाचे सबळ पुरावे पाहणे, नागरिकांमध्ये जनजागृती, कोरोनाबाधित रुग्णाचे अलगीकरण करत त्यांचावर लक्ष्य ठेवणे, प्रतिबंधात्मक क्षेत्रातील व्यक्ती बाहेर ये-जा करणार नाही याची दक्षता घेणे. अशा महत्त्वाच्या बाबींसाठी ग्रामरक्षक दलाची स्थापना करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. मात्र त्यांच्या आदेशालाच हरताळ फासला जात आहे. बाधित गावामध्ये अशा रुग्णांकडून शासनाचे नियम धाब्यावर बसवत कुठेही मोकाट फिरत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे संसर्ग वाढत असल्याचे म्हटले जात आहे. वरिष्ठ प्रशासनानेदेखील याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ग्रामीण जनतेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
पंचायत समितीने ग्रामपंचायतीकडून मागवला अहवाल
तळोदा तालुक्यातील ग्रामीण भागातील ६४ ग्रामपंचायतींच्या प्रशासनास गाव पातळीवर कोरोना जनजागृतीबरोबर ग्रामरक्षक दल स्थापन करण्यासंदर्भात ३ मार्च रोजीच लेखी आदेश दिले आहेत. या उपरांतही पुन्हा बैठकीत आदेश दिले आहे. ग्रामपंचायतींनी कार्यवाहीदेखील केली आहे. तरीही दलाच्या स्थापनेबाबत लेखी अहवाल सादर करण्याची सूचना देण्यात आली आहे. त्याचबरोबर नियमित साफसफाई, सॅनिटायझेशन करण्याची सूचनादेखील देण्यात आल्या आहेत.
तळोदा शहरातही सूचना फलक लावण्याबाबत व्यावसायिकांची उदासीनता
तळोदा शहरातदेखील आपल्या दुकानात येणाऱ्या ग्राहकांना मास्क, सामाजिक दुरीसाठी फलक लावण्याचे सक्तीचे केले आहे. असे असताना काही मोजके दुकानदारवगळता सर्वांनीच याकडे हेतुता दुर्लक्ष केले आहे. याबाबत संबंधित प्रशासनानेसुद्धा याकडे गांभीर्याने घेतले नसल्याने व्यावसायिकांनीही महत्त्व दिलेले नाही. यामुळे दुकानामध्ये प्रचंड गर्दी दिसून येत आहे. शिवाय सोशल डिस्टन्सिंगचा अक्षरशः फज्जा उडाल्याचे चित्र आहे. महसूल प्रशासनाने शहरातील असे विदारक चित्र दूर करण्यासाठी फलक लावण्याची व्यावसायिकांना सक्ती करावी, अशी अपेक्षा आहे.
गावात ग्रामरक्षक दल स्थापन करण्याबाबत ग्रामपंचायत प्रशासनास लेखी सूचना दिल्या आहेत. शिवाय बैठकीतदेखील विस्तार अधिकारी यांनी संबंधिताना सूचना दिल्या आहेत. तरीही तसा अहवाल त्यांच्याकडून मागवला आहे. - सावित्री खर्डे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, तळोदा.