दुर्गम भाग : पावसाळ्यापूर्वी ११ हजार क्विंटल धान्य रवाना

By Admin | Updated: June 1, 2014 00:11 IST2014-06-01T00:11:21+5:302014-06-01T00:11:21+5:30

नंदुरबार : जिल्ह्यातील दुर्गम भागातील ३५ गावांमध्ये पावसाळ्यापूर्वी चार महिन्यांचा धान्यसाठा उपलब्ध करून दिला जात आहे. जवळपास तीन हजार ७०० क्विंटल गहू व सात हजार ७०० क्विंटल तांदळाचा समावेश आहे.

Inaccessible part: 11 thousand quintals of grains before the monsoon | दुर्गम भाग : पावसाळ्यापूर्वी ११ हजार क्विंटल धान्य रवाना

दुर्गम भाग : पावसाळ्यापूर्वी ११ हजार क्विंटल धान्य रवाना

 नंदुरबार : जिल्ह्यातील दुर्गम भागातील ३५ गावांमध्ये पावसाळ्यापूर्वी चार महिन्यांचा धान्यसाठा उपलब्ध करून दिला जात आहे. जवळपास तीन हजार ७०० क्विंटल गहू व सात हजार ७०० क्विंटल तांदळाचा समावेश आहे. याशिवाय नवसंजीवन योजनेतील एकूण ६४ गावांमध्ये धान्यसाठा करून ठेवण्यात आला आहे. यंदा ज्वारी नसल्याने ती रेशन दुकानांवर दिली जाणार नाही. दुर्गम भागात पावसाळ्यात संपर्क तुटतो. अनेक ठिकाणी जाण्यासाठी रस्ते नसतात. त्यामुळे प्रशासन अशा गावांमध्ये जून ते सप्टेंबर अर्थात पावसाळ्याच्या चार महिन्यांचा धान्यसाठा आधीच पाठवून देत असते. त्यामुळे दुर्गम भागातील रेशन शिधापत्रिकाधारकांना वेळेवर धान्य मिळू शकते. यंदादेखील जिल्हा प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी धान्यसाठा पाठविण्याचे काम सुरू केले आहे. येत्या आठवडाभरात ते पूर्ण होणार आहे. द्वारपोच जिल्ह्यात द्वारपोच योजनेअंतर्गत शासन रेशन दुकानांना शिधापुरवठा करीत असते. जे दुकानदार स्वत:च्या वाहनाने शिधा नेत असतात त्यांना भाड्याची उचल दिली जाते. द्वारपोचसाठी जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळाची वाहने लावण्यात आली आहेत. जिल्ह्यात ९९७ रेशन दुकानातील एकूण तीन लाख १७ हजार शिधापत्रिकाधारक आहेत. त्यांच्यासाठी दर महिन्याला गहू व तांदूळ उपलब्ध करून देण्यात येतो. जिल्ह्यातील नर्मदा काठावरील २७ गावे व इतर आठ गावे अशा ३५ गावांना गहू व तांदूळ पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे. या ३५ गावांना संपूर्ण चार महिन्यांचा गहू व तांदळाचा साठा दिला जाणार आहे. या गावांमध्ये पावसाळ्यात सरदार सरोवर प्रकल्पाच्या पाण्याच्या फुगवट्याने बेटाचे स्वरूप येते. त्यामुळे तीन महिने या गावांशी रस्त्याने संपर्क तुटतो. याअंतर्गत या गावांना गहू व तांदूळ पुरविण्यात आला असल्याचे पुरवठा विभागातर्फे सांगण्यात आले. तांदळाचा सर्वाधिक साठा जिल्ह्यात तांदळाचा सर्वाधिक साठा उपलब्ध आहे. सात हजार ७०० क्विंटल तांदूळ दुर्गम भागातील गावांना दिला जाणार आहे तर तीन हजार ७०० क्विंटल गहूदेखील पुरविण्यात येत आहे. शिधापत्रिकाधारकांच्या संख्येनुसार व युनिटनुसार हे वाटप करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. साठवण्याची समस्या दुर्गम भागात एका रेशनदुकानदाराला चार महिन्यांचा धान्यसाठा पुरविला जात असला तरी एवढा साठा ठेवण्याची समस्या निर्माण होते. कारण दुर्गम भागात पक्के शेड नाही, कुडाच्या घरात हा धान्यसाठा राहतो. संततधार पावसात तसेच ओलाव्यामुळे तो खराब होण्याची देखील शक्यता असते. २५ गुदामात साठा जिल्ह्यात एकूण २४ गुदाम शासकीय तर एक गुदाम खाजगी स्वरूपात आहे. एकूण २५ गुदामात जिल्ह्यातील धान्यसाठा साठविण्यात येतो. दर महिन्याला दोंडाईचा रेल्वेस्थानकातून येणारे धान्य त्या त्या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या गुदामात ठेवण्यात येते.

Web Title: Inaccessible part: 11 thousand quintals of grains before the monsoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.