आजार होऊच नये यासाठी त्रिसूत्री अमलात आणा-कोरोनाशी लढताना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:28 IST2021-04-12T04:28:04+5:302021-04-12T04:28:04+5:30

आपल्याला या दोन्ही मानसिकतेमधील सुवर्णमध्य शोधावा लागेल. आजारी पडल्यानंतर घाबरण्यापेक्षा, आजारी होण्याआधी सकारात्मक घाबरणे केव्हाही चांगले. कोरोना म्हणजे ...

Implement the Trisutri to avoid getting sick - while fighting the corona | आजार होऊच नये यासाठी त्रिसूत्री अमलात आणा-कोरोनाशी लढताना

आजार होऊच नये यासाठी त्रिसूत्री अमलात आणा-कोरोनाशी लढताना

आपल्याला या दोन्ही मानसिकतेमधील सुवर्णमध्य शोधावा लागेल. आजारी पडल्यानंतर घाबरण्यापेक्षा, आजारी होण्याआधी सकारात्मक घाबरणे केव्हाही चांगले. कोरोना म्हणजे एक षडयंत्र आहे असे मानून गांभीर्य लक्षात न घेऊन, सरकारी यंत्रणेचे निकष न पाळण्यात मोठेपणा मानणारा एक वर्ग, तर दुसरीकडे ॲपेंडिक्स फुटून पू होईपर्यंत बाहेर कोरोना आहे म्हणून हॉस्पिटलमध्ये न येणारा दुसरा वर्ग.

या दोन्ही मानसिकता अतिरेकी आहेत. याचा सुवर्णमध्य म्हणजे आजार होणार नाही त्यासाठी फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क व हाताची स्वच्छता या त्रिसूत्रीचा अंमल करणे व आजार झालाच तर न घाबरता, योग्य पद्धतीने त्याचा सामना करणे.

कोविडसदृश लक्षणे आल्यास आपल्याजवळील डाॅक्टर, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सर्वप्रथम तपासणी करणे. आपले वय, लक्षणे, इतर आजार, ऑक्सिजन सॅच्युरेशन व गरज पडल्यास प्राथमिक रक्त तपासणी या गोष्टींचा विचार करून प्राथमिक उपचार सुरू केले जातात. त्वरित स्वॅब किंवा सीटी स्कॅन करून, बऱ्याच वेळा रिपोर्ट निगेटिव्ह येतो. या काळात रुग्णाने घरातसुद्धा मास्क घालणे योग्य आहे व स्वतःला क्वारंटाईन केल्यास इतरांना आजार पसरू शकणार नाही.

दोन-तीन दिवसात जर लक्षणे वाढली तर, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्वॅब तपासणी केली जाते. तेव्हाही सीटी स्कॅनची गरज नसते. जास्त वय, इतर आजार व ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी असल्यास योग्य वेळी, सी.टी. स्कॅन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करावे.

या सर्वांत रेमडेसिवीर इंजेक्शनचा ‘संजीवनी बुटी’सारखा शोध घेऊ नये. हॉस्पिटलमध्ये रुग्ण असल्यास, हॉस्पिटल रेमडेसिवीर इंजेक्शन सरकारी यंत्रणेमार्फत उपलब्ध करू शकतात.

विलगीकरण काळात एकटे असताना, मानसिक दडपण न घेता, आपल्या आवडी (वाचन, लिखाण, संगीत) पूर्ण कराव्या. आपल्या कुटुंबीयांना धीर द्यावा. नातेवाईकांनी सर्व काळजी घेऊन होईल ती मदत व मानसिक आधार द्यावा. नियमित व्यायाम, प्राणायाम करावा. कोरोना नंतर, फुफ्फुसाची क्षमता कमी होते. त्यासाठी योग, प्राणायाम करणे आवश्यक आहे.

वैयक्तिक बजेटमध्ये, इतर खर्च (गाडी, परदेशवारी, मोठे लग्न) कमी करून, मेडिक्लेम व आकस्मिक उपचारासाठी सोय करावी. सरकारनेसुध्दा तुटपुंजे हेल्थ बजेट वाढवावे.

मित्रांनो, वेळ कधी थांबत नाही. हे जागतिक संकटसुद्धा नक्कीच जाणार.

Web Title: Implement the Trisutri to avoid getting sick - while fighting the corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.