युवकांचे लसीकरण सुरू झाल्यास रक्तबॅगांची वाढणार चणचण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:29 IST2021-05-01T04:29:09+5:302021-05-01T04:29:09+5:30
नंदुरबार : १८ वर्षावरील सर्वांना लसीकरणाची घोषणा करण्यात आल्याने येत्या काळात रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवण्याची शक्यता असल्याने शासकीय रक्तपेढी ...

युवकांचे लसीकरण सुरू झाल्यास रक्तबॅगांची वाढणार चणचण
नंदुरबार : १८ वर्षावरील सर्वांना लसीकरणाची घोषणा करण्यात आल्याने येत्या काळात रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवण्याची शक्यता असल्याने शासकीय रक्तपेढी तसेच इतर विविध संघटनांतर्फे रक्तदानाला गेल्या काही दिवसांत वेग देण्यात आला होता. त्याचा परिणाम म्हणून जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीसह खासगी रक्तपेढ्यांमध्ये समाधानकारक रक्तसाठा आहे. याशिवाय सध्या कोरोनामुळे शस्त्रक्रियांचे प्रमाण अगदीच कमी असल्यामुळे रक्ताची मागणीदेखील कमी झाली आहे.
लसीकरणानंतर दोन महिने रक्तदान करता येत नाही, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे रक्तदानाचा तुटवडा जाणवणार, अशी भीती व्यक्त करण्यात येत होती; परंतु रक्तदान करणाऱ्यांमध्ये सर्वाधिक तरुणांचा अर्थात २० ते ४५ वर्षवयोगटांतील व्यक्तींचा सर्वाधिक सहभाग असतो. त्यामुळे लसीकरण सुरू होऊनही त्याचा फारसा परिणाम रक्तदान व रक्तपेढीतील रक्तसाठ्यावर झाला नव्हता; परंतु आता १८ वर्षांवरील सर्व व्यक्तींना लसीकरण करण्याचा निर्णय झाल्याने येत्या काळात रक्ताचा मोठा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.
सध्यातरी समाधानकारक साठा
सध्यातरी शासकीय व खासगी रक्तपेढ्यांमध्ये समाधानकारक रक्तसाठा आहे. शासकीय रक्तपेढीत एकूण १६४ रक्तबॅगा शिल्लक आहेत. असे असले तरी सर्वच रक्तगटांतील निगेटिव्ह गटाच्या रक्तबॅगांची संख्या नसल्यासारखीच आहे. त्यामुळे निगेटिव्ह रक्तगटासाठी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना ऐनवेळी धावपळ करावी लागते. त्यामुळे निगेटिव्ह रक्तगटाचा साठा देखील पुरेसा प्रमाणात करून ठेवणे गरजेचे आहे. खासगी रक्तपेढ्यांमध्ये देखील रक्तसाठा बऱ्यापैकी असला तरी निगेटिव्ह रक्तगटाची चणचण आहे.
युवकांना आवाहन
विविध रक्तदाता संघटना तसेच शासनातर्फेही युवकांना येत्या काळात रक्तदानाचे आवाहन करण्यात आले आहे. एकदाचे १८ वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण सुरू झाल्यास अशावेळी लस घेतलेल्या व्यक्तींना दोन महिने रक्तदान करता येणार नाहीत. ही बाब लक्षात घेता रक्तदान शिबिरांना ‘ब्रेक’ बसेल, रक्तदानासाठी कुणी पुढे येणार नाही त्यामुळे रक्ताची आणीबाणी होऊ शकते.