कामे झाली नाही तर आता जलसमाधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 13:19 IST2020-10-23T13:19:25+5:302020-10-23T13:19:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : नंदुरबार-धुळे जिल्ह्यात तापी नदीवरील उपसा सिंचन योजनांची दुरुस्ती करून कार्यान्वित करण्याचे काम ३१ जानेवारी ...

कामे झाली नाही तर आता जलसमाधी
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : नंदुरबार-धुळे जिल्ह्यात तापी नदीवरील उपसा सिंचन योजनांची दुरुस्ती करून कार्यान्वित करण्याचे काम ३१ जानेवारी २०२१ पर्यंत सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात येऊन उपसा सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी आवश्यक पाऊल जलसंपदा विभागामार्फत घेण्यात येईल, असे आश्वासन नंदुरबार मध्यम प्रकल्प विभागीय पथकाचे अधीक्षक अभियंता धुळे एम.एस. आमले यांनी दिल्यानंतर लाभधारक शेतकऱ्यांनी २१ ऑक्टोबरचे उपोषण स्थगित केले आहे. ३१ जानेवारी २०२१ पर्यंत योजना कार्यान्वित न झाल्यास तापी नदीत जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे.
तापी नदीवरील २२ उपसा सिंचन योजनांचे काम गेल्या तीन-चार वर्षापासून सुरू आहे. अद्याप एकाही योजनेचे काम पूर्णत्वास न आल्यास उपसा सिंचन योजनेचे लाभधारक सभासद हवालदिल झाले आहेत. सुरुवातीचे दुरुस्ती कामासाठी ४२ कोटी रुपयांची मंजुरी असून आता सुधारित दुरुस्ती अंदाजपत्रक ११५ कोटीचे असून सुप्रमाकरीता कामे प्रलंबित आहे व त्यामुळे दुरुस्तीचे कामे थांबली आहेत. उपसा सिंचन योजना लवकर कार्यान्वित होण्यासाठी २१ ऑक्टोबरपासून उपोषण करण्याचे ठरविले होते. या पार्श्वभूमीवर उपसा सिंचन योजनांचे लाभधारक शेतकरी व नंदुरबार मध्यम प्रकल्प विभागीय पथकाचे अधीक्षक अभियंता यांच्यात २० ऑक्टोबर रोजी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी कामास गती देऊन उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्यासाठी नंदुरबार येथील कार्यालयात त्याबाबत बैठक होऊन त्यात ही कामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती मंजुरी ३१जानेवारी २०२१ पर्यंत घेऊन मधल्या काळात कामे पूर्ण करावीत, असे सर्वानुमते ठरले. या चर्चेत लाभधारक शेतकऱ्यांनी या योजना कार्यान्वित होणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले.
यावर जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक चर्चा करून शेतकऱ्यांचे सर्व म्हणणे ऐकून घेत सदर योजना ३१जानेवारी २०२१ पर्यंत सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचे आश्वासन दिले. यावर समाधान व्यक्त करीत लाभधारक शेतकऱ्यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी आश्वासित केल्याने उपसा सिंचन योजनांच्या पदाधिकाऱ्यांनी २१ऑक्टोबर २०२० रोजीचे आमरण उपोषण स्थगित करुन ३१ जानेवारी २०२१पर्यंत योग्य ती कार्यवाही न झाल्यास १ फेब्रुवारी २०२१ रोजी २२ उपासा सिंचन योजनांचे पदाधिकारी व लाभधारक शेतकरी तापी नदीपात्रात जलसमाधी घेतील, असा निर्णय २२ उपसा सिंचन योजनांचे चेअरमन व पदाधिकाऱ्यांनी सर्वानुमते घेतला आहे.
२० ऑक्टोबर रोजी नंदुरबार मध्यम प्रकल्प विभागीय पथकाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत कार्यकारी अभियंता तुषार चिनावलकर, नंदुरबार व धुळे जिल्हा पाणीपुरवठा संघाचे उपाध्यक्ष जिजाबराव गोरख पाटील (धमाणे), मुकेश चौधरी (लहान शहादे), विनोद पाटील (पुसनद), रितेश बोरसे (कळंबू) यांच्यासह उपसा सिंचन योजनांचे पदाधिकारी व लाभधारक शेतकरी उपस्थित होते. या बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात येऊन दोन्ही बाजूने निर्णय घेण्यात आला.