कसा रोखणार कोरोना, कोठेच तपासणी होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:28 IST2021-03-20T04:28:37+5:302021-03-20T04:28:37+5:30

नंदुरबार : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर उपाययोजनांना गती देण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. परंतु, ...

How to stop Corona, no investigation | कसा रोखणार कोरोना, कोठेच तपासणी होईना

कसा रोखणार कोरोना, कोठेच तपासणी होईना

नंदुरबार : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर उपाययोजनांना गती देण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. परंतु, या आदेशाची अंमलबजावणी मात्र होत नसल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.

या अनुषंगाने नंदुरबार व शहादा येथील बसस्थानक, नंदुरबार रेल्वे स्थानक आणि खेड दिगर (ता. शहादा) येथील सीमा तपासणी नाक्यावर पाहणी केली असता, उपाययोजनांचा बोजवारा उडाल्याचे पाहायला मिळाले. केवळ नंदुरबार रेल्वे स्थानकावरच येणाऱ्या प्रवाशांची नियमित तपासणी होत असल्याचे दिसून आले. उर्वरित ठिकाणी मात्र पुणे, मुंबई, नाशिकसह राज्याच्या विविध भागातून येणाऱ्या तसेच राज्याबाहेरुन येणाऱ्या प्रवाशांची कोणतीही तपासणी होत नसल्याचे दिसून आले. यामुळे कोरोना वाढण्याची शक्यता बळावली आहे.

मार्च २०२०मध्ये लाॅकडाऊन सुरु होण्यापूर्वी गुजरात सीमेवरील राज्य सीमा तपासणी नाका व खेडदिगर येथील तपासणी नाका येथे तपासणी होत होती. सुमारे ९ महिने हा उपक्रम सुरु होता. तूर्तास या दोन्ही ठिकाणी तपासण्या बंद आहेत.

जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशानुसार प्रवाशांची तपासणी करण्याचे सूचित करण्यात आले होते. परंतु, बसस्थानकांमध्ये येणाऱ्या कोणत्याही बसमधील प्रवाशांची तपासणी होत नाही. दरम्यान, खासगी बसेसमधूनही तेवढ्याच संख्येने प्रवासी येतात. त्यांचीही तपासणी होत नाही.

मोठ्या शहरातून येणाऱ्या प्रवाशांची नियमित तपासणी करणे आवश्यक असतानाही कार्यवाही झालेली नसल्याचे दिसून येत आहे. खासगी वाहनांतूनही अनेकजण सर्रासपणे जिल्ह्यात प्रवेश करत आहेत.

प्रवासी उतरुन सरळ घरी जातात

नंदुरबार बसस्थानकातून पुणे, मुंबई, कल्याण, नाशिक, सुरत, अहमदाबाद, पंढरपूर या बसेसच्या नियमित फेऱ्या सुरु आहेत. या बसेस परतल्यानंतर त्यातील प्रवाशांची तपासणी होत नाही. बसमधून उतरल्यानंतर प्रवासी सरळ घरी निघून जातात. दरम्यान, सकाळच्या वेळी शहरात ११ विविध खासगी ट्रॅव्हल्सच्या बसेस पुणे व मुंबई येथून तपासणीविनाच येतात.

रेल्वे स्थानकात मात्र दक्षता

उधना - जळगाव मार्गावरील प्रमुख रेल्वेस्थानक असलेल्या नंदुरबार येथे प्रवाशांची कायम वर्दळ असते. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने याठिकाणी एमपीडब्ल्यू कर्मचाऱ्यांचे पथक नियुक्त केले आहे. तीनजणांच्या या पथकाकडून प्रवासी गाडीतून उतरल्यानंतर प्रत्येक प्रवाशाची तपासणी करुनच त्याला स्थानकाबाहेर सोडले जाते. याठिकाणी हा उपक्रम २४ तास सुरु आहे.

जिल्हा सीमा अक्षरश: वाऱ्यावर

ठाणेपाडा (ता. नंदुरबार), न्याहली (ता. नंदुरबार), हिंगणी, सारंगखेडा व खेडदिगर (ता. शहादा), गव्हाली (ता. अक्कलकुवा) व नवापूर येथील राज्य व जिल्हा सीमेवर गेल्यावर्षी येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची आरोग्य तपासणी होत होती. परंतु, गेल्या चार महिन्यांत या सीमा अक्षरश: वाऱ्यावर आहेत. या सीमांवर प्रशासनाने नियुक्त केलेला एकही कर्मचारी आढळला नाही.

Web Title: How to stop Corona, no investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.