महामार्गांवर आणखी किती जणांच्या बळींची वाट पहाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 11:57 IST2020-03-06T11:57:47+5:302020-03-06T11:57:54+5:30
मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील महामार्ग मंजुरीच्या नावाखाली गेल्या तीन वर्षांपासून ‘नही’ अर्थात राष्टÑीय महामार्ग ...

महामार्गांवर आणखी किती जणांच्या बळींची वाट पहाल
मनोज शेलार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील महामार्ग मंजुरीच्या नावाखाली गेल्या तीन वर्षांपासून ‘नही’ अर्थात राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करून ठेवले आहेत. ‘नही’ तर्फे ना महामार्गांच्या कामाला सुरुवात होत ना त्याच्या दुरूस्तीबाबत गांभिर्याने पाहिले जात आहे. यामुळे जिल्हावासीयांना या महामार्गांवरून प्रवास करतांना मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. शेकडो जणांना जीव गमवावा लागला आहे. प्रदुषण, पिकांचे नुकसान या बाबी वेगळ्याच. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि उठसूठ किरकोळ बाबींवर आंदोलन करणाऱ्या संघटनांनी सोयीस्कर डोळेझाक करून ठेवली आहे. महामार्गांचे ‘गाजर’ दाखविणाºया लोकप्रतिनिधींना जाब विचारण्यासाठी आता नागरिकांनाच पुढे यावे लागणार आहे.
जिल्ह्यातून जाणारे अंकलेश्वर-बºहाणपूर, नागपूर-सुरत, शेवाळी-नेत्रंग, विसरवाडी-सेंधवा, सोलापूर-अहमदाबाद हे महामार्ग राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आले आहेत. आंतरराज्य महामार्ग असल्यामुळे सर्वाधिक वाहतूक या रस्त्यांवरून होत असते. महामार्ग मंजुरी आणि त्यांच्या कामांबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत ते ‘नही’कडे वर्ग करण्याची घाई करण्याची गरज नव्हती. परंतु सवंग लोकप्रियतेसाठी लोकप्रतिनिधींनी ती घाई केली आणि जिल्हावासीयांना मरणयातनांना आणून सोडून दिले. आजच्या परिस्थितीत केवळ एक महामार्ग सोडला तर दुसºया कुठल्याच महामार्गाच्या कामाला मंजुरी नाही, निधीची तरतूद नाही, ती केंव्हा होईल याची शाश्वती नाही. केंद्र सरकारकडे पुरेसा पाठपुरावा नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
शेवाळी-नेत्रंग व अंकलेश्वर-बºहाणपूर या महामार्गाची अवस्था तर अतिशय वाईट झाली आहे. दोन ते तीन मिटरचे रुंद व खोल खड्डे पडले आहेत. डांबरचा नामोनिशान रस्त्यावर राहिलेला नाही. धूळ आणि खड्डेयुक्त महामार्गातून दररोज हजारो वाहने ये-जा करीत आहेत. खड्डे चुकवितांना दररोज अपघात होत आहेत. वाहनावरील नियंत्रण सुटले म्हणजे अपघात ठरलेलाच आहे. गेल्या १५ दिवसात या महामार्गावर अर्थात खापर ते शिरपूर पर्यंतच्या अंतरात तब्बल १३ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. २० ते २५ जण जखमी झाले आहेत. महामार्गावर उडणारी धूळ ही लगतच्या गावांमधील नागरिकांना जीवघेणी ठरली आहे. वातावरणातील धुळीचे प्रमाण या भागात ८० ते ८५ टक्केपर्यंत पोहचले आहे. यामुळे या भागातील ग्रामस्थांना श्वसनाचे विकार बळावू लागले आहेत. ग्रामस्थांसह पिकांवरही त्याचा परिणाम होत आहे. महामार्गालगतच्या शेतातील पिकांचे धुळीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. उत्पादकता घटत आहे. फळ पिकांची क्वालिटी खराब होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे.
अशीच स्थिती नागपूर-सुरत महामार्गाची आहे. चौपदरीकरणाच्या नावाखाली हा महामार्ग खोदून ठेवला आहे. नवीन निविदाही काढली जात नाही आणि आहे तो महामार्ग दुरूस्तीबाबतही गांभिर्याने घेतले जात नसल्याची स्थिती आहे. पावसाळ्यात हा महामार्ग खचल्याने तब्बल १५ दिवस बंद ठेवण्याची वेळ आली होती. विसरवाडी-सेंधवा महामार्गाचा केवळ दुसरा टप्पा मंजूर झाला. परंतु त्याच्या कामाची गती ही नंदुरबार, शहादा तालुक्यातील नागरिकांना जीवघेणी ठरली आहे. पहिला टप्पा अर्थात विसरवाडी ते कोळदा हा कधी मंजूर होईल याबाबत काहीच हालचाल नाही. शेवाळी-नेत्रंग महामार्ग निविदा प्रक्रियेपर्यंत आला असल्याचे सांगितले जात आहे. परंतु ठोस अशी माहिती लपविली जात आहे. सोलापूर-अहमदाबाद हा महामार्ग सोनगीरफाट्यापासून दोंडाईचा, शहादा, धडगाव, पिंपळखुटा, डेडीयापाडापर्यंत व तेथून नेत्रंग महामार्गाला जोडला जाणार आहे. परंतु त्याच्या मंजुरीबाबतही हालचाली ठप्प आहेत.
एकुणच महामार्गांचे गाजर दाखविले गेले आहे. ते सर्व रस्ते महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे त्याच्या दुरूस्तीबाबतचे काहीही प्राविधान उरलेले नाही. या महामार्गांच्या दुरूस्तीसाठी थेट केंद्र सरकारकडून मंजुरी आणावी लागते. ती प्रक्रिया मोठी आहे. त्यामुळे महामार्ग दुरूस्तीही रखडल्या आहेत. त्याचा जिल्हावासीयांना फटका बसला आहे. खड्डेयुक्त रस्त्यांतून मार्गक्रमण करणे क्रमप्राप्त ठरत आहे. लोकप्रतिनिधींनी ठोस पाठपुरावा केला तर काहीही अशक्य नाही, परंतु ती मानसिकता असणे गरजेचे आहे.