हॉटेलबंदीने महिलांची भाजी-भाकरी थांबली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:32 IST2021-04-09T04:32:24+5:302021-04-09T04:32:24+5:30
शहादा : शहादा शहर व तालुक्यासह जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव व प्रसार थांबविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी १ ते १५ एप्रिलपर्यंत ...

हॉटेलबंदीने महिलांची भाजी-भाकरी थांबली!
शहादा : शहादा शहर व तालुक्यासह जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव व प्रसार थांबविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी १ ते १५ एप्रिलपर्यंत कर्फ्यू जाहीर केला आहे. यात जीवनावश्यक वस्तूंना काही वेळ सूट देण्यात आली असली तरी शहरातील हॉटेल, भोजनालये बंद असल्याने त्या ठिकाणी पोळ्या - भाकरी बनवणाऱ्या महिलांना उपासमार होऊन भाकरीच्या शोधात फिरावे लागत आहे.
कोरोना संक्रमणाची साखळी तुटावी म्हणून १५ दिवस जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे. यामुळे सर्वच हॉटेल, भोजनालये पूर्णपणे बंद आहेत. यामुळे या हॉटेल्स भोजनालयात पोळ्या व भाकरी बनवणाऱ्या महिलांचा रोजगार थांबल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
शहादा शहरात तीन डझन हॉटेल व भोजनालये आहेत. या ठिकाणी सुमारे ९० ते १०० महिला पोळ्या व भाकरी करून आपल्या कुटुंबांचा उदरनिर्वाह करतात. हॉटेल व भोजनालयात भाकरी बनविण्याचे काम करून या महिलांना बऱ्यापैकी रोजगार उपलब्ध होत होता. त्यात मुलांचे शिक्षण व कुटुंबाचा उदरनिर्वाह करून सुखाने संसाराचा गाडा हाकत होत्या. मात्र, पुन्हा कर्फ्यू पुन्हा लॉकडाऊन यामुळे शहरातील सर्व हॉटेल, भोजनालय पुढील आदेश येईपर्यंत बंद आहेत. हॉटेल बंद असल्याने यांचे काम थांबून रोजगार थांबला आहे. दुसऱ्यांचे पोट भरणाऱ्या या महिलांना आता स्वत:च्या भाकरीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या महिलांशी संपर्क साधला असता मागील वर्षभरापासून हीच परिस्थिती असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना संक्रमणामुळे वर्षभर कर्फ्यूमुळे हॉटेल्स कधी बंद, तर कधी सुरू होती. यामुळे सलग वर्षभर कधी काम तर कधी नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. काम नसल्याने पगार नाही. त्यामुळे कुटुंबांचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न आमच्यासमोर निर्माण झाला होता. पूर्ण वर्षभर आमचे कुटुंब आम्ही कसे चालवले, हे आम्हालाच माहीत असल्याचे या महिलांनी सांगितले. मागील काही दिवसांपूर्वी कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने सर्व काही पहिल्यासारखे सुरळीत होऊन हॉटेल कायमस्वरूपी सुरु होऊन पूर्ण रोजगार मिळवून पहिल्यासारखे सुखाचे दिवस येतील, अशी आशा होती. मात्र, मार्च महिन्यामध्ये रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागल्याने सर्वत्र बंद झाले. यामुळे पुन्हा निराशाच पदरी पडल्याची भावना व्यक्त केली.
शहरातील अनेक महिला हॉटेलमध्ये तर काही महिला शहरातील विविध भागातील कुटुंबांमध्ये पोळ्या बनवण्यासाठी जात असतात. मात्र, कोरोनाच्या संक्रमणामुळे अनेक कुटुंबांनी या महिलांना पोळ्या बनवण्यासाठी येण्यास मनाई केल्याने या महिलांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पोळ्या बनवण्याचे काम बंद झाल्याने पोटापाण्याच्या प्रश्न निर्माण झाला आहे. आता या महिलांना मिळेल ते काम करावे लागत आहे. काही महिला तर धुणी-भांडी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत.
शिवभोजन केंद्राने दिला महिलांना आधार
संचारबंदी काळात सर्व बंदी असली तरी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली शिवभोजन केंद्र सुरू आहेत. शहरातील दोन शिवभोजन केंद्रांवर काही महिलांना भाकरी, पोळ्या व भाजी बनवून देण्याचा रोजगार उपलब्ध होत आहे. गरजू व रुग्णांना सवलतीच्या दरात शिवभोजन उपलब्ध होत आहे. दिवसभरातून एका केंद्रावर ५०० ते ७०० पोळ्या या महिला बनवतात. यातून महिन्याकाठी बऱ्यापैकी रोजगार उपलब्ध होत आहे.
काही हॉटेल व्यावसायिक देत आहेत अर्धा पगार
आता हॉटेल बंद असले तरी ते कर्मचारी हॉटेलसाठी पूर्ण क्षमतेने मेहनत घेऊन सेवा देत असतात. हॉटेलमध्ये काम करून मिळणाऱ्या पगारातून ते त्यांचा उदरनिर्वाह करतात. मात्र, आता सर्व बंद असल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे काही व्यावसायिक माणुसकीचे भान ठेवून पोळ्या बनवणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना अर्धा पगार देत असल्याचे एका हॉटेल व्यावसायिकाने सांगितले.