किसान ॲपचे वरातीमागून घोडे, वादळ वारे येऊन गेल्यावर अलर्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:29 IST2021-05-24T04:29:13+5:302021-05-24T04:29:13+5:30
नंदुरबार : गेल्या आठवड्यात महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीवर घोंघावणाऱ्या ताैक्ते वादळाचा परिणाम जिल्ह्यातही जाणवला होता. यातून जिल्ह्यातील विविध भागात ...

किसान ॲपचे वरातीमागून घोडे, वादळ वारे येऊन गेल्यावर अलर्ट
नंदुरबार : गेल्या आठवड्यात महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीवर घोंघावणाऱ्या ताैक्ते वादळाचा परिणाम जिल्ह्यातही जाणवला होता. यातून जिल्ह्यातील विविध भागात पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे शेती पिकांचे नुकसान झाले होते. यातून शेतकरी वापर असलेले किसान सुविधा ॲप हे पुन्हा एकदा बेभरवशाचे ठरले असल्याचा दावा शेतकरी करत आहेत.
जिल्ह्यात ७५ टक्के हंगामी शेती केली जाते. केवळ खरीप आणि रब्बी पिकांपुरती मर्यादित शेती करून उदरनिर्वाह केला जातो. उर्वरित २५ टक्केे शेतीत बागायती फळ पिके, भाजीपाला यासह इतर प्रयोगात्मक शेती केली जाते. यातून बागायतदार शेतकरी जिल्ह्यात सर्वाधिक जागरुक असल्याचे चित्र आहे. हे शेतकरी तंत्रज्ञानाचाही लाभ घेतात. यातून केंद्र शासनाने विकसित केलेले किसान सुविधा ॲप गेल्या काही काळापूर्वी मार्गदर्शक ठरले होते. परंतु ऐनवेळी माहिती देण्यात हे ॲप मागे पडत असून वारे किंवा वादळ येऊन गेल्यावर अलर्ट येण्याचे प्रकार सुरू आहेत.
जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी हे पारंपरिक पद्धतीने हवामानाचा अंदाज घेतात. वर्तमानपत्रे किंवा टीव्हीवर देण्यात येणाऱ्या बातम्यांमधून हवामानाची माहिती घेतात. किसान सुविधा ॲपबाबत अजूनही तेवढी माहिती शेतकऱ्यांना नाही. कृषी विभागाने माहिती दिली पाहिजे. जे ॲप वापरतात त्यांना अडचणी येतात, म्हणून त्यात सुधारणा केल्या पाहिजेत.
-जयसिंग माळी, शेतकरी
मोड, ता. तळोदा.
युवा शेतकरी म्हणून ॲप डाऊनलोड केले आहे. त्याचा वापरही नियमित करतो. यातून काही दिवसांपूर्वी योग्य माहिती मिळत होती. परंतु हवामानाची लेटेस्ट अपडेट मिळत नाही. एकच माहिती सतत रिपिट होते. वादळ येणार आहे एवढेच कळते, पण लोकेशन आणि त्याचा नेमका वेग व नुकसान टाळण्यासाठी काय करावे हे लवकर सांगण्यात येत नसल्याने अडचणी वाढतात.
-दीपक मराठे,
शेतकरी, रांझणी, ता. तळोदा
ही माहिती मिळते
देशातील हवामानाची माहिती मिळते. पाऊस, वादळ, वारे आणि वातावरणातील आर्द्रता याची माहिती मिळते.
शेतमालाचा दैनंदिन भाव, हमीभाव, शासकीय दरपत्रक तसेच व्यापाऱ्यांची माहिती मिळते.
देशभरातील शेती उत्पादन खरेदी विक्रीचा बाजार, शेती पिकांचे संगोपन कसे करावे, याची माहिती ॲपवर देण्यात येते.
स्मार्टफोनचा वापर कमी
नंदुरबार जिल्ह्यात या ॲपचा वापर करणारे शेतकरी पाच टक्केच असल्याचा दावा केला जातो. स्मार्टचा वापर करणाऱ्यांची संख्या कमी असल्याने हा वापर टळतो.
ग्रामीण भागात मोबाइल नेटवर्क ही गंभीर समस्या आहे. दूरसंचार विभागाचे मोबाइल नेटवर्क चालत नसल्याने शेतकऱ्यांना अनेक मेसेजेस हे उशिराने मिळतात. यातून अनेक जण स्मार्टफोन वापर टाळतात.
केंद्र शासनाच्या कृषी विभागाने तयार केलेले ॲप शेतकऱ्यांना सहाय्यकारी असे आहे. यातून शेतकरी माहितीच्या जाळासोबत जोडले जात आहेत. शेतकरी या ॲपचा वापर करत आहेत. ही सुखावह बाब आहे. जसा स्मार्टफोनचा वापर वाढेल तसा ॲपचा वापर वाढेल, जिल्ह्यात वातावरणातील बदलांची माहिती देण्यासाठी कृषी विभाग प्रयत्न करतो.
-अनंत पोटे,
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी