लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरात पाणी पुरवठाची समस्या यंदा मिटली आहे. परंतु पावसामुळे खराब झालेल्या रस्त्यांची डागडुजी करणे, काही ठिकाणी नवीन रस्ते करणे आवश्यक आहे. मध्यंतरी कचरा उचलण्याची समस्या कर्मचारी संपामुळे निर्माण झाली होती ती देखील आता दूर झाली आहे. परंतु भुमिगत गटारीचे चेंबर खराब झाल्याने, चोरीस गेल्याने पाणी रस्त्यांवरून वाहत आहे. नंदुरबार शहरातील पाणी पुरवठ्याची समस्या दुष्काळात देखील सहज सुटली होती. त्याला कारण विरचक धरण व वाढविलेली स्टोरेज क्षमता. यंदा हे धरण पुर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे २४ तास पाणी पुरवठाचे नियोजन होत आहे. शहरातील ड्रेनेज सीस्टीम काही भागात फेल गेल्याने गटारीचे पाणी रस्त्यांवरून वाहत असते. त्यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे. याशिवाय रस्त्यांची अवस्था देखील काही भागात खराब झाली आहे. ते रस्ते येत्या काळात दुरूस्त होणे अपेक्षीत आहे.
पाणीपुरवठा सुनियोजीतशहरात एक दिवसाआड ४५ मिनिटे पाणी पुरवठा केला जातो. विरचक व आंबेबारा धरणातील पाणीसाठा आरक्षीत करण्यात आला आहे. त्यामुळे येते दोन वर्ष पाणी पुरवठ्याची समस्या मिटली आहे. आता पालिका २४ तास पाणी पुरवठा करण्यासाठी प्रयत्नशील असून त्यासाठी वॅाटर ऑडीट देखील करण्यात येत आहे. त्यानंतर मिटरने पाणी पुरवठा केला जाणार आहे.
रस्ते पावसामुळे खराबशहरातील रस्त्यांची अवस्था इतर शहरांपेक्षा नक्कीच चांगली आहे. परंतु पावसामुळे अनेक भागातील रस्ते खराब झाले आहेत. आता दिवाळीनंतर अशा रस्त्यांची डागडुजी करण्यात येणार आहे. कॅालनी तेथे रस्ता करण्याचा पालिकेचा संकल्प होता तो पुर्ण करण्यात आला होता. अनेक भागात रस्ते आणि त्यातील दुभाजक लक्ष वेधून घेतात.
कचरा दररोज संकलननंदुरबारात दररोज सकाळी कचरा संकलन केले जाते. प्रत्येक वसाहतीत घंटागाडी फिरते. शिवाय सार्वजनिक ठिकाणचा कचरा देखील उचलला जातो. मध्यंतरी कचरा संकलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा संप झाला होता. त्यामुळे आठ दिवस कचरा उचलणे, संकलन बंद झाले होते. आता संकलन पुर्वपदावर आले आहे. परंतु काही ठिकाणी कचऱ्याची समस्या आहेच.
वाहतूकीची समस्या...शहरातील वाहतुकीची समस्या सुटतच नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होेते. ती सोडविण्यासाठी वाहतूक शाखा प्रयत्नशील आहे. परंतु शहरातील अरुंद रस्ते, अतिक्रमण यामुळे दिवसेंदिवस ही समस्या बिकट होत चालली आहे. त्यासाठी एकतरर्फी वाहतूक, समविषम पार्कींग यासह इतर उपाययोजना करण्यात आल्या. परंतु त्यात सातत्य नसल्याने त्या देखील निरुपयोगी ठरल्या.
शहरातील नागरी समस्या सोडविण्यासाठी पालिका कटीबद्ध आहे. पावसाळ्यामुळे काही भागातील रस्ते खराब झाले आहेत ते लवकरच दुरूस्त करण्यात येतील. आरोग्याची समस्येला प्रथम प्राधान्य असते. त्यामुळे वेळोवेळी कचरा संकलन केले जाते. पाणी पुरवठ्याची कुठलीही समस्या नाही.-रत्ना रघुवंशी, नगराध्यक्षा, नंदुरबार.