लॉकडाऊनमध्येही ‘उमेद’ने दिली आशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 12:41 IST2020-05-18T12:41:36+5:302020-05-18T12:41:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोविड संकटाच्या काळात रोजगाराचे प्रश्न निर्माण होत असताना जिल्ह्यातील महिला स्वयंसहायता समुहांनी उमेद अभियानांतर्गत ...

 Hope gave hope even in lockdown | लॉकडाऊनमध्येही ‘उमेद’ने दिली आशा

लॉकडाऊनमध्येही ‘उमेद’ने दिली आशा

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोविड संकटाच्या काळात रोजगाराचे प्रश्न निर्माण होत असताना जिल्ह्यातील महिला स्वयंसहायता समुहांनी उमेद अभियानांतर्गत संसर्ग पसरू नये यासाठी वापरण्यात येणारे मास्क तयार करण्याचा उपक्रम हाती घेऊन रोजगार निर्मितीचा एक चांगला पर्याय निवडला आहे. याशिवाय घरपोच किराणा माल पोहोचविणे आणि भाजीपाला विक्रीतूनही समुहांनी उत्पन्नाचे साधन निर्माण केले आहे.
राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोती अभियान व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानाच्या माध्यमातून उमेद अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात अभियानाची अंमलबजावणी सुरू आहे. एप्रिल २०२० अखेर १४ हजार ९६६ महिला स्वयंसहायता समुहांच्या माध्यमातून एक लाख ४७ हजार ९६१ कुटुंबाचा समावेश या अभियानात करण्यात आलेला आहे. समुहांना गावस्तरावर मार्गदर्शन करण्यासाठी अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती म्हणून स्थानिक गावातील एक हजार महिला कार्यरत आहेत. कोविड संकटाचा सामना विविध स्तरावर करावा लागत असताना त्याचे संधीत रूपांतर करण्याचा प्रयत्न अभियानाच्या माध्यमातून समुहातील महिलांनी केला. त्यातून मास्क तयार करण्याची कल्पना पुढे आली. आतापर्यंत १३ हजार मास्क तयार करून त्यातील आरोग्य विभागाला १० हजार व इतर विभागांना तीन हजार देण्यात आले आहे. मास्क तयार करताना आरोग्य विषयक मार्गदर्शक सूचनांचे पालनदेखील करण्यात येत आहे.
१६ समुहांच्या १३ महिलांनी हे काम सुरू केले. काही महिला घरातच वैयक्तिक स्वरूपात व काही सामुहिक स्वरूपात कोरोनापासून बचाव करण्यासाठी सुती कापडाचे मास्क तयार करीत आहे. मास्कची किंमत १० ते ३० रूपये एवढी आहे. उत्पन्नासोबत कोविडशी लढण्यासाठी आवश्यक वस्तुंची निर्मिती करण्याचे समाधानही मिळत असल्याची महिलांची भावना आहे. जिल्ह्यातील अक्कलकुवा, धडगाव, तळोदा तालुक्यातील ग्रामपंचायत व नंदुरबार, नवापूर, शहादा तालुक्यातील विविध शासकीय विभागाकडूनही त्यांच्याकडे मास्कची मागणी होत आहे.
मागणी प्रमाणे एकत्रित वस्तू खरेदी करून पुरवठा होत असल्याने समुहांना आर्थिक लाभ होत आहे. त्याचप्रमाणे नागरिकांना चांगली सुविधा उपलब्ध होत आहे. समुहातील महिलांनी अनेक ठिकाणी परसबागेत भाजीपाला लागवड केली आहे. हा भाजीपालादेखील माफक दरात नागरिकांना घरपोच उपलब्ध करून देण्यात येत आहे. लॉकडाऊनमुळे गावात तयार होणारा भाजीपाला शेतकरी शहरात विकू शकत नाही. हा भाजीपाला खरेदी करून गावातच घरोघरी विक्री करण्याचा उपक्रमही काही समुहांनी राबविला.
या सर्व उपक्रमांना मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांचे मार्गदर्शन लाभले आहे. व्यवसायाशिवाय कोविड आजाराबाबत इतर महिलांना माहिती देण्याचे आणि स्वच्छतेचे महत्व गावात पोहोचविण्याचे कामही या समुहांमार्फत होत आहे. गावात अंगणवाडी क्षेत्रात गरोदर व स्तनदा मातांसाठीचा पोषण आहार त्यांना घरपोच करणे, आशा कार्यकर्र्तीं सोबत आरोग्य सर्वेक्षण करणे, सॅनिटायझर वाटप अशा कामांमध्येदेखील या महिलांचा पुढाकार आहे. अभियानात सहभागी समूहांच्या माध्यमातून गावातील आर्थिक उन्नतीला हातभार लावण्यासोबतच संकटकाळात प्रशासनासोबत काम करणारी भक्कम फळी उभी राहीली आहे.
ग्रामीण भागासाठी ही नवी उमेद आहे. या महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी पंचायत समिती स्तरावर तालुका अभियान व्यवस्थापकाशी संपर्क साधून मास्क अथवा इतर आवश्यक वस्तुंची मागणी नोंदवावी, असे आवाहन विनय गौडा यांनी केले आहे. आतापर्यंत दीड लाख रूपये किंमतीच्या मास्कचे वितरण करण्यात आले आहे.
या महिलांना घरी बसून ३० ते ४० हजार रूपयांचा लाभ होणार आहे. मास्क गुणवत्तेच्या बाबतीतही चांगले असावे असा प्रयत्न करण्यात येत आहे. संकटकाळात जीवनावश्यक वस्तुंच्या वितरणावर अधिक भर दिला जात असल्याने उत्पन्नाचे नवे साधन समुहांना उपलब्ध झाले आहे.

अभियानाच्या माध्यमातून १० समूहाचे एक ग्रामसंघ असे ७८० ग्रामसंघ तयार करण्यात आले आहे. त्यापैकी ६० ग्रामसंघांना जोखीम प्रवणता निधी देण्यात आला. यातील ३० ग्रामसंघांनी गावातील नागरिकांना घरपोच जीवनावश्यक वस्तू देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. एकूण २८९ कुटुंबांना नऊ लाख १० हजार रूपयांच्या वस्तुंचा पुरवठा करण्यात आला.

Web Title:  Hope gave hope even in lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.