प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत २३ हजार लाभार्थींची घरे अपूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:38 IST2021-06-09T04:38:20+5:302021-06-09T04:38:20+5:30
नंदुरबार : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत गेल्या तीन वर्षात एकूण ३८ हजार ५८२ घरे पूर्ण झाली आहेत. या लाभार्थींची सोय ...

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत २३ हजार लाभार्थींची घरे अपूर्ण
नंदुरबार : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत गेल्या तीन वर्षात एकूण ३८ हजार ५८२ घरे पूर्ण झाली आहेत. या लाभार्थींची सोय झाली असली तरी योजनेत अद्याप २३ हजार लाभार्थींची घरे अपूर्ण आहेत. या लाभार्थींना पहिला, दुसरा, तिसरा किंवा चाैथा हप्ता न मिळाल्याने त्यांना अडचणी येत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
जिल्हा प्रशासनाने २०१६ - १७ या वर्षात १२ हजार ६३४ घरांचा लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. पण, १६ हजार ७२७ लाभार्थींची नोंदणी होऊन ११ हजार ६४७ जणांची घरे पूर्ण झाली होती. या वर्षात केवळ ९८७ घरे अपूर्ण होती. २०१७-१८ या वर्षातही १५ हजार ६०१ घरांची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट होते. १४ हजार २८० घरे या वर्षात पूर्ण करण्यात आल्याने १ हजार ३२१ घरे अपूर्ण होती. २०१८ - १९ या वर्षात १० हजार ३४७ पैकी ८ हजार ८८० घरे पूर्ण करण्यात आल्याने १ हजार ५०७ घरे अपूर्ण होती. एकीकडे तीन वर्षात घरांचे उद्दिष्ट अधिक प्रगतपणे पूर्ण करण्यात आल्याने २०१९ - २० या वर्षात ५० हजार ८२० उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. दरम्यान, यातून ३० हजार ८५८ घरांचे उद्दिष्ट पूर्ण झाले असले तरी अद्याप १९ हजार ९६२ घरांची कामे अपूर्ण आहेत. चार वर्षांच्या काळात २३ हजार ७७७ घरे अपूर्ण राहिल्याने त्याचा फटका थेट लाभार्थींना बसला आहे. दरम्यान गेल्या वर्षाचे उद्दीष्ट्य पूर्ण करण्यासाठी यंदा वेगात काम सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे.
जिल्ह्यात २०१६-१७ ते २०२०-२१ या वर्षात ८९ हजार ८६ जणांना घरकुल योजनांचा लाभ मिळाला आहे. यातील ८८ हजार १४७ जणांना घरकुलाचा पहिला हप्ताही मंजूर झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे. अद्यापही जिल्ह्यात २३ हजार ७७७ जणांना घरकुला योजनेतून दीड लाख रुपयांचे अनुदान मिळणे शिल्लक आहे.
२०१९-२० या वर्षात अक्कलकुवा तालुक्यात ४ हजार, धडगाव ३ हजार ८६२, नवापूर ४ हजार, शहादा ४ हजार तर तळोदा तालुक्यात अडीच हजार घरकुले अपूर्ण असल्याची माहिती देण्यात आली आहे. कोरोनामुळे झालेले लाॅकडाऊन या लाभार्थींना अडचणीचे ठरले असल्याचे सांगण्यात आले असून चालू वर्षात या लाभार्थींना निधीचे वितरण करणे सुरु करण्यात आल्याची माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून देण्यात आली आहे.