सुकामेव्यासह ५० दिवसांचा किराणा किट मिळाले घरपोच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 12:22 IST2020-05-07T12:22:08+5:302020-05-07T12:22:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील २७ हजार ३०१ गरोदर व स्तनदा मातांना प्रत्येकी अर्धा किलो सुकामेव्यासह इतर आवश्यक ...

Home delivery of 50 days grocery kit with dried fruits | सुकामेव्यासह ५० दिवसांचा किराणा किट मिळाले घरपोच

सुकामेव्यासह ५० दिवसांचा किराणा किट मिळाले घरपोच

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील २७ हजार ३०१ गरोदर व स्तनदा मातांना प्रत्येकी अर्धा किलो सुकामेव्यासह इतर आवश्यक पोषक घटक असलेला शिधा ५० दिवसांसाठी वाटप करण्यात आला आहे. डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत आहार योजनेअंतर्गत महिला व बालविकास विभागाने हा उपक्रम जिल्ह्यात राबविला आहे.
अमृत आहार योजनेअंतर्गत स्तनदा, गरोदर माता आणि सहा महिने ते सहा वर्षाच्या बालकांना पुरक पोषण आहार दिला जातो. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मात्र, आहार देण्याऐवजी थेट शिधा दिला जात आहे. यासाठी नंदुरबार जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने उच्च प्रतीचा शिधा आणि त्यात सुकामेवा देखील दिला जात आहे. या विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ यांनी त्यासाठी शासनाच्या आदेशानंतर लागलीच कामाला लागून उच्च दर्जाचे साहित्य खरेदी करून ते वाटप देखील केले. यामुळे अमृत आहार योजनेतील सर्वच लाभार्थी महिलांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
स्तनदा व गरोदर मातांची एकुण संख्या जिल्ह्यात २७ हजार ३०१ इतकी आहे. तर सात महिने ते सहा वर्ष वयोगटातील बालकांची संख्या १,४५,१५२ इतकी आहे. या सर्व लाभार्र्थींना एप्रिल व मे महिन्यातील ५० दिवसांसाठी शिधा वाटप करण्यात आला आहे. यात काजू, बदाम, मनुका व खारिक या सुकामेव्याचे एकत्रीत अर्धा किलोचे पाकिट, तीन किलो तांदुळ, पाच किलो गहू, एक किलो गुळ, एक किलो शेंगदाणे, प्रत्येकी ७५० ग्रॅम मसूर व हरभरा दाळ, २०० ग्रॅम मसाला, १०० ग्रॅम हळद व ५०० ग्रॅम मीठ व सव्वा लिटर सोयाबीन तेल यांचा यांचा समावेश आहे.
याशिवाय सात महिने ते सहा वर्ष वयोगटातील बालकांना ३२ दिवसासाठी अर्धा किलो खजूर, प्रत्येकी ४०० ग्रॅम गुळ व शेंगदाणे देण्यात आले आहेत.
कोरोनाच्या काळात एकीकडे सर्व कामधंदे बंद होते. त्यामुळे चिंतेची स्थिती होते. परंतु गरोदार, स्तनदा माता आणि बालकांना पुरक पोषण आहार अभावी त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी महिला व बालविकास विभागाने लागलीच नियोजन करीत पोषण आहार वेळेवर मिळेल याची काळजी घेतली.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अ‍ॅड.सिमा वळवी, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ यांनी अमृत आहार योजनेवर लक्ष केंद्रीत केल्याने कोरोनाच्या संकटाच्या काळात देखील मातांना आणि बालकांना वेळेवर आहार मिळू शकल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

जिल्ह्यातील दुर्गम भागात प्रत्येक माता आणि बालकांपर्यंत पुरक पोषण आहार पोहचावा यासाठी लॉकडाऊनच्या काळात मोठी कसरत झाली. परंतु महिला व बालविकास विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेत वेळेवर पोहच केले.

Web Title: Home delivery of 50 days grocery kit with dried fruits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.