महामार्गावरील खड्डे ठरताहेत जीवघेणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 12:31 IST2020-02-12T12:31:43+5:302020-02-12T12:31:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : नेत्रंग-शेवाळी राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांमुळे प्रवासी व वाहनधारक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले असून ...

The highway pits are life-threatening | महामार्गावरील खड्डे ठरताहेत जीवघेणे

महामार्गावरील खड्डे ठरताहेत जीवघेणे

लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार : नेत्रंग-शेवाळी राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांमुळे प्रवासी व वाहनधारक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले असून या खड्ड्यांमुळे आता महामार्गावर धावणारी वाहनेदेखील नादुरुस्त होऊ लागले आहेत. यामुळे वाहनधारकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून नेत्रंग-शेवाळी राष्ट्रीय महामार्गावरील तळोदा ते गव्हाळी फाट्यापर्यंतच्या महाराष्ट्र हद्दीतील रस्त्याची प्रचंड दैनावस्था झाली आहे. या मार्गावर दिवस-रात्र जड-अवजड वाहनांची वर्दळ असते. मात्र या मार्गावर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांमुळे वाहनांचा मेंटेनन्सचा खर्च वाढला आहे. खड्ड्यांमध्ये वाहने आदळली जात असल्याने वाहने बिघाड होऊन ती निकामी होण्याचे प्रमाण वाढले आहे.
राष्ट्रीय महामार्गावरील अक्कलकुवा ते खापर दरम्यान असलेल्या कुंभारखान फाट्याजवळ मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास गुजरातमधील राजकोट येथून गोणपाट भरून धुळ्याला घेऊन जाणारा ट्रक (क्रमांक एम.एच. १८ बीजी- ७१९१) खड्ड्यात आदळला. यामुळे ट्रकचा पाटा तुटला व ट्रकची बॉडी एका बाजूला सरकली. मात्र चालकाने प्रसंगावधान राखत ट्रक उलटू दिला नाही. अशाप्रकारे महामार्गावरील खड्ड्यांमध्ये अवजड वाहतूक करणारी वाहने वाहने आदळली जाऊन त्यांच्यात बिघाड निर्माण होण्याचे प्रमाण वाढले आहे. रस्त्यावर एक ते दीड फुटाचे जीवघेणे खड्डे तयार झाले असून अनेक ठिकाणी तर रस्त्याचे अस्तित्वच संपले आहे. अशा परिस्थितीत खड्ड्यामध्ये किंवा साईटपट्टी वाट शोधत वाहनधारक तारेवरची कसरत करीत वाहने चालवतात. त्यातच रस्त्यावर प्रचंड धुळीलाही वाहनधारकांना सामोरे जावे लागते. गेल्या सहा महिन्यांपासून अशी परिस्थिती असताना प्रशासनाने या रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे वाहनधारक व नागरिकांमध्ये प्रचंड रोष व्यक्त होत आहे.

नेत्रंग-शेवाळी राष्ट्रीय महामार्गावरील तळोदा ते गव्हाळी फाट्यापर्यंतच्या रस्त्यावर पडलेले खड्डे तात्काळ बुजण्यात यावे व रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी यासाठी लोकप्रतिनिधी, विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते व संघटनांनी रास्तारोको व अन्य आंदोलनाचा इशारा दिला होता. त्याची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून रस्त्याच्या दुरुस्तीचे लेखी आश्वासन संबंधितांना दिले होते. मात्र रस्त्याच्या दुरुस्तीचे कोणतेही ठोस काम अद्याप सुरू झालेले नाही. आश्वासन दिल्यानंतर एक आठवडा एका जेसीबीच्या सहाय्याने केवळ रस्त्याच्या साईडपट्ट्या रुंद करण्यात आल्या. परंतु रस्ता दुरुस्तीसाठी कोणतीही ठोस कार्यवाही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडून करण्यात आलेली नसल्याचे वाहनधारकांचे म्हणणे आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग नागरिकांच्या सहनशक्तीचा अंत पहात असून नागरिकांना खोटी आश्वासन देऊन वेळ मारून नेत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Web Title: The highway pits are life-threatening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.