सातपुड्यात आरोग्यवर्धक रानभाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 12:54 IST2019-12-22T12:54:13+5:302019-12-22T12:54:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : चवदारच नव्हे तर औषधी गुणधर्माच्या पौष्टिक रानभाज्या सातपुड्यात मिळत आहे. त्या रानावनात उगलेल्या असल्याने ...

Healthy Vegetables in Satpuda | सातपुड्यात आरोग्यवर्धक रानभाजी

सातपुड्यात आरोग्यवर्धक रानभाजी

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : चवदारच नव्हे तर औषधी गुणधर्माच्या पौष्टिक रानभाज्या सातपुड्यात मिळत आहे. त्या रानावनात उगलेल्या असल्याने धडगाव व मोलगी भागात अगदी निशुल्क उपलब्ध होत आहे. निशुल्क मिळत असल्याने या भाज्यांची खरी किंमत कळत नाही, परंतु त्या अनेक आजारांवर उपायकारक आहे. या भाज्यांची प्रशासकीय पातळीवर विकासाच्या दिशेने दखल घेणे अपेक्षीत आहे.
सातपुड्यात अनेक औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पती, झुडूपे आढळून येतात, त्यापैकी बहुतांश वनस्पतींचा पाला, फुले, फळे यांचा खाद्यान्न म्हणून वापर होत आहे. या खाद्यान्नाचा आदिवासींमधील विविध मौखिक साहित्यांमध्ये उल्लेख होतांना दिसत आहे. प्रामुख्याने डाब राजमंडलच्या कहाण्या, गितांसह पारंपरिक लग्नगिते, होळी गीतांमध्येही होत आहे. या भाज्यांचा पिढ्यानपिढ्यान अन्न म्हणून अवलंब केला जात आहे. त्यामुळे या भाज्यांचा शोध आदिवासींच्या पूर्वजांनीच लावला असावा, हे सिद्ध होत आहे. सुरुवातीला मानव अन्न हे जंगल व आसपासच्या परिसरातून मिळत असे. यात कंदमुळे, जंगलातून अपोआप मिळणारी फळे व रानभाज्यांचा समावेश होतो. माणसाने शेती करायला सुरुवात केली, त्याच्या खान-पानाच्या सवयी बदलल्याचे दिसून येत आहे.
शहरी भागात कृषीव्यवस्थेच्या बदलामुळे कोबी, फ्लॉवर, सिमला मिरची अशा भाज्या मिळत असल्या तरी सातपुड्यातील आदिवासी बांधव ऋतू व काळानुरुप पोवाळ्या (सनाय), माटला, उखीवळा, आंबाडा, शेल्टा, शेवगा पाला, उंबरपाला, सिंचपाला, मोखं, सिरीवाटा यासह अनेक वनस्पतींचा पाला, फुले, मुळे व फळे दैनंदिन आहारातील खाद्यान्न म्हणून वापर करीत आहे. या भाज्यांसाठी धडगाव मोलगी भागात सहज मिळत असून त्यासाठी आदिवासी बांधवांना कुठलीही किंमत मोजावी लागत नाही. त्यात कंदवर्गीय, झुडूपवर्गीय, वेलवर्गीय, वृक्षवर्गीयांसह आळंबीही उपलब्ध होते. परंतु आळंबी काही अंशी कालबाह्य देखील ठरत आहे. या भाज्यांच्या विकासासाठी उपाययोजना होणे आवश्यक आहे.

रानभाज्यांचा प्रशासकीय पातळीवर दखल घेत त्यातील औषधी गुणधर्म पडताळून पाहणे गरजेचे आहे. रानभाज्या या ठराविक मातीत व वातावरणातच उपलब्ध होतात. त्यामुळेया नैसर्गिक संपत्तीतील जैवविविधता ओरबाडली जाणार नाही, याची दक्षताही घेतली गेली पाहिजे. या भाज्या रानभाज्या असल्या तरी त्यांचीही शेती करता येऊ शकते का? या दिशेने प्रशासनाचे पाऊल पडल्यास या भाज्या निश्चितच विकासाच्या वाटेवर येतील पर्यायाने प्रत्येक घटकातील बांधवांना पौष्टीक तथा औषधी गुणधर्म असलेल्या भाज्या उपलब्ध होतील. त्यातून आरोग्यदायी समाज निर्माण होईल. शिवाय दुर्गम भागातील आदिवासी बांधवांना त्यातून रोजगार देखील उपलब्ध होऊ शकेल.

काही भाज्या शेतात नव्हे जंगलातच वाढतात
सातपुड्यात आढळून येणाऱ्या वनस्पतींपैकी बहुतांश वनस्पती या रानातच वाढतात. त्याची शेती केल्यास किंवा त्याची बागेत लागवड केल्यास त्या वाढत नाही. त्यामुळे सातपुड्यातील आदिवासी बांधव काही भाज्यांचा साठा करीत नाही. किंवा त्यांच्या बियाही साठवून ठेवत नाही. प्रशासकीय पातळीवर या भाज्यांचा विकास करतांना अशा काही भाज्यांचीही निवड होणे काळाची गरज आहे.

Web Title: Healthy Vegetables in Satpuda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.