गावी जाण्यासाठी त्यांचा एक हजार किलोमीटरचा सायकलीवरचा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 12:26 IST2020-05-05T12:26:38+5:302020-05-05T12:26:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : लॉकडाऊनमुळे परराज्यात अडकलेल्या मजुरांचे प्रचंड हाल होत आहे. गावापासून लांब असल्याने दुसऱ्या राज्यात होणारे ...

गावी जाण्यासाठी त्यांचा एक हजार किलोमीटरचा सायकलीवरचा प्रवास
लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : लॉकडाऊनमुळे परराज्यात अडकलेल्या मजुरांचे प्रचंड हाल होत आहे. गावापासून लांब असल्याने दुसऱ्या राज्यात होणारे हाल आता मजुरांनाही असह्य होऊ लागले असून, मिळेल त्या वाहनाने घराकडे मजूर परतत आहेत. अनेक मजूर पायी तर काही सायकलीने गावाकडे निघाले आहेत. सोमवारी असेच सुरतहून उत्तरप्रदेशकडे निघालेल्या कामगारांना प्रकाशा येथील कार्यकर्त्यांनी विसाव्यासाठी सुविधा दिली.
गुजरातमधील सुरत शहरात कामासाठी आलेल्या परप्रांतीय मजुरांची दयनिय अवस्था झाली आहे. त्यामुळे ते आपल्या राज्यात जाण्यासाठी वेगळा प्रयोग करीत आहेत. असाच प्रयोग सुरत शहरात पेन्टींगच्या कामासाठी आलेले उत्तर प्रदेशातील काही मजुरांनी केला. त्यांना परवानगी मिळत नसल्याने शेवटी त्यांनी सोशल डिस्टन्सचा वापर करत सायकलने प्रवास करण्याचे ठरवले व गेल्या चार दिवसांपासून सुरत येथून सायकलने प्रवास करीत सोमवारी महाराष्ट्रात दाखल झाले. सुरत, निझर, प्रकाशा, शहाद्यानंतर खेतियामार्गे उत्तर प्रदेशमध्ये प्रवेश करणार आहेत.
सोमवारी प्रकाशात येथे सकाळी ११ वाजता आले असता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी त्याच्या नाश्ताची व्यवस्था करून दिली. नंतर शहादा येथे गेल्यावर एका शेताचा बांध्यावर पाणी चालू असताना त्यांनी तेथे आंघोळ करीत आराम केला व पुढील प्रवासाला सुरूवात केली. त्यांचा रोजचा प्रवास शंभर ते सव्वाशे किलोमीटर सायकलवरून होत आहे. हे सर्व मजूर असल्याने ग्रामस्थ त्यांची जेवणाची व्यवस्था करून देतात. कितीही ऊन असलं तरी त्यांचा प्रवास शंभर किलोमीटर सुरू आहे. आणखी पाच ते सहा दिवस त्यांना त्यांच्या उत्तर प्रदेशमधील बांधा जिल्ह्यात जाण्यासाठी लागणार आहे.
गेल्या दीड महिन्यापासून हाताला काम व पैसा नसल्याने त्यांच्याकडे असलेल्या नव्या व जुन्या सायकलीनेच त्यांनी सुरत ते उत्तर प्रदेश असा सुमारे हजार किलो मीटरचा प्रवास सुरू केला आहे.