नंदुरबार तालुक्यात पिकांना गारांचा तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:29 IST2021-03-21T04:29:06+5:302021-03-21T04:29:06+5:30
नंदुरबार : तालुक्यातील विविध भागात अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. शनिवारी दुपारी चार ते पाच वाजेच्या ...

नंदुरबार तालुक्यात पिकांना गारांचा तडाखा
नंदुरबार : तालुक्यातील विविध भागात अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. शनिवारी दुपारी चार ते पाच वाजेच्या दरम्यान नंदुरबार तालुक्याच्या विविध भागात १० ते १५ मिनिटे टप्प्याटप्प्याने गारपीट झाली. दरम्यान जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातही गारपिटीची माहिती आहे.
हवामान विभागाने जिल्ह्यात २० ते २२ मार्च दरम्यान वेगवान वारे व वादळी पावसाची शक्यता वर्तवली होती. या पार्श्वभूमीवर शेतक-यांना प्रशासनाकडून माहिती देण्यात आली होती. शनिवारी दुपारी चारपर्यंत आकाश निरभ्र होते. दुपारी चार वाजेनंतर मात्र नंदुरबार शहर व लगतच्या ग्रामीण भागात ढगाळ वातावरण होवून प्रारंभी तुरळक पाऊस व त्यानंतर गारपीट सुरु झाली. यातून ग्रामीण हद्दीतील रस्ते व शेतशिवार जलमय झाले होते. तालुक्यातील दुधाळे, वाघाळे, दहिंदुले, चाैपाळे, कोळदे, लहान शहादे, धामडोद यासह पूर्व भागातील शनिमांडळ, वैंदाणे आदी गाव परिसरात गारांचा पाऊस पडल्याची माहिती देण्यात आली आहे. तालुक्यातील शेतक-यांनी खरीप हंगामात पेरणी केलेल्या गहू आणि कापणी केलेला हरभरा या पिकांना गारपीट व अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बसला असल्याची माहिती देण्यात आली आहे. गारपीटीमुळे शेतकऱ्यांनी साठवलेल्या चाऱ्याचेही नुकसान झाले आहे. गारपिटीनंतर तहसील प्रशासनाकडून मंडळ अधिकारी व तलाठी यांना नुकसानीचा आढावा घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार रविवारी नुकसानीचे पंचनामे होण्याची शक्यता आहे. नंदुरबार शहरात सुमारे १० मिनीटे पाऊस सुरु होता. यावेळी मिरची पथारींवर असलेल्या मिरचीला झाकण्यासाठी मजूरांची धावपळ सुरु होती. बाजार समितीत सध्या गहूची मोठी आवक झाली असून गहू शेडमध्ये नेण्यासाठी मजूर कार्यरत असल्याचे दिसून आले. दरम्यान गारपीटीमुळे टरबूजाचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. तीव्र वेगाने पडणारी गार थेट फळात गेल्याने नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
नवापूर तालुक्यात गारपीट
नवापूर तालुक्यातील विसरवाडीसह कोंडाईबारी घाटात २० ते २५ मिनीटे मुसळधार पाऊस व गारपीट झाल्याची माहिती देण्यात येत आहे. या भागातील शेतक-यांना याचा फटका बसला आहे. तालुक्यातील इतर भागातही गारपीट झाल्याचे सांगण्यात येत आहे.
शहादा तालुक्यात धावपळ
शहादा तालुक्यात सायंकाळी मेघगर्जना सुरु झाल्याने शेतकऱ्यांची धावपळ उडाली होती. बहुतांश शेतक-यांनी हरभरा कापून मळणीसाठी शेतात ठेवला आहे. हा हरभरा झाकण्यासाठी त्यांची धावपळ सुरु होती.