अतिदुर्गम भागात कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:28 IST2021-05-22T04:28:48+5:302021-05-22T04:28:48+5:30
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात मे महिन्यात विविध मोहिमा राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मोरखी, होराफळी, वालंबा, ...

अतिदुर्गम भागात कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात मे महिन्यात विविध मोहिमा राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मोरखी, होराफळी, वालंबा, खडकापाणी या परिसरात कृषी सहायक सचिन राजपूत यांच्याकडून ग्रामपातळीवर पाड्यापाड्यांवर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना उत्पन्नवाढीसाठी तंत्रज्ञान देण्यात येत आहे. यात बीजप्रक्रिया करणे महत्त्वाचे असून, त्याचे प्रात्यक्षिके दाखविण्यात आले आहे. भात, मका, ज्वारी, तूर, मूग, सोयाबीन, उडीद या पिकांच्या बियाण्यांची बीजप्रक्रिया केल्यास उत्पन्नात १५ टक्क्यांपर्यंत वाढ दिसून येत असल्याचे सांगण्यात आले, तसेच भात पिकावरील करपा रोगाच्या व्यवस्थापनासाठी मिठाच्या पाण्याची बीजप्रक्रियेचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. जे शेतकरी सोयाबीनसाठी घरचे बियाणे वापरतील त्यांना उगवण क्षमता चाचणी करण्याबाबत सूचित करून तसे प्रात्यक्षिक दाखविण्यात येत आहेत. माती परीक्षण आधारित खत व्यवस्थापन केल्यास उत्पादन खर्चात बचत होऊन जोमदार पीक येते व जमिनीचे आरोग्य चांगले राखण्यास मदत होते. जमिनीत जे अन्नद्रव्ये मुबलक आहे, अशा खताचा अनावश्यक खर्च टाळता येतो, तसेच खतांमध्ये विद्राव्य खते देणे, शिफारशीप्रमाणे खते देणे, फवारणी करून खते देणे आदींचा अवलंब केल्यास १० टक्क्यांपर्यंत खताची बचत होऊ शकते, असे सांगण्यात आले.
बीबीएफ (रुंद, सरी वरंबा) तंत्रज्ञानाबाबतही शेतकऱ्यांना अवगत करण्यात येत आहे. यात प्रामुख्याने बीबीएफ यंत्राद्वारे उताराला आडवी पेरणी केल्यास मूलस्थानी जलसंधारण होण्यास मदत होते. आंतरपीक पद्धतीचा अवलंब केल्यास अधिकचे उत्पन्न घेता येते. बियाण्यांत २० ते२५ टक्के बचत होऊन उत्पन्नात ३० टक्के वाढ दिसून येते. वरंब्यावर ओलावा टिकवून ठेवला जात असल्याने, पर्जन्यमान खंडाच्या कालावधीतही पाण्याच्या ताणाची तीव्रता कमी होते. जास्त पाऊस झाल्यास या पद्धतीमधील सरीमधून अतिरिक्त पाणी वाहून जाण्यास मदत होते व पीक घनता योग्य ठेवण्यास मदत होते. पिकांची जोमदार वाढ होऊन पीक कीड-रोगास बळी पडत नाही. भात पिकासाठी चारसूत्री पद्धतीचा अवलंब केल्यास फायदेशीर असल्याचे शेतकऱ्यांना सांगण्यात आले.
यावेळी कोरोना नियमांचे पालन करण्यात आले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पोटे, उपविभागीय कृषी अधिकारी नीलेश भागेश्वर, तालुका कृषी अधिकारी नीलेश गढरी व मंडळ कृषी अधिकारी आर.एम. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यक्रम घेण्यात येत आहे. खरिपाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांना अशा पद्धतीचे प्रात्यक्षिक देऊन मार्गदर्शन मिळत असल्याने, परिसरातील शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.