लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्याचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात असून गावालगत जाणाऱ्या आंतरराज्यांच्या सीमाही बंद करण्यात आल्या आहेत. तळोदा तालुक्यातील अशा सीमांवर गावांचे ग्रामसुरक्षा दल पहारा देत आहेत. दरम्यान, तळोदा तालुक्यात अशा १२ गावांमध्ये तरुणांचे ग्रामसुरक्षा दल स्थापन करण्यात आले आहेत.कोरोना महामारीमुळे दिवसागणिक रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. त्यातच शेजारच्या मध्य प्रदेश राज्यातील नंदुरबार जिल्ह्याच्या हद्दीजवळ असलेल्या सेंधवा येथे कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. साहजिकच प्रशासनाने अधिक खबरदारी घेतली आहे. शेजारच्या मध्य प्रदेश व गुजरात राज्यातून कुणीही येऊ नये म्हणून खबरदारी घेतली जात आहे. एवढेच नव्हे तर सीमादेखील बंद केल्या जात आहेत. यासाठी महसूल प्रशासनाने ग्रामीण भागातील ग्रामस्थांच्या मदतीने ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली आहे.तळोदा तालुक्यात देखील अशा १२ गावांमध्ये ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली आहे. त्यात मोदलपाडा, बुधावली, नळगव्हाण, बोरद, सिंगसपूर, धानोरा, दसवड, आमलाड, पिंपरपाडा, इच्छागव्हाण, अंमलपाडा, सोरापाडा या गावांचा समावेश आहे. या गावांमधून आंतरराज्यांच्या सीमा जात असल्याने कोरोनाचे संशयित अथवा बाहेरुन येणाऱ्यांची शक्यता लक्षात घेऊन तेथेच ग्रामसुरक्षा दलांची स्थापना करण्यात आली आहे. आल्या गावाच्या संरक्षणासाठी या गावांधील नागरिक स्वत:हून उत्साहाने पुढे येऊन प्रशासनाला मदत करीत आहेत. एवढेच नव्हे आपल्या गावाच्या सीमेलगत पहारा देण्यासाठी रात्रंदिवस जागता पहारा देत असल्याचे म्हटले जात आहे. त्याचबरोबर असे कुणी ऐकत नसेल तर अशांची माहिती प्रशासनाबरोबरच पोलिसांना कळविण्याची सूचना त्यांना देण्यात आली आहे. एका ग्रामसुरक्षा दलात साधारण आठ ते दहा जणांचा समावेश करण्यात आला आहे.तळोदा तालुक्यातील सर्वच गावातील ग्रामस्थांनी आपापल्या गावांना बाहेरुन येणाºया फेरीवाल्यांना बंदी करण्यात आली आहे. याबाबत सातपुड्यातील दुर्गम भागातील ग्रामस्थही अत्यंत जागृत झाले आहेत. एवढेच नव्हे तर यासाठी काही गावातील दारु बनविणाºयांनी हातभट्ट्याही बंद करण्यात आल्याचे समजते. जेणेकरुन बाहेरील कुणी मद्यपी गावात येणार नाही. काही गावातील ग्रामस्थांनी गावाच्या चारही बाजूंनी काटेरी झुडपांनी रस्ते बंद केले आहेत. असे असले तरी या गावांमधील गावकºयांना मास्क मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. दानशूर व्यक्ती व स्वयंसेवी सस्थांनी मास्क उपलब्ध करून देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. लॉकडाऊनमुळे मात्र रोजगार उपलब्ध होत नसल्याने मजुरांना लॉकडाऊन संपण्याची प्रतीक्षा लागून आहे.
ग्रामसुरक्षा दलाच्या सदस्यांकडून पहारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 12:42 IST