गाड्या कमी तरीही जागेची हमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:29 IST2021-03-28T04:29:15+5:302021-03-28T04:29:15+5:30
नंदुरबार : गेल्या वर्षापासून रेल्वे प्रवास हा अत्यंत सुकर झाल्याचे सध्या दिसून येत आहे. प्रवाशांची संख्या घटल्याने मुंबई किंवा ...

गाड्या कमी तरीही जागेची हमी
नंदुरबार : गेल्या वर्षापासून रेल्वे प्रवास हा अत्यंत सुकर झाल्याचे सध्या दिसून येत आहे. प्रवाशांची संख्या घटल्याने मुंबई किंवा देशातील इतर ठिकाणी जाणा-या प्रवाशांना रिझर्व्हेशन केल्यानंतर गाडी येईपर्यंत तिकीट कन्फर्म होत असल्याने सोय होत आहे.
उधना ते जळगाव रेल्वे मार्गावरच्या प्रमुख स्थानकांपैकी एक नंदुरबार आहे. गुजरात राज्यातून येणारे व जाणारे प्रवासी मोठ्या संख्येने या मार्गाचा वापर करतात. कोरोना संक्रमणानंतर मात्र या संख्येवर परिणाम झाला होता. जून २०२० पासून रेल्वे सेवा सुरु झाल्यानंतर प्रवासी गाड्यांमध्ये प्रवास करण्यासाठी अनेक निर्बंध असल्याने गर्दीवर नियंत्रण होते. यातून मुंबई किंवा इतर शहरांसाठी जाण्याकरिता जागेचे आरक्षण करणे सक्तीचे करण्यात आले आहे. यातून सर्वच प्रवासी जागा आरक्षित करण्यास प्राधान्य देत आहेत. यातून रेल्वेतून प्रवास करण्याची शिस्त लागल्याचे समोर आले आहे. दरम्यान नंदुरबार रेल्वेस्थानकातून सुमारे ४० गाड्यांचे आरक्षण करता येते. यात सर्वाधिक प्राधान्य हे मुंबई, अहमदाबाद, सुरत व नागपूर या शहरांना देण्यात येते. या शहरांसाठी तिकिट काढण्यात आल्यानंतर गाडी येण्याच्या दिवसापर्यंत ते जागा निश्चित होत असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान यातून जळगाव केिंवा भुसावळ जातानाही रेल्वे रिझर्व्हेशन करुनच प्रवास करण्यास प्राधान्य दिले जात असल्याचे चार्टवरुन दिसून आले.
नंदुरबार रेल्वेस्थानकातून दिवसाला सात गाड्या नियमितपणे धावतात. तर ४० गाड्या ह्या साप्ताहिक धावतात. या सर्व गाड्यांना नंदुरबार येथे थांबा आहे. यामुळे प्रवाशांची स्थानकात तपासणी केली जाते. मुंबई येथे जाण्यासाठी भुसावळ ते बांद्रा खान्देश एक्सप्रेस, बांद्रा पटना आणि गोरखपूर ते बांद्रा अशा तीन गाड्या आहेत. या गाड्यांमध्ये आरक्षण केल्यानंतर काही तासात तिकीट कन्फर्म होत असल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात आले. दरम्यान उत्तर भारताकडे जाणा-या गाड्यांमधून जळगाव, भुसावळ, अकोला व नागपूर या भागात जाणा-यांनाही तिकिट कन्फर्म होत असल्याने अडचणी येत नसल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली. यामुळे प्रवासी संख्या वाढली असल्याचे सांगण्यात आले.
मुंबईसाठी वेटिंगच नाही
नंदुरबार रेल्वेस्थानकातून जाणाऱ्या ४० गाड्यांपैकी निम्मे गाड्या ह्या उत्तर भारतात तर निम्मे गाड्या दक्षिण भारताकडे रवाना होतात. मुंबई येथे जाण्यासाठी खास सोय म्हणून खान्देश एक्सप्रेस सुरु करण्यात आली आहे. या गाडीला वेळीच रिझर्व्हेशन मिळत असल्याने अडचणी दूर झाल्या आहेत. प्रवाशांना बांद्रा-पटना व गोरखपूर-बांद्रा या साप्ताहिक गाड्यांचे ही रिझर्व्हेशन मिळत असल्याचे सांगण्यात आले आहे.
आरक्षण केल्यानंतर सीट मिळणारच
दरम्यान याबाबत नंदुरबार रेल्वेस्थानकाचे स्टेशन मास्टर सुभाष मंडल यांना संपर्क केला असता, गाड्यांची संख्या कमी असली तरी प्रवासी संख्या नियंत्रणात आहे. यातून प्रत्येकाला जागा मिळेल यासाठी नियोजन केले जाते. रेल्वेच्या ऑनलाईन सिस्टिममध्ये त्या-त्या शहरानुसार जागा उपलब्ध होत असल्याचे सांगितले.