प्रकल्प बाधितांच्या वसाहतीत मिट्टी सत्याग्रहातून शहिदांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:28 IST2021-03-25T04:28:58+5:302021-03-25T04:28:58+5:30
तळोदा : शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या स्मृतिदिनी व डॉ.राम मनोहर लोहिया यांच्या जयंती दिनी नर्मदा बचाओ आंदोलनाने मंगळवारी ...

प्रकल्प बाधितांच्या वसाहतीत मिट्टी सत्याग्रहातून शहिदांना अभिवादन
तळोदा : शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या स्मृतिदिनी व डॉ.राम मनोहर लोहिया यांच्या जयंती दिनी नर्मदा बचाओ आंदोलनाने मंगळवारी तळोदा तालुक्यातील सरदार सरोवर प्रकल्प बधितांच्या वसाहतीत मिट्टी सत्याग्रह कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात जीवन नगर, नर्मदा आशिष नगर, गंगा नगर, मोड, न्यूबन, गोपाळपूर, रोझवा, रेवा नगर व नर्मदा नगर अशी मोटारसायकल यात्रा काढण्यात आली होती.
या वेळी विस्थापितांनी आपल्या पुनर्वसन वसाहतीमधून एकमूठ माती घेवून केंद्र शासनाच्या अन्याय कारक शेतकरी विरोधी कायद्याचा निषेध करत यातून जमीन वाचविण्याचा संकल्प केला. केंद्र सरकारने जे तीन शेतकरी विरोधी कायदे आणले आहेत. त्यामुळे देशातील शेतकरी, शेतमजूर, छोटे दुकानदार या सर्वांची रोजीरोटी प्रभावित होणार आहे. या कायद्यामुळे आमची खेती, आमची माती मोठ मोठ्या उद्योगपतीच्या ताब्यात जाणार आहे. म्हणून तिला वाचवण्यासाठी ३० मार्चला दांडी येथून निघणाऱ्या मिट्टी सत्याग्रह यात्रेत सहभागी होणार व ही यात्रा ६ एप्रिलला दिल्ली येथे पोहोचणार आहे.
या यात्रेसोबत आमची नर्मदा घाटीची मातीही पोहोचणार आहे. देशभरातून वेगवेगळ्या संघटना आपापल्या क्षेत्राची माती घेवून पोहोचणार असून, या मातीने किसान आंदोलनात आतापर्यंत शहिद झालेल्या शेतकऱ्यांचे शहीद स्मारक बनविले जाणार आहे. व जो पर्यंत केंद्र सरकार हे शेतकरी विरोधी कायदे रद्द करीत नाही तो पर्यंत आम्ही शेतकरी आंदोलनासोबत असणार आहे. या मिट्टी सत्याग्रहात नर्मदा नगरचे सरपंच पुण्या वसावे, रेवा नगरचे सरपंच हिरालाल पावरा, पोलीस पाटील जोरदार पावरा, कृष्णा पावरा, कांतीलाल पावरा, लालसिंग वसावे, छगन पावरा, ओरसिंग पटले, खेमसिंग पावरा, रंजना पावरा, आशा वसावे, चेतन साळवे यासह अनेक मिट्टी सत्याग्रहींनी मोटारसायकल रॅलीत सहभाग घेतला.
नर्मदा घटीची माती दिल्लीला पोहचणार
तळोदा व शहादा येथील विस्थापितांची मिट्टी सत्याग्रह यात्रा ६ एपरील रोजी दांडी येथे पोहचणार आहे. तेथील मिट्टी सत्याग्रह बरोबर ही यात्रा निघून दिल्ली येथे पोहचणार आहे. तळोदा तालुक्यातून विस्थापितांच्या वसाहतीत निघालेल्या या मोटार सायकल रॅलीने परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते. या वेळी आंदोलकांनी केंद्र सरकारच्या अन्यायी तीन कायद्यान विरोधात जोरदार घोषणा दिल्या होत्या.