ग्रामसेवक व प्रशासकाने समन्वय ठेवून कार्यवाही करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:30 IST2021-07-31T04:30:58+5:302021-07-31T04:30:58+5:30

तळोदा : तालुक्यातील बहुसंख्य ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे गावातील जे प्रश्न आहे ते प्रश्न सोडविण्यासाठी ग्रामसेवक ...

Gram Sevak and Administrator should take action in coordination | ग्रामसेवक व प्रशासकाने समन्वय ठेवून कार्यवाही करावी

ग्रामसेवक व प्रशासकाने समन्वय ठेवून कार्यवाही करावी

तळोदा : तालुक्यातील बहुसंख्य ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे गावातील जे प्रश्न आहे ते प्रश्न सोडविण्यासाठी ग्रामसेवक व प्रशासकाने आपसात समन्वय ठेवून त्यावर कार्यवाही करावी, अशी सूचना आमदार राजेश पाडवी यांनी दिली.

तळोदा येथील सांस्कृतिक भवनात शुक्रवारी ग्रामीण भागातील पाणीटंचाई व विकास कामांचा आढावा घेण्यात आला. अध्यक्षस्थानी आमदार राजेश पाडवी होते. व्यासपीठावर तहसीलदार गिरीश वखारे, सभापती यशवंत ठाकरे, गटविकास अधिकारी रोहिदास सोनवणे, ग्रामीण पाणी पुरवठ्याचे कार्यकारी अभियंता व्ही.डी. दरेवार, पंचायत समिती सदस्य विजय राणा, दाज्या पावरा, वनक्षेत्रपाल नीलेश रोढे, सहाय्यक प्रकल्पाधिकारी अमोल मेटकर, सानुबाई वळवी उपस्थित होते. प्रारंभी त्यांनी ग्रामीण भागातील पाणीटंचाई, घरकुले, वनपट्टे, या प्रश्नांची गावनिहाय आढावा तेथील सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडून घेतला. अनेक ठिकाणी पाण्याची समस्या सोडविण्यासाठी नवीन हातपंप जीर्ण जलवाहिन्या, कूपनलिका यांची मागणी सरपंचांनी केली आहे. त्याचबरोबर अनेक पाड्यांमध्ये पाणी प्रश्न आजही असून, त्यांना झऱ्याच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत असल्याचे सांगण्यात आले. काही गावांमध्ये स्मशानभूमीचा प्रश्न असून, त्यासाठी निधीची मागणी करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी जीर्ण तारा, पोल, नवीन पोल नसल्यामुळे विजेची समस्या असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. तब्बल तीन ते चार तास ही आढावा बैठक सुरू होती. आढावा घेतल्यानंतर आमदार पाडवी यांनी उपस्थित पदाधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, ज्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न आहे तेथे शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत सुविधा देण्यात येतील. शिवाय जेथे वीज, रस्ते हे प्रश्न आहेत तेथे माझ्या डोंगरी विकास निधीतून कामे घेण्यात येतील. परंतु यासाठी ग्रामसेवकांनी तसा प्रस्ताव तातडीने पाठवावा; जेणे करून त्यावर लगेच कार्यवाही करता येईल, असे सांगून तळोदा तालुक्यात जवळपास ९० टक्के ग्रामपंचायतींची मुदत संपल्याने प्रशासक नियुक्त झाले आहे. त्यामुळे या प्रशासकांनी गावाचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी ग्रामसेवकांशी समन्वय ठेवून गावकऱ्यांशी संवाद साधावा. तसेही प्रशासकांना शासनाने धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहे. त्यामुळे त्यांनी प्रत्यक्ष गावात जाऊन प्रश्न सोडवावे. अनेक गावातील गावकऱ्यांच्या तक्रारी येतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांनीही आपली जबाबदारी ओळखून त्या सोडवण्याच्या प्रयत्न करावा. जेथील तक्रारी येतील तेथील कर्मचाऱ्यावरही कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

सूत्रसंचालन ग्रामसेवक मधुकर कापुरे यांनी केले. ही बैठक यशस्वी करण्यासाठी महसूल कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. बैठकीत ग्रामीण भागातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी उपस्थित होते.

Web Title: Gram Sevak and Administrator should take action in coordination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.