युवा प्रयत्नांनी घडविली विकास वाटेची ‘ग्रामसंसद’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 12:13 IST2020-01-12T12:13:40+5:302020-01-12T12:13:45+5:30

भूषण रामराजे । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : खेड्याकडे चला असा संदेश महात्मा गांधी यांनी दिला आहे. ग्रामीण जीवनाचा ...

Gram Sangsad, a development path created by youth endeavors | युवा प्रयत्नांनी घडविली विकास वाटेची ‘ग्रामसंसद’

युवा प्रयत्नांनी घडविली विकास वाटेची ‘ग्रामसंसद’

भूषण रामराजे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : खेड्याकडे चला असा संदेश महात्मा गांधी यांनी दिला आहे. ग्रामीण जीवनाचा नागरी विकास होवून ते मुळ प्रवाहात राहावेत यासाठी हा संदेश उपयुक्त ठरतो. महात्मा गांधींच्या या संदेशाची प्रचिती बोळझळ, ता.नवापूर या गावात पाय ठेवल्यानंतर येतो. गावाच्या विकासाला डिजिटल प्रयत्नांची जोड देत राहुल गावीत या युवा सरपंचने ग्रामविकासाचा गाडा वेगवान ठेवला आहे.
२४ जुलै २०१६ पासून बोकळझळ, ता.नवापूर या गावाची धुरा राहुल उदेसिंग गावीत हा ३३ वर्षीय युवक सरपंच सांभाळतो आहे. बी.एड.चे शिक्षण झाल्यानंतर एखाद्या शाळा अथवा कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक म्हणून सहज रूजू होता येईल एवढे गुणही त्यांनी प्राप्त केले होते. परंतु ग्रामीण भागाचा किंवा आपण ज्या ठिकाणी राहतो. त्या भूमिचा विकास करण्याची जबाबदारी आपणच घ्यावी म्हणून समाज कारणाचा वसा घेत गावात काम सुरू केले आहे. २०१६ मध्ये प्रथम ग्रामपंचायत निवडणूक लढवून थेट सरपंच पदाला गवसनी घातली. सरपंच म्हणून निवड झाल्यानंतर गावाच्या विकासासाठी काय करता येईल याचा अ‍ॅक्शन प्लॅन ग्रामस्थांच्या संमतीने तयार करून घेतला. गावातील पिण्याचे पाणी, रस्ते, गटारी, वृक्षारोपण, शौचालय याची उभारणी कशी करावी यासाठी गावातील प्रत्येकाचे मत जाणून घेऊन ग्रामपंचायत व पेसा निधीतून कामे करून घेत ती यशस्वीरित्या पूर्ण केली. याची फलश्रृती म्हणजे गावाला आॅगस्ट २०१७ मध्ये जिल्हास्तराचा स्मार्ट व्हिलेज पुरस्कार देण्यात आला. पुरस्काराची रक्कम ५० लाख रूपये असल्याने त्यातूनही ग्रामविकासासाठी काय करता येईल याचे नियोजन करून घेतले. गेल्या तीन वर्षांपासून गावाची समर्थपणे धुरा सांभाळणाऱ्या ३३ वर्षीय राहुल गावीत यांनी तालुक्यातील ११४ ग्रामपंचायतींचे सरपंच एकत्र करून अखिल भारतीय सरपंच परिषदेत त्यांचा समावेश करून घेतला. परिषदेचे जिल्हाध्यक्ष म्हणून ते काम पाहत आहेत.

पुढील काळात गावाचा विकास आणखी प्रगल्भपणे व्हावा यासाठी बोकळझळ ग्रामपंचायत अंतर्गत येणाºया जिल्हा परिषद शाळांचे सर्व वर्ग डिजिटल करून विद्यार्थ्यांना ई-लर्निंग करण्यासाठी ग्रामपंचायत साहित्य उपलब्ध करून देणार आहे. अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना बालवयात डिजिटल माध्यमांची ओळख करून देण्यासाठी अंगणवाडीतही प्रगल्भ साधनांचा उपयोग केला जाणार आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शिक्षणासाठी बाहेर जाणाºया विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून सहाय्य देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. संपूर्णपणे डिजिटल ग्रामपंचायत असलेल्या बोकळझळ ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तूर्तास विद्यार्थ्यांना मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करण्यात येते. गावात शेती आणि रोजगार या संबंधी नियमित मार्गदर्शन कार्यशाळा घेतल्या जात आहेत. गाव विकासासाठी झटणाºया या युवा सरपंचाला विचारणा केली असता गाव माझं आहे, लोकांनी जबाबदारी टाकली आहे. त्यासाठी त्यांचा विश्वास सार्थ करून विकासाचा वेग वाढता ठेवायचा आहे. यातून येथील येत्या पिढ्या ह्या समजदार आणि शिक्षित होणार आहेत.

स्मार्ट व्हिलेज पुरस्कार पटकावल्यानंतर गावातील जिल्हा परिषद शाळा डिजिटल केल्या. याच दरम्यान, अंगणवाड्या सुशोभित करून बालकांच्या पोषणात कमतरता येणार नाही यासाठी लक्ष दिले. गावाच्या चौफेर विकासाच्या पार्श्वभूमिवर केंद्रीय ग्रामविकास विभागातर्फे बोकळझळ ग्रामपंचायतीला पंडित दिनदयाल उपाध्याय राष्टÑीय पुरस्काराने गौरविण्यात आले. हा पुरस्कार प्राप्त करणारी बोकळझळ ग्रामपंचायत जिल्ह्यातील एकमेव आहे. ग्रामपंचायतीला ग्रामसंसद असे नाव देत युवकांकडून गावाच्या विकासासाठी काय करून घेता येईल यासाठी येथे दर आठवड्याला त्यांच्या बैठकाही घेतात. २०१७ मध्ये रंगावली नदीला आलेल्या पुरात बोकळझळ ग्रामपंचायत व गाव बाधीत झाले होते. यातून अवघ्या दोन महिन्यात सावरण्याचा प्रयोगही त्यांनी यशस्वीपणे राबविला.

Web Title: Gram Sangsad, a development path created by youth endeavors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.