होऊन जाऊद्या शुभमंगल सावधान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:21 IST2021-07-08T04:21:11+5:302021-07-08T04:21:11+5:30

नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लग्न सोहळ्यांवर निर्बंध आले आहेत. यामुळे नवजीवनाला प्रारंभ करण्यासाठी उत्सुक असलेल्या विवाहेच्छुकांना ...

Good luck! | होऊन जाऊद्या शुभमंगल सावधान !

होऊन जाऊद्या शुभमंगल सावधान !

नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लग्न सोहळ्यांवर निर्बंध आले आहेत. यामुळे नवजीवनाला प्रारंभ करण्यासाठी उत्सुक असलेल्या विवाहेच्छुकांना निर्बंधानंतरच्या नव्या मुहूर्तांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. शासनाने लागू केलेल्या नवीन निर्बंधांमुळे अनेकांना विवाह रद्द करावे लागले होते. यातून काहींनी साधेपणाने विवाह उरकून घेत वेळ मारून नेली आहे. दरम्यान, येत्या काळातही निर्बंध कायम राहण्याची शक्यता असल्याने विवाहेच्छुक नियोजनात्मक विवाहांच्या तयारीला लागले आहेत.

शुभ मुहूर्त

जुलैमध्ये १, २, ३, १३, २२, २५, २६, २८ व २९ असे विवाह मुहूर्त आहेत. आता यातील पहिले तीन मुहूर्त आधीच गेल्याने आता केवळ सहा मुहूर्त शिल्लक राहिले आहेत. नवीन निर्बंध लागल्याने विवाहेच्छुकांच्या उत्साहाला ब्रेक लागला असला तरीही ठरलेल्या मुहूर्तावर लग्न करायचे ठरल्यास निर्बंध पाळूनच विवाह उरकावा असे नियोजन कुटुंबीय स्वीकारत आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेले निर्बंध मध्यंतरी शिथिल करून विवाह सोहळ्यासाठी १०० जणांना परवानगी देण्यात आली होती; परंतु नवीन आदेशानुसार ५० जणांनाच विवाहाला येण्याची परवानगी देण्यात आली आहे, तसेच सर्वांना मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग बंधनकारक आहे.

लग्न म्हटले की मंगलकार्यालय, आचारी, बँडबाजा, घोडा, वाहने आदींचे अगोदरच बुकिंग करावे लागते, तसेच लग्नपत्रिका, कपडेलत्ते, भांडीकुंडी, फर्निचर, दागदागिने यासह रुखवत आदी वस्तू लग्न मुहूर्तापूर्वी काही दिवस अगोदरच खरेदी कराव्या लागतात. मात्र, लॉकडाऊनमुळे आलेली बंधने, त्यात साधेपणाने उरकले जाणारे लग्न सोहळे यामुळे संबंधित व्यावसायिकांना मोठा फटका बसला असून, त्यांचे वार्षिक आर्थिक गणित बिघडले आहे. यामुळे व्यावसायिक मेटाकुटीला आले आहेत. अनेकांनी वाजंत्री, हाॅल, आचारी यांचे बुकिंग रद्द केले आहे.

शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन केले गेले पाहिजे. विवाह सोहळ्यातील उत्साहासोबतच भान जपले पाहिजे. रुढी व परंपरा यांचे पालन समाजात होतेच; परंतु आरोग्य हा आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. त्याचाही विचार करायला हवा. कमीत कमी लोकांना आमंत्रित करून विवाह सोहळे आयोजित करणे चांगलेच.

कोरोनाकाळातील निर्बंध पाळून मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये होणारे लग्न सोहळे चांगली संकल्पना आहे. यामुळे अनावश्यक खर्च टाळणे शक्य आहे. त्यामुळे समाजात हा पायंडा पडल्यास वधूपित्याचा बराच खर्च वाचणार आहे.

-कोमलसिंग राजपूत

-रमेश पाटील

Web Title: Good luck!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.